वसतिगृहासमोरचे अतिक्रमण हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2017 01:32 IST2017-04-23T01:32:11+5:302017-04-23T01:32:11+5:30
मुलींच्या नवीन वसतिगृहाच्या इमारतीसमोर एका महिलेने अतिक्रमण करून झोपडी बांधली आहे.

वसतिगृहासमोरचे अतिक्रमण हटवा
तहसीलदारांना निवेदन : अतिक्रमित झोपडीमुळे हस्तांतरण रखडले
एटापल्ली : मुलींच्या नवीन वसतिगृहाच्या इमारतीसमोर एका महिलेने अतिक्रमण करून झोपडी बांधली आहे. त्यामुळे संरक्षण भिंतीचे बांधकाम होऊ शकले नाही. परिणामी वसतिगृहाच्या सुसज्ज नवीन इमारतीचे हस्तांतरण होण्यास विलंब होत आहे. विद्यार्थिनींना जुन्याच इमारतीत राहावे लागत आहे. तहसीलदारांनी पुढाकार घेऊन वसतिगृहाच्या परिसरातील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी विद्यार्थिनींनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
तहसील कार्यालयाच्या बाजूलाच वसतिगृहाची नवीन इमारत बांधली आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन तीन वर्षांचा कालावधी उलटला आहे. या इमारतीच्या प्रांगणात गावातीलच एका महिलेने झोपडी बांधली आहे. परिणामी संरक्षण भिंतीचे बांधकाम अर्धवटच थांबले आहे. संरक्षण भिंत बांधून झाली नसल्याने इमारतीचे हस्तांतरण रखडले आहे.
जुन्या वसतिगृहाची इमारत अत्यंत लहान आहे. या ठिकाणी सोयीसुविधांचाही अभाव आहे. नवीन इमारतीचा ताबा घेऊन त्या ठिकाणी वसतिगृह सुरू करणे आवश्यक आहे. मात्र अतिक्रमणामुळे इमारतीचे हस्तांतरण रखडले आहे. तहसीलदारांनी अतिक्रमण हटवून जागा खुली करून द्यावी, अशी मागणी तहसीलदारांना निवेदनातून केली आहे. सदर निवेदन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, आयुक्त बाजीराव जाधव यांनाही पाठविले आहे. अतिक्रमण हटविण्याची कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थिनींनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)