वीज यंत्रणेजवळ कचरा जाळू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:39 IST2021-04-28T04:39:41+5:302021-04-28T04:39:41+5:30

शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पिलर, वितरण रोहित्र, वितरण पेटी किंवा डी.पी. अशा वीज यंत्रणेजवळील उघड्यावर ...

Do not burn waste near power systems | वीज यंत्रणेजवळ कचरा जाळू नका

वीज यंत्रणेजवळ कचरा जाळू नका

शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पिलर, वितरण रोहित्र, वितरण पेटी किंवा डी.पी. अशा वीज यंत्रणेजवळील उघड्यावर असलेल्या जागेत कचरा टाकण्यात येतो. वीज यंत्रणेजवळ साठवलेला हा कचरा पेटविल्याने किंवा इतर कारणामुळे कचरा जळाल्याने विजेच्या भूमिगत केबल व इतर वीजयंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पर्यायाने संबंधित परिसरातील वीजपुरवठाही खंडित झालेला आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने कचऱ्यास आग लागण्याचे प्रकारही वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी चंद्रपूर शहरांतर्गत कोसारा ग्रामपंचायतीच्या हद्दीत अशीच एका कचरा जाळण्याच्या घटनेमुळे आग लागून महावितरण वीजयंत्रणेचे जळून नुकसान झाले होते व त्यामुळे कोसारा परिसरातील ग्राहकांना काही काळ वीजपुरवठ्याशिवाय राहावे लागले होते. वीजयंत्रणाही उन्हामुळे तापलेली असल्याने अशातच वीजवितरण यंत्रणेचे तापमान अशा आगीमुळे वाढल्यास यंत्रणेलाही त्याचा फटका बसतो. उपरी वीजवाहिन्यांखाली असलेल्या कचऱ्याचे ढीग पेटल्यामुळे किंवा त्याला आग लागल्यामुळे वीजतारा वितळून वीज खंडित होण्याचा धोका अधिक आहे. शहरातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी उघड्यावर असलेल्या वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल, अशा ठिकाणी कचरा टाकू नये किंवा साठवलेला कचरा जाळू नये. अशा घटनांतून वीजयंत्रणेला आग लागल्याचे आढळल्यास १९१२, १९१२० किंवा १८००१०२३४३५ आणि १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयाला त्याची सूचना देण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे, तसेच वीजवाहिन्यांखाली कडबा, धान्य, तणीस ठेवू नये, तसेच गुरांनाही वीजयंत्रणेपासून लांब बांधावे.

शॉर्ट सर्किटचाही धोका

घरगुती विद्युत उपकरणे आणि दिवे अति गरम झाल्याने शॉर्ट सर्किटचा धोका होऊन आग लागण्याचीही शक्यता असते. घरगुती वायरिंग किंवा नादुरुस्त स्विचेस आणि उपकरणांमुळेही शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिकल आउटलेटस्‌ किंवा एक्स्टेंशन कॉर्ड ओव्हरलोड झाल्यास याशिवाय वायरिंगमध्ये कित्येक वेळा सैल जोड वा कनेक्शन असतात, कालांतराने हे जोड कार्बनाइज होतात. कधी- कधी हे जोड सैल असल्यामुळे व त्याला घट्ट इन्सुलेशन न केल्यामुळे उंदीर, पाल आदी या वायर कुरतडतात व हळूहळू त्यामुळे स्पार्किंग सुरू होते व प्रसंगी शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याची संभावना असते, अशावेळी प्रथम घरातील मेन स्विच बंद करावा व मगच पाणी न वापरता कार्बनडाय ऑक्साइड, कोरडी रेती यांच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न करावा, त्यापूर्वी याची सूचना अग्निशमन विभागाला देण्याचे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे. नॅशनल इलेक्ट्रिक कोड २०११ प्रमाणे वायरिंगचे आयुष्य २० ते २५ वर्षे असावे, असे निर्देश आहेत. घरगुती वायरिंगला २० वर्षे झाल्यावर ग्राहकाने एखाद्या मान्यताप्राप्त किंवा महाराष्ट्र शासनाचा अनुज्ञप्तीधारक विद्युत कंत्राटदाराकडून आवश्यक त्या चाचण्या करून घेत त्याच्या सूचनेनुसार वायरिंग बदलून घेण्याचे आवाहनही महावितरणने केले आहे.

Web Title: Do not burn waste near power systems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.