अकरा महिन्यांपासून बुरुड कामगार बांबूपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST2021-02-05T08:48:47+5:302021-02-05T08:48:47+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : आरमोरी व देसाईगंज येथील बांबू कामगारांना मागील ११ महिन्यांपासून हिरव्या बांबूचा पुरवठा करण्यात ...

अकरा महिन्यांपासून बुरुड कामगार बांबूपासून वंचित
लाेकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी व देसाईगंज येथील बांबू कामगारांना मागील ११ महिन्यांपासून हिरव्या बांबूचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे बांबूपासून विविध उपयोगी वस्तू बनवून त्यातून मिळालेल्या पैशांवर आपली चूल पेटवून मुलाबाळांना खाऊ घालणाऱ्या बुरुड कामगारांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे.
आरमोरी व देसाईगंज तालुक्यात जवळपास ६०० बुरुड समाजाचे कुटुंब आहेत. हे सर्व कुटुंब बांबूच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. बांबूपासून विविध उपयोगी वस्तू तयार करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, मागील ११ महिन्यांपासून कामगारांना वनविभागाकडून हिरव्या बांबूचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे बुरुड कामगारांचा व्यवसाय ठप्प पडला आहे. बांबू कामगारांचे सर्वस्वी जीवन बांबूवर अवलंबून असल्यामुळे आपल्या कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात बांबूचे माेठ्या प्रमाणात उत्पादन होत असून पेसाअंतर्गत वन समितीला बांबू काढण्याचे आणि विक्री करण्याचे हक्क दिले आहेत. वन समितीद्वारा जास्त किमतीने पेपर मिलला बांबू पाठविला जातो. त्यामुळेच बांबू कामगाराना बांबू पुरवठा करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. बुरुड कामगारांनी बांबूसाठी आता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालून आम्हाला हिरव्या बांबूचा पुरवठा करून आमची उपासमार थांबवा, अशी मागणी केली आहे. बुरुड समाज बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष मधुकर बोरकर, सचिव ज्ञानदेव हिरापुरे, दिलीप हिरापुरे, नेपाल नागपुरे, देवेंद्र हिरापुरे, नरेश हिरापुरे, चंद्रशेखर नागपुरे, सुशील बोरकर, गोमा गराडे, निशांत हिरापुरे आदींनी केली आहे.
बाॅक्स...
बुरूड समाजासाठी १० टक्के बांबू राखीव ठेवा
वनविभागाने पेसा अंतर्गत मोडणारा बांबू बुरुड कामगारांकरिता १० टक्के राखीब ठेऊन तो देण्यात यावा, याकरिता बुरुड समाज बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करून निवेदन देण्यात आले. परंतु अजूनपर्यंत बांबू कामगारांच्या मागणीचा विचार करण्यात आलेला नाही. उपवनसंरक्षक व आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनाही वारंवार निवेदन देण्यात आले. परंतु बांबू कामगारांना बांबूचा पुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे बांबू कामगारांवर आर्थिक संकट ओढवले आहे.