संतप्त शेतकऱ्यांची महावितरणच्या अधिकाऱ्यांविराेधात पाेलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:35 IST2021-03-24T04:35:05+5:302021-03-24T04:35:05+5:30
उन्हाळी धान पिकाच्या हाेणाऱ्या नुकसानीला विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन ...

संतप्त शेतकऱ्यांची महावितरणच्या अधिकाऱ्यांविराेधात पाेलिसांत तक्रार
उन्हाळी धान पिकाच्या हाेणाऱ्या नुकसानीला विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन जि. प. चे माजी सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी घिसू खुणे व दशरथ लाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी पाेलीस निरीक्षकांना दिले. दिलेल्या तक्रारीवजा निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, सध्या उन्हाळी धान पीक जाेमात आहे. सुरवातीला या फीडरवरील कृषी पंपाना विद्युत पूरविणाऱ्या वाहीनीवर १६ तासाचे भारनियमन सुरू करण्यात आले. त्यामुळे या परिसरातील ४०० पेक्षा अधिक धान उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. या भागात रबी हंगामात उन्हाळी धान पिकाची लागवड माेठ्या प्रमाणात केली जाते. दरम्यान कुरखेडा-वडसा मार्गावर आमदार कृष्णा गजबे व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात दिवसभर चक्काजाम आंदोलन तसेच अधिकाऱ्यांना घेराव करण्यात आला होता. या आक्रमक आंदोलनाची दखल घेत त्यावेळी १६ तास भारनियमनाचा आदेश मागे घेत विद्युत पूरवठा सुरळीत करण्यात आला होता. यानंतर या परीसरातील शेतकऱ्यांंनी माेठी अपेक्षा बाळगुन उत्साहाने रबी हंगामात धानाची पेरणी केली. मात्र ऐन हंगामात पुन्हा मागे घेण्यात आलेल्या भारनियमनाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून १६ तासांचे भारनियमन सुरू करण्यात आले आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजतापर्यत विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. या आठ तासात धान पिकाला पाणी पुरवठा करणे अशक्य आहे. धान पिकाला अधिक पाण्याची गरज असते. त्यामुळे परिसरातील धान पीक पाण्याअभावी करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. हंगामाच्या सुरवातीला आंदोलनानंतर सुरळीत विद्युत पुरवठा करण्याचे आश्वासन देत पुन्हा भारनियमन लागू करणे ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. धान पिकाच्या होणाऱ्या नूकसानीला विद्युत वितरण कंपनीचा अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, असे म्हटले आहे.