कलश यात्रेने शहर दुमदुमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:23 IST2018-01-07T23:23:30+5:302018-01-07T23:23:57+5:30
हनुमानजी महाराज व समस्त नगरवासीयांच्या वतीने परमपूज्य श्री परमानंदजी महाराज यांच्या अमृत वाणीतून श्रीराम कथेचा शुभारंभ रविवारी चामोर्शी मार्गावरील कमल-केशव सभागृहात करण्यात आला. दरम्यान आज सकाळी ९ वाजता शहरातील साई मंदिरापासून भव्य कलश यात्रा काढण्यात आली.

कलश यात्रेने शहर दुमदुमले
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : हनुमानजी महाराज व समस्त नगरवासीयांच्या वतीने परमपूज्य श्री परमानंदजी महाराज यांच्या अमृत वाणीतून श्रीराम कथेचा शुभारंभ रविवारी चामोर्शी मार्गावरील कमल-केशव सभागृहात करण्यात आला. दरम्यान आज सकाळी ९ वाजता शहरातील साई मंदिरापासून भव्य कलश यात्रा काढण्यात आली. ही कलश यात्रा शहरातील मुख्य मार्गााने फिरविण्यात आली. यावेळी ‘जय श्रीराम’ नामाचा गजर करण्यात आला. ‘जय श्रीराम’ नामाच्या गजराने संपूर्ण गडचिरोली शहर दुमदुमले.
श्रीराम कथेचे आयोजन रविवारपासून १३ जानेवारीपर्यंत करण्यात आले आहे. वृंदावनवासी परमपूज्य परमानंद महाराज हे श्रीराम चरित्रमानस या ग्रंथातील कथेचे वाचन करून शहरवासीयांना मंत्रमुग्ध करणार आहेत. आज कथेच्या पहिल्या दिवशी परमपूज्य परमानंद महाराज म्हणाले की, रामकथा ही प्रभू श्रीरामाच्या उदारतेचे व चरित्राचे वर्णन व भाग्योदय करणारी आहे. भाग्योदय म्हणजेच संपूर्ण जग तुझं आणि माझं या मागेच पडलेले आहे. खरे मानवी जीवन या जगातील प्रत्येक मनुष्य विसरला आहे. अशा मानवाला रूळावर आणण्याचे काम श्रीराम कथा करीत असते.
श्रीराम कथेत प्रभू श्रीरामाने कसे आदर्श जीवन मनुष्याने जगावे याचे जिवंत उदाहरण ठेवले आहे, असेही परमपूज्य परमानंद महाराजांनी सांगितले. या रामकथेला अधिकाधिक संगीमय व भक्तिमय बनविण्याकरीता श्रीरामाचे सुंदर असे भजन परमपूज्य परमानंद महाराज तसेच संगितकार अयोध्या, वृंदावन व झांशी येथून आलेले आहेत. या संगितकारांनी गायलेले भजन गडचिरोलीकरांना अगदी मोहून टाकणारे होते. कथेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो भाविकभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
आज शिव विवाह
प्रभू श्रीरामाच्या कथेत रामचरित मानस मधील ‘शिव विवाह’ यासंदर्भात कथा सोमवार ८ जानेवारीला सांगण्यात येणार आहे. कथा श्रवणासाठी जास्तीत जास्त संख्येने शहरवासीयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कथा सप्ताह आयोजकांनी केले आहे.