पोलीस पाटलांच्या रिक्त पदाचा अनुशेष कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 06:00 IST2020-01-06T06:00:00+5:302020-01-06T06:00:24+5:30
गडचिरोली जिल्ह्याच्या १२ तालुक्यात सहा महसुली उपविभाग असून प्रत्येक उपविभागात दोन तालुक्यांचा समावेश आहे. प्रत्येक गावात एक पोलीस पाटील असावा, असे शासनाचे धोरण आहे. या धोरणानुसार गडचिरोली जिल्ह्यात पोलीस पाटलांची एकूण १ हजार ५१४ पदे रिक्त आहेत. यापैकी ९०० वर पदे भरण्यात आली असून गेल्या अनेक महिन्यांपासून जवळपास ३०० पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत.

पोलीस पाटलांच्या रिक्त पदाचा अनुशेष कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पोलीस प्रशासन व जनतेमधील महत्त्वाचा दुवा समजल्या जाणाऱ्या पोलीस पाटलांच्या रिक्त पदांचा अनुशेष गडचिरोली जिल्ह्यात अद्यापही कायम आहे. नक्षली दहशत, संवेदनशील भाग व अत्यल्प मानधन या साºया कारणांमुळे गडचिरोली जिल्ह्यात पोलीस पाटलांची ३०० वर पदे रिक्त आहे. परिणामी शेकडो गावांचा कारभार पोलीस पाटलाविनाच सुरू आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या १२ तालुक्यात सहा महसुली उपविभाग असून प्रत्येक उपविभागात दोन तालुक्यांचा समावेश आहे. प्रत्येक गावात एक पोलीस पाटील असावा, असे शासनाचे धोरण आहे. या धोरणानुसार गडचिरोली जिल्ह्यात पोलीस पाटलांची एकूण १ हजार ५१४ पदे रिक्त आहेत. यापैकी ९०० वर पदे भरण्यात आली असून गेल्या अनेक महिन्यांपासून जवळपास ३०० पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत.
गावातील शांतता व सुव्यवस्था टिकविण्यासोबतच गावातील तंटे गावातच मिटविण्याच्या कामातही पोलीस पाटील महत्त्वपूर्ण भूमिका बजावित असते. गावात घडलेल्या कुठल्याही गुन्ह्याची तसेच घटनांची माहिती पोलीस प्रशासनाला पोलीस पाटलांमार्फत दिली जाते. पोलीस ठाणे, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शांतता व सुव्यवस्थेबाबत पोलीस पाटलांशी नेहमीच संवाद असतो. याशिवाय अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी पोलीस पाटील पोलीस प्रशासनाला नेहमी मदत करीत असतो. सार्वत्रिक निवडणुकीच्या कामातील सुव्यवस्था सांभाळण्याच्या कामातही पोलीस पाटील योगदान देत असतो. त्यामुळे गावात पोलीस पाटलाचे पद अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
पोलीस पाटलांना मार्च २०१९ पर्यंत तीन हजार रुपये मानधन मिळत होते. त्यांच्या मागणीची दखल घेऊन सरकारने एप्रिल २०१९ पासून ६ हजार ५०० रुपये मानधन केले. त्यामुळे आता दुर्गम भागातील पोलीस पाटलांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र मानधन नियमित दिले जात नसल्याची ओरड आहे.
एका पोलीस पाटलावर अनेक गावांचा भार
गडचिरोली, चामोर्शी, देसाईगंज हे तीन तालुके शहरी भागालगत आहेत. तर इतर नऊ तालुके नक्षलप्रभावित, अतिदुर्गम भागात मोडतात. पोलीस पाटील पदासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवार मिळणे आवश्यक आहे. मात्र कुरखेडा, अहेरी, एटापल्ली या तीन उपविभागात नक्षली दहशत, अत्यल्प मानधनामुळे या पदासाठी उमेदवार अर्ज भरण्यास तयार होत नाही.
प्रशासनाच्या वतीने दरवर्षी या पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जाते. मात्र उमेदवार तयार होत नसल्याने पोलीस पाटलांच्या रिक्त पदांचा अनुशेष कायम राहतो. पोलीस पाटलांच्या अनेक मागण्यासंदर्भात संघटनेच्या वतीने शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मानधनवाढ ही एकमेव मागणी मान्य करण्यात आली. मात्र इतर सोयीसुविधाबाबत निर्णय झाला नाही.