घाणीच्या विरोधात नागरिकांचा एल्गार
By Admin | Updated: June 23, 2014 00:06 IST2014-06-23T00:06:41+5:302014-06-23T00:06:41+5:30
येथील वार्ड क्रमांक ४ मध्ये मानव मंदिर परिसरामध्ये दर शनिवारला आठवडी बाजार भरतो. बाजार संपल्यानंतर सायंकाळच्या सुमारास येथील विक्रेते नाशवंत ओला भाजीपाला रस्त्यावरच फेकून देतात.

घाणीच्या विरोधात नागरिकांचा एल्गार
अहेरी : येथील वार्ड क्रमांक ४ मध्ये मानव मंदिर परिसरामध्ये दर शनिवारला आठवडी बाजार भरतो. बाजार संपल्यानंतर सायंकाळच्या सुमारास येथील विक्रेते नाशवंत ओला भाजीपाला रस्त्यावरच फेकून देतात. ग्रामपंचायत प्रशासन तसेच बाजार कंत्राटदार स्वच्छता करण्याबाबत एकमेकाकडे बोट दाखवीत आहे. या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दरम्यान शनिवारी आठवडी बाजारच्या दिवशी या वार्डातील नागरिकांनी ग्रा.पं. प्रशासनाच्या विरोधात आंदोलन पुकारले. दरम्यान काही काळ तणाव निर्माण झाला होता. परिणामी दुपारी उशिरापर्यंत बाजार भरू दिला नाही.
आठवडी बाजारातील कचरा आठवडाभर रस्त्यावरच सडत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या भागात पावसाळ्यात रोगाची साथ पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या समस्येबाबत ग्रा.पं. सदस्य शैलेश पटवर्धन यांना नागरिकांनी सांगितले. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडे पटवर्धन यांच्या सूचनेकडे पुर्णत: दुर्लक्ष केले. ग्रामपंचायत प्रशासन, कंत्राटदार घाणीच्या साम्राज्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला. दरम्यान शनिवारी आठवडी बाजाराच्या दिवशी वार्डातील नागरिक एकत्र जमले. जोपर्यंत या परिसरात स्वच्छता करण्यात येत नाही. तोपर्यंत या ठिकाणी एकाही भाजीविक्रेत्यांना बसू देणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतला. दरम्यान व्रिकेते, ठेकेदार व नागरिकांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला. सरपंच गंगाराम कोडापे, उपसरपंच पेदापल्लीवार, सचिव उंदीरवाडे यांनी सदर समस्या लवकरच निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर बाजार नेहमीप्रमाणे सुरू झाला. (प्रतिनिधी)