संचारबंदीतही बांधकाम तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:59 IST2021-05-05T04:59:25+5:302021-05-05T04:59:25+5:30
गडचिराेली : संचारबंदीतही घरांचे बांधकाम व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. गडचिराेली शहरात दरवर्षी घर बांधकामाच्या माध्यमातून शेकडाे ...

संचारबंदीतही बांधकाम तेजीत
गडचिराेली : संचारबंदीतही घरांचे बांधकाम व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. गडचिराेली शहरात दरवर्षी घर बांधकामाच्या माध्यमातून शेकडाे मजुरांना राेजगार उपलब्ध हाेतो. बांधकाम सुरू असल्याने मजुरांवर बेराेजगारीचे संकट आले नाही. केवळ रविवारी बांधकाम बंद ठेवले जाते.
बाजारपेठेत सकाळीच उसळते गर्दी
गडचिराेली : भाजीपाला व किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. केवळ चारच तास दुकाने सुरू ठेवता येत असल्याने दुकानदार सकाळी ७ वाजताच दुकाने उघडतात. तर, ग्राहकही ७ वाजताच दुकांनामध्ये पाेहाेचतात. १० वाजेपासून तर आठवडीबाजाराप्रमाणे गुजरी व बाजारपेठेत गर्दी उसळली असल्याचे दिसून येते.
पाणी शुद्धीकरण केंद्रातील टाकीचे काम अंतिम टप्प्यात
गडचिराेली : आठवडीबाजाराला लागून असलेल्या हनुमान वाॅर्डाला पाणीपुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राच्या आवारात पाण्याची टाकी बांधली जात आहे. या टाकीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच हनुमान वाॅर्डवासीयांना पाण्याची सुविधा हाेईल, अशी अपेक्षा आहे.
सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामांना सुरुवात
गडचिराेली : शहरातील मुख्य बाजारपेठेतील सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याच्या कामाला मागील आठ दिवसांपासून सुरुवात करण्यात आली आहे. संचारबंदीमुळे बाजारपेठ सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरू राहते. दुपारी या ठिकाणी गर्दी राहत नसल्याने काम करणे साेपे झाले आहे. संबंधित कंत्राटदाराला पुन्हा सहा मार्ग बनवायचे आहेत.
कैकाडी जमातीच्या नागरिकांना भूखंड देण्याची मागणी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कैकाडी व तत्सम भटक्या, विमुक्त जमाती आढळून येतात. या जमातीतील शेकडो नागरिकांचा दारिद्र्यरेषेमध्ये समावेश आहे. त्यामुळे या समाजातील नागरिकांना घर बांधकामासाठी भूखंड व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
टिपागड स्थळाच्या विकासाकडे दुर्लक्ष
काेरची : तालुक्यातील टिपागड अभयारण्याच्या निर्मितीच्या हालचाली मंदावल्याचे दिसून येत आहे. या अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन तीव्र गतीने करण्याची गरज आहे. शिवाय, येथील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष आहे. या ठिकाणी जाण्यासाठी पायऱ्या निर्माण केल्यास पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत हाेईल.
टाॅवर थ्रीजीचे मात्र फाेनही लागत नाही
वैरागड : परिसरात बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा देण्यात आली आहे. मात्र, ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलचा इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे दिला जात आहे. नागरिकांकडून थ्री-जी सेवेचे पैसे घेतले जात असून, सेवा मात्र टू-जी प्रमाणे दिली जात आहे.
वाकलेले खांब बदलविण्याचा मुहूर्त मिळणार काय
धानाेरा : तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक विद्युतखांब वाकलेले आहेत. त्यामुळे सदर खांबांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. अनेक दिवसांपासून खांब वाकलेल्या अवस्थेत असल्याने अपघात होऊ शकतो. याबाबत महावितरण कंपनीकडे अनेकवेळा तक्रार करण्यात आली. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे.
वीजतारांना रेटून बांधकाम धाेकादायक
देसाईगंज : शहरात दिवसेंदिवस अतिक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युततारांच्या अगदी जवळून इमारतींचे बांधकाम करण्यात येत आहे. यामुळे घरांनाही धोका निर्माण झाला आहे. याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत चालले आहे. अशा इमारतींमुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे.
माेकाट जनावरांमुळे रहदारी बाधित
एटापल्ली : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे मधोमध उभे राहतात. त्यामुळे रहदारी बाधित होत असून, वाहनधारकांना नेहमी अपघाताची भीती असते. अनेक मार्गांवर मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. या मागणीकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येते.
अरुंद पुलांमुळे पावसाळ्यात रहदारीचा प्रश्न कायम
गडचिरोली : ब्रिटिशकाळात बांधलेला एकही पूल गडचिरोली जिल्ह्यात नसला तरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर तयार करण्यात आलेला चंद्रपूर - आलापल्ली मार्गावरील आष्टीचा पूल ठेंगणा व अरुंद असल्यामुळे या पुलावरून आजवर अनेकांचा वाहन कोसळून बळी गेला आहे. ठेंगणे व अरुंद पूल हे वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहेत.
बाेथेडा भागात दारूविक्री
गडचिरोली : तालुक्याच्या आंबेशिवणी परिसरातील बाेथेडा भागात मागील काही वर्षांपासून दारूची अवैध विक्री सुरू आहे. त्यामुळे अनेक युवक दारूच्या आहारी गेले आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे पाेलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
टिल्लू पंप जप्त करा
गडचिरोली : स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या वतीने दिवसातून दोनदा नळपाणीपुरवठा नियमित केला जातो. मात्र, रामनगर, स्नेहनगर परिसरात काही नागरिक आपल्या घरच्या नळाला टिल्लू पंप लावत असल्याने इतर नागरिकांच्या घरामधील नळातील पाणीप्रवाह कमी होतो. अनेकांना पुरेसे पाणीही मिळत नाही. त्यामुळे टिल्लू पंप जप्त करावे.