पंचनामे करून मदतीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:00 IST2019-09-09T06:00:00+5:302019-09-09T06:00:37+5:30
ज्या नागरिकांची घरे कोसळली, त्यांच्या कुटुंबांना ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामसचिवालयात आश्रय देऊन या कुटुंबांच्या जेवनाची व्यवस्था जि.प. सदस्य संपत आळे यांनी केली.

पंचनामे करून मदतीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहटोला/तळोधी/वैरागड : अतिवृष्टीमुळे अनेकांची घरे कोसळली आहेत. नुकसानीचा पंचनामा करून मदत द्यावी, अशी मागणी पीडित नागरिकांकडून होत आहे.
मोहटोला परिसरातील पोटगाव येथील ४० घरांची पडझड झाली. विहिरगाव येथील १५ घरे कोसळली. डोंगरगाव ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या चिखली तुकूम, चिखली रिठ, अरततोंडी व डोंगरगाव मिळून ५० पेक्षा अधिक घराची पडझड झाली आहे. किन्हाळा व मोहटोला येथील एकूण १२ घरांची पडझड झाली आहे. किन्हाळा येथील अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना समाज मंदिरात राहावे लागले आहे.
तळोधी मो. परिसरातील मुरमुरी येथील बाबुराव ठाकरे, दादाजी निकोडे, राहूल धर्मा वाढई, देवराव कोठारे यांची घर कोसळली. येडानूर येथील लबानतांड्यावरील मनवर जाधव, कनिराम पवार, पावीमुरांडा येथील संदीप मंगरू किरंगे, सुनिता गावडे, शंकर पोटावी, मुतनूर येथील रामचंद्र मोदी नरोटे, ढेकणी येथील दीपक दशरथ आत्राम यांच्या घराची पडझड झाली. त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहेत.
वैरागड येथील अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. तसेच अतिवृष्टीमुळे अशोक कोंडेकर यांच्या घरासह अनेकांच्या घरांची पडझड झाली. त्यामुळे त्या कुटुंबांना निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ज्या नागरिकांची घरे कोसळली, त्यांच्या कुटुंबांना ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामसचिवालयात आश्रय देऊन या कुटुंबांच्या जेवनाची व्यवस्था जि.प. सदस्य संपत आळे यांनी केली. या कामात पं.स. सदस्य व्ही. डी. बावणकर, सरपंच गौरी सोमनानी, उपसरपंच श्रीराम अहिरकर, ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनीही सहकार्य केले. पंचनामे करून मदतीची मागणी आहे.