चामोर्शी ते हरणघाट पक्का रस्ता बनविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:37 IST2021-03-31T04:37:23+5:302021-03-31T04:37:23+5:30
या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे तर आहेतच पण बारीक गिट्टि, चुरी , डागडुजीच्या वेळेस टाकलेली माती रस्त्यावर निघालेली ...

चामोर्शी ते हरणघाट पक्का रस्ता बनविण्याची मागणी
या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे तर आहेतच पण बारीक गिट्टि, चुरी , डागडुजीच्या वेळेस टाकलेली माती रस्त्यावर निघालेली असल्यामुळे रात्रीला वाहनधारकांना धुळीमुळे वाहन चालवायला मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे मागील हफ्त्यात भेंडाळा येथील शेतकरी चंद्र्या येग्लोपवार यांना फोकुर्डि जवळ खड्ड्यामुळे अपघात घडला. यात त्यांचा मृत्यू झाला. रस्त्यावरील धुळीमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास सुध्दा निर्माण झाला आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीमध्ये कोरोनाच्या लक्षणांपैकी श्वसनाच्या त्रास हे एक लक्षण असल्यामुळे अनेक वाहनधारकांना आता याची भीती वाटायला लागली आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडले असता काही प्रमाणात या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती पण तेव्हापासून आता पर्यंत जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणच्या रस्त्यावर बारीक डांबर उखडून खडी रस्त्यात पसरली आहे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांचे वाहन घसरण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसाने रस्त्याच्या कडेला चिखल जमा झाले होताे. पण चिखल आता वाळल्याने त्याला नालीचे रूप प्राप्त झाले आहे. याचा त्रास वाहनचालकांना होत आहे. त्यामुळे या ११ किमी अंतराच्या रस्त्यावर डांबर या घटकाचे फक्त काही अवशेष उरले असून या रस्त्यावर बारीक गिट्टि , मोठे गोटे , चुरी पसरलेली आहे. या प्रखर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागासोबत लाेकप्रतिनिधी सुध्दा जाणून बुजून लक्ष देत नसल्याचा आरोप या परिसरातल्या काही सुज्ञ नागरिकांनी केला आहे. या अगोदर बऱ्याचदा लोकमतने या प्रखर समस्येकडे पाठपुरावा केला होता. जिल्हा परिषद सदस्या कविता भगत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन हा मार्ग पक्का करावा, अशी मागणी केली आहे.