तांब्याची भांडी होताहेत गायब
By Admin | Updated: May 18, 2015 01:39 IST2015-05-18T01:39:39+5:302015-05-18T01:39:39+5:30
प्राचीन काळापासून वापरात असलेली तांब्याची भांडी अनेक घरांमधून हद्दपार झाली आहेत. त्यांची जागा आता स्टेनलेस स्टील व प्लास्टिकच्या भांड्यांनी घेतली आहे.

तांब्याची भांडी होताहेत गायब
गडचिरोली : प्राचीन काळापासून वापरात असलेली तांब्याची भांडी अनेक घरांमधून हद्दपार झाली आहेत. त्यांची जागा आता स्टेनलेस स्टील व प्लास्टिकच्या भांड्यांनी घेतली आहे. पूर्वी आरोग्य चांगले राहण्यासाठी तांब्याची भांडी मोठ्या प्रमाणात वापरली जात असत.
सद्यस्थितीत नव्या पिढीने जुना रेडिओ, टीव्ही, जुन्या लाकडी खुर्च्यासह अन्य जुनाट वस्तू अडगळीत टाकल्या आहेत. त्याचप्रमाणे वडिलोपार्जित काळापासून वापरली जाणारी तांब्याची भांडीदेखील हद्दपार करून आता स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा वापर सर्रास सुरू झाला आहे. सध्याच्या काळात केवळ गरजेपुरताच तांब्याच्या भांड्यांचा वापर होताना दिसतो. देवांसाठी तसेच धार्मिक कार्यात आजही आवर्जून तांब्याची भांडी वापरली जातात.
अलीकडे मात्र दैनंदिन वापरात स्टील, लोखंड, प्लास्टिकचा वापर वाढला आहे. या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात विषाणू जमतात. खाद्यान्नाच्या माध्यमातून ते शरीरात मोठ्या प्रमाणात प्रवेश करून रोगप्रतिकारक शक्तींवर हल्ला करतात. यामुळे व्यक्ती आजारी पडतात.
स्टीलच्या भांड्यांपेक्षा तांब्याचा वापर अधिक होत असलेले स्वयंपाकघर जीवाणुंपासून अधिक सुरक्षित असते. विज्ञान निरीक्षणानुसार सामान्य तापमानाला तांब्याच्या भांड्यातील जीवाणू चार तासात मरतात. तर स्टीलच्या भांड्यात ते एक महिन्यापेक्षा अधिक काळ जीवंत राहतात. (स्थानिक प्रतिनिधी)
तांबे आरोग्यासाठी लाभदायक
तांबे हा धातू बहुगुणी असून आरोग्यसाठी देखील तो अतिशय उत्तम असल्याचा उल्लेख आयुर्वेदात आहे. तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी भरून ते सकाळी उपाशीपोटी प्यायल्याने अनेक आजार नाहीसे होतात. प्राचीन काळापासून चालत आलेल्या तांब्याच्या भांड्यांच्या वापरावर विज्ञानानेही शिक्कामोर्तब केले आहे. तांब्यामुळे विषाणूची संख्या घटते.