जलस्त्रोतांना घाणीचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:00 IST2020-05-19T05:00:00+5:302020-05-19T05:00:48+5:30

शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेवर काम करण्यासाठी ग्रामपंचायतींना लाखो रुपये उपलब्ध करुन दिले जातात. या निधीचा काही ग्रामपंचायती योग्य नियोजन करुन सोयीसुविधा उपलब्ध करतात. परंतु अनेक ग्रामपंचायती याकडे दुर्लक्ष करतात. विशेषत: आदिवासी व दुर्गम भागात अशा प्रकारची स्थिती पहावयास मिळते.

Dirt the water sources | जलस्त्रोतांना घाणीचा विळखा

जलस्त्रोतांना घाणीचा विळखा

ठळक मुद्देहातपंप व विहिरींजवळ डबकी : एटापल्ली तालुक्याच्या दुर्गम गावातील स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी स्वच्छता, शारीरिक अंतर कायम ठेवणे आवश्यक आहे. यासह जंतनाशकाची फवारणी करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. परंतु एटापल्ली तालुक्याच्या ग्रामीण भागात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. नाल्यांअभावी अनेक हातपंप व विहिरींना घाणीचा विळखा असल्याने रोगराई पसरण्याची शक्यता आहे.
शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेवर काम करण्यासाठी ग्रामपंचायतींना लाखो रुपये उपलब्ध करुन दिले जातात. या निधीचा काही ग्रामपंचायती योग्य नियोजन करुन सोयीसुविधा उपलब्ध करतात. परंतु अनेक ग्रामपंचायती याकडे दुर्लक्ष करतात. विशेषत: आदिवासी व दुर्गम भागात अशा प्रकारची स्थिती पहावयास मिळते. एटापल्ली तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतच्या हद्दीतील गावांमध्ये स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. अनेक ग्रामपंचायत अंतर्गत गावांमध्ये वर्षातून एकदाही नाल्यांतील गाळाचा उपसा केला जात नाही. परिसर स्वच्छ राखण्याकडे दुर्लक्ष केले जाते. हातपंप व विहिरींजवळ मोठ्या प्रमाणात घाण पसरली असते. तालुक्यातील जांबिया गावात पक्या नाल्यांचा अभाव असल्याने हातपंपाजवळ मोठे डबके निर्माण झाले आहे. या डबक्यांमध्ये गावातील पाळीव डुकरे, गाई, बैल, म्हशी दिवसभर बसून असतात. पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होत नसल्याने डबक्यातील सांडपाणी हातपंप अथवा विहिरींमध्ये पाझरते. घाणीजवळील याच पाण्याचा वापर गावातील नागरिक पिण्याकरिता व वापरण्याकरिता भरतात. गडचिरोली जिल्ह्यातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरी, ग्रामीण व दुर्गम भागातही स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

ग्राम पंचायतींचे दुर्लक्ष
एटापल्ली तालुक्याच्या दुर्गम भागातील अनेक ग्रामसेवक मुख्यालयात उपस्थित राहत नाही. त्यामुळे स्वच्छता व आरोग्याची ही समस्या सुटत नाही. तालुक्यातील अनेक गावे वाऱ्यावर आहेत. सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारीसुद्धा याबाबत लक्ष देण्यास तयार नाही. दुर्लक्षामुळे आरोग्य व स्वछतेचा प्रश्न ऐरणीवर आहे.

Web Title: Dirt the water sources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी