मासेमारी करताना मगरीचा हल्ला; इंद्रावतीत युवकाचा मृत्यू
By गेापाल लाजुरकर | Updated: June 8, 2025 20:15 IST2025-06-08T20:15:07+5:302025-06-08T20:15:36+5:30
छत्तीसगड राज्यातील घटना : पायावर हल्ला करून नेले खाेल पाण्यात

मासेमारी करताना मगरीचा हल्ला; इंद्रावतीत युवकाचा मृत्यू
गाेपाल लाजूरकर
सिरोंचा (गडचिराेली) : मासेमारीसाठी इंद्रावती नदीत सहकाऱ्यांसह गेलेल्या युवकावर मगरीने हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना महाराष्ट्र- छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत सिराेंचा तालुक्याच्या इंद्रावती नदीत शनिवार, ७ जून राेजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.
समित अंबाला (२२) रा. अटूकपल्ली, जिल्हा बिजापूर (छत्तीसगड) असे मृत युवकाचे नाव आहे. सिरोंचा तालुका व छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागूनच इंद्रावती नदी वाहते. सिरोंचा तालुक्याच्या हद्दीत सोमनपल्ली हे गाव आहे, तर दुसऱ्या बाजूला छत्तीसगड राज्यातील अटूकपल्ली हे गाव आहे. समित अंबाला हा युवक नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी नदीकाठी गेला होता. नदीत जाळे टाकत असताना अचानक मगरीने त्याच्यावर हल्ला केला. मगरीने त्याचा उजवा पाय पकडून पाण्यात ओढले.
तीन तास बचावकार्य; मात्र अपयश
अंबाला यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी आरडाओरडा केला आणि तातडीने बचावकार्य सुरू केले. मात्र, ताेपर्यंत मगरीने त्याला खाेल पाण्यात नेले हाेते. घटनास्थळी ग्रामस्थांनी माेठ्या संख्येने गर्दी केली. त्यानंतर तरुणाचा शोध सुरू केला. सुमारे तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर गावकऱ्यांनी तरुणाचा मृतदेह नदीबाहेर काढला. मगरीच्या हल्ल्यामुळे तरुणाचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला हाेता.