एटापल्लीतील रेती घाटांचा लिलाव करा
By Admin | Updated: November 19, 2016 02:03 IST2016-11-19T02:03:53+5:302016-11-19T02:03:53+5:30
शासनाच्या विविध योजनेतून नगर पंचायत प्रशासनाला निधी उपलब्ध झालेला आहे.

एटापल्लीतील रेती घाटांचा लिलाव करा
रमेश गंपावार यांची पालकमंत्र्याकडे मागणी
एटापल्ली : शासनाच्या विविध योजनेतून नगर पंचायत प्रशासनाला निधी उपलब्ध झालेला आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात ३९७ लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी निधी प्राप्त झाला आहे. याशिवाय इतरही विकासकामे सुरू आहेत. तालुक्यातील रेती घाटांचा लिलाव न झाल्याने ९० ते १०० किमी अंतरावरून बांधकामांसाठी रेती आणावी लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील रेतीघाटांचा तत्काळ लिलाव करण्यात यावा, अशी मागणी एटापल्ली नगर पंचायतीचे उपाध्यक्ष रमेश गंपावार यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम व जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात त्यांनी बुधवारला निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की, नगर पंचायतीतर्फे नगरोत्थान, दलित वस्ती, रस्ता अनुदान, १४ वा वित्त आयोग आदी योजनेतून निधी उपलब्ध झाला आहे. याशिवाय तालुक्याच्या ३१ ग्रामपंचायतीच्या गावात घरकूलची कामे सुरू आहेत. मात्र रेती तालुक्यात उपलब्ध नसल्याने मोठी अडचण जाणवत आहे. त्यात वनाधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी नदी, नाल्यातून रेतीचा उपसा करू देत नाही, असे म्हटले आहे. निवेदन देताना न.पं. सभापती जितेंद्र टिकले, नगरसेवक किसन हिचामी, मनोहर हिचामी, दीपक सोनटक्के, शामराव शेंडे व गुरूदेव मारगोनवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)