मातृ-पितृछत्र हरविल्याने चंद्रशेखर व तुषार झाले पोरके
By Admin | Updated: August 15, 2016 00:44 IST2016-08-15T00:44:40+5:302016-08-15T00:44:40+5:30
आई-वडील म्हणजे जणू बालपणातील अवघे विश्वच. वडिलांचा आधार अन् आईची ममता बालमनाला सदैव हवीहवीशी वाटते,

मातृ-पितृछत्र हरविल्याने चंद्रशेखर व तुषार झाले पोरके
चिमुकल्यांवर ओढवले संकट : आधारवड कोसळला अन् ममताही कायमची मुकी
अतुल बुराडे विसोरा
आई-वडील म्हणजे जणू बालपणातील अवघे विश्वच. वडिलांचा आधार अन् आईची ममता बालमनाला सदैव हवीहवीशी वाटते, मात्र पित्याचे आधारवड कोसळण्यापाठोपाठ मायेची ममताही कायमची मुकी झाल्याने कवी यशवंत यांच्या ‘आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी... स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ या कवितेच्या ओळी आठविल्याशिवाय राहत नाही. विसोरा येथील रहिवासी चंद्रशेखर नाकतोडे व तुषार नाकतोडे ही दोन्ही मुले मातृ-पितृछत्र हरविल्याने पोरके झाले आहेत.
देसाईगंज तालुक्याच्या विसोरातील सीताबर्डी येथील प्रतिभा उर्फ अर्चना पुरूषोत्तम नाकतोडे यांचा १२ आॅगस्ट रोजी शुक्रवारी स्वत:च्या शेतात सर्पदंशाने मृत्यू झाला. पित्याच्या निधनानंतर तीन वर्षातच आईने सुध्दा जग सोडले. त्यामुळे १५ वर्षीय चंद्रशेखर व ११ वर्षीय तुषार ही दोन्ही मुले आता निराधार झाली आहेत.
१७ वर्षापूर्वी विसोरा येथील पुरूषोत्तम नाकतोडे व भंडारा जिल्ह्याच्या जुगनाळा येथील अर्चना तुळशीराम ढोरे यांचा विवाह झाला. लग्नानंतर त्यांच्या जीवनवेलीवर चंद्रशेखर व तुषार ही दोन मुले उमलली. सर्व काही सुरळीत चालू असताना प्रतिभाच्या जीवनात मोठे संकट आले. तीन वर्षापूर्वी विसोरा येथे झालेल्या एका रस्ते अपघातात पुरूषोत्तमचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुरूषोत्तमच्या निधनाने प्रतिभा पूर्णत: कोसळून गेली. दुसरीकडे चंद्रशेखर व तुषार वडिलांच्या जाण्याने वडील प्रेमास कायमची मुकली. मात्र या आभाळाएवढ्या संकटातून ‘प्रतिभा’ ही आपल्या प्रतिभेच्या जोरावर बाहेर पडली. शेती व्यवसायासह मोलमजुरी करून दोन मुलांसह जीवन कंठत होती. पित्याच्या प्रेमापासून दूर झालेल्या मुलांवर आई व वडील अशा दुहेरी भूमिकेतून प्रतिभा ही चंद्रशेखर व तुषार यांचे पालनपोषण व सांभाळ करीत होती.
मात्र १२ आॅगस्ट शुक्रवार हा दिवस प्रतिभा, चंद्रशेखर आणि तुषार यांच्या जीवनातील काळा दिवस ठरला. नेहमीप्रमाणे प्रतिभा ही काम करण्यासाठी शेतावर गेली. तुषार शाळेत गेला. सायंकाळी तुषार शाळेतून घरी परतल्यावर आईची प्रतीक्षा करीत बसला. अस्ताला जाणाऱ्या सूर्यदेवामुळे काळोख जसजसा पसरत होता, अगदी तशीच तुषारची आईप्रतीची आतुरता अधिक दाट होऊ लागली. अखेर अंधार होऊनही आई शेतावरून घरी न परतल्याने तुषार काळजीत पडला. लागलीच तुषारने याबाबत शेजारच्यांना कळविले. सर्वांनी शेताकडे धाव घेतली. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य असावे, शेतातील दृश्य पाहताच सर्वाच्या काळजाचे ठोके वाढले आणि पाहणारे गहिवरून गेले. सर्वांचे मन सुन्न झाले. प्रतीभा ही शेतातील बांधीमध्ये मृतावस्थेत पडून होती. पतीविरहातून स्वत:ला सावरत कर्तव्य, संस्कार, आधार व परिश्रमाच्या जोरावर चंद्रशेखर व तुषार यांची ‘प्रतीभा’ तेजोमय करू पाहण्याचे स्वप्न उराशी बाळगणारी प्रतिभाच मुकी झाल्याने चंद्रशेखर व तुषार आई प्रतिभापासून कायमचे दूर झाले.
या नाकतोडे कुटुंबाला केवळ एक एकर शेती आहे. चंद्रशेखर इयत्ता नववीत असून तो मामाकडे जुगनाळा येथे शिकत आहे. तुषार हा विसोरा जि.प. शाळेत इयत्ता पाचवीत शिक्षण घेत आहे. शुक्रवारला स्वत:च्या शेतात निंदन करताना प्रतिभाला सर्पदंश झाल्याने ती तिथेच मृतावस्थेत पडली अन् चंद्रशेखर व तुषारला कायमची सोडून गेली. त्यामुळे चंद्रशेखर व तुषार आता पोरके झाले आहेत.
निराधार चंद्रशेखर व तुषारला मदतीची गरज
मातृ-पितृछत्र हरविल्याने विसोरा येथील चंद्रशेखर व तुषार ही दोन मुले निराधार झाली आहेत. ते शिक्षण घेऊन मोठे होण्यासाठी त्यांना मदतीची गरज आहे. एखाद्या संस्था वा व्यक्तीने दातृत्व स्वीकारने गरजेचे आहे. शासन व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे.