वीज उपकेंद्रांचे काम पूर्ण करा
By Admin | Updated: January 10, 2015 22:55 IST2015-01-10T22:55:43+5:302015-01-10T22:55:43+5:30
अतिदुर्गम व ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो. अनेकदा २ ते ३ दिवसांपर्यंत तो सुरळीत होत नाही. परिणामी शेतकरी, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो.

वीज उपकेंद्रांचे काम पूर्ण करा
गडचिरोली : अतिदुर्गम व ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो. अनेकदा २ ते ३ दिवसांपर्यंत तो सुरळीत होत नाही. परिणामी शेतकरी, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे प्रस्तावित नवीन ३३ के. व्ही. उपकेंद्राचे काम त्वरित पूर्ण करून शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा करावा, असे निर्देश खा. अशोक नेते यांनी गडचिरोली येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिले.
आढावा बैठकीला आ. डॉ. देवराव होळी, आ. क्रिष्णा गजबे, निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी, जिल्हा विद्युत समन्वय समितीचे सदस्य सचिव तथा विद्युत निरीक्षक प्रदीप चामट, गडचिरोली विभागाचे अधीक्षक अभियंता किशोर मेश्राम, प्रमोद पिपरे, जिल्हा सचिव भारत खटी, ग्राहक प्रतिनिधी सुधाकर येनगंधलवार, विलास भांडेकर, अनिल कुनघाडकर, रेखा डोळस, कार्यकारी अभियंता गावंडे, आलापल्लीचे कार्यकारी अभियंता हिवरकर, कार्यकारी अभियंता निशांत किरोलीकर, सुनील बडवे, मनोहर बोदलवार उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील ३३ के. व्ही. उपकेंद्राकरिता पर्यायी विद्युत पुरवठा करण्यासंदर्भात तसेच नवीन ६६ के. व्ही. विद्युत उपकेंद्र मंजुर करणे, १३२ के. व्ही. विद्युत पुरवठ्याची माहिती यावर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रलंबित कृषिपंपांना तत्काळ विद्युत जोडणी करून अनधिकृत व्यक्तीद्वारे वीज दुरूस्तीचे काम करतांना झालेल्या विद्युत अपघाताची माहिती घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना खा. नेते यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
प्रस्तावित विद्युत उपकेंद्राची कामे तातडीने सुरू करण्यात यावी, असे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले. (शहर प्रतिनिधी)