जिल्हा बँकेकडे ५४ कोटी जमा
By Admin | Updated: November 19, 2016 01:51 IST2016-11-19T01:51:21+5:302016-11-19T01:51:21+5:30
नोट बंदीच्या निर्णयानंतर १० ते १३ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जुन्या ५०० व १०००

जिल्हा बँकेकडे ५४ कोटी जमा
५५ शाखांमध्ये काम : १००० व ५०० च्या जुन्या नोटा स्वीकारल्याने चार दिवसांतील रक्कम
गडचिरोली : नोट बंदीच्या निर्णयानंतर १० ते १३ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जुन्या ५०० व १००० रूपयांच्या नोटा स्वीकारण्याचे अधिकार दिले होते. या चार दिवसांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे ५३ कोटी ५६ लाख २ हजार ५०० रूपयांची रोकड जमा झाली आहे.
ज्या बँकांना रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाची परवानगी आहे. अशा सर्वच बँकांना ५०० व १००० रूपयांच्या नोटा स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नागरिकांकडील जुन्या नोटा स्वीकारण्यास सुरूवात केली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हाभरात विशेष करून ग्रामीण भागात एकूण ५५ शाखा कार्यरत आहेत व या बँकेशी चार लाख ग्राहक जुळलेले आहेत. ५०० व १००० रूपयांच्या नोटा बंद झाल्याचे लोण ग्रामीण भागापर्यंत पोहोचताच ग्रामीण भागातील नागरिकांनीही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमध्ये गर्दी करून नोटा जमा करण्यास सुरूवात केली. १० ते १३ नोव्हेंबर या चार दिवसांच्या कालावधीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वच शाखांच्या माध्यमातून ५३ कोटी ५६ लाख २ हजार ५०० रूपयांचे जुने नोट स्वीकारण्यात आले. त्यानंतर मात्र १४ नोव्हेंबरपासून रिझर्व्ह बँकेने जिल्हा सहकारी बँकांमध्ये ५०० व १००० ची नोट स्वीकारण्यास मनाई केली. तेव्हापासून बँकेच्या शाखांनी नोटा स्वीकारणे बंद केले. केवळ चार दिवसात ५४ कोटी रूपये जमा झाले आहेत. पैसे स्वीकारण्याची परवानगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कायम राहिली असती कर हा आकडा शेकडो कोटी रूपयांच्या वर गेला असता. जिल्हा बँकेला पैसे स्वीकारण्यास बंदी घातल्याने ग्रामीण नागरिकांची अडचण वाढली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे प्राप्त झालेल्या जुन्या नोटांपैकी ७५ टक्के रक्कम रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडे जमा करण्यात आली आहे. केवळ २५ टक्के रक्कम बँकेकडे शिल्लक आहे. सदर रक्कम सुध्दा रिझर्व्ह बँकेकडे येत्या काही दिवसात जमा केली जाईल, अशी माहिती प्राप्त झाली आहे. आता जिल्हा सहकारी बँकेत जुन्या नोटा स्वीकारण्यात येत नसल्याने दुर्गम व अतिदुर्गम भागातील ग्राहकांना राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन खाते उघडून नोटा जमा कराव्या लागत आहे. त्यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. (नगर प्रतिनिधी)
नोटा बदलविण्यासाठी तालुकस्तरावर धाव
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रामुख्याने ग्रामीण भागात शाखा आहेत. ग्रामीण भागातील संजय गांधी निराधार योजना, विद्यार्थी, शेतकरी यांचे बँक खाते प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत आहेत. मात्र केंद्र शासनाने या बँकांना ५०० व १००० रूपयांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची फार मोठी गोची झाली आहे. पैसे बदलविण्यासाठी तालुकास्तरावरील राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखेमध्ये नागरिकांना धाव घ्यावी लागत आहे. याही शाखेत केवळ दोन हजार रूपयेच बदलवून दिले जात असल्याने उर्वरित रकमेचे काय करावे, असा गहण प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.