१७ वर्षात दगावले ४७९ एचआयव्ही रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 06:00 AM2019-12-01T06:00:00+5:302019-12-01T06:00:31+5:30
जिल्ह्यात ३० जानेवारी २००२ ला पहिल्यांदा आयसीटीसी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रामार्फत एचआयव्ही एड्स आजाराविषयी जनजागृती तसेच शासकीय रूग्णालयात तपासणी मार्गदर्शन व औषधोपचार पूर्णपणे मोफत केला जात आहे. याशिवाय रूग्णांना विनामूल्य माहिती उपलब्ध व्हावी, याकरिता १०९७ टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अतिशय गंभीर रोग म्हणून ओळख असलेल्या एचआयव्ही एड्सचे जिल्ह्यात व जिल्हाबाहेरून गेल्या १७ वर्षात १ हजार ५४६ रूग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ४७९ रूग्ण या आजारामुळे दगावले आहेत. तर १ हजार ६७ रूग्ण एआरटी औषधोपचार सुरळीत घेत आहेत.
जिल्ह्यात ३० जानेवारी २००२ ला पहिल्यांदा आयसीटीसी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रामार्फत एचआयव्ही एड्स आजाराविषयी जनजागृती तसेच शासकीय रूग्णालयात तपासणी मार्गदर्शन व औषधोपचार पूर्णपणे मोफत केला जात आहे. याशिवाय रूग्णांना विनामूल्य माहिती उपलब्ध व्हावी, याकरिता १०९७ टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. याचा फायदा एचआयव्ही रूग्णांसह शंकांचे निरसन करणाऱ्या व्यक्तींना होत आहे. त्यामुळे समाजात एचआयव्ही एड्स निर्मूलनाविषयी मानसिकता तयार होऊन जागृतीही होत आहे.
एमडीआर पद्धतीमुळे बाळांना आजारापासून दूर ठेवता येते
एचआयव्ही एड्स असुरक्षित लैैंगिक संबंध, एचआयव्ही संसर्गित रक्त, संसर्गित इंजेक्शन, सुई व अन्य उपकरणे तसेच एचआयव्ही संसर्गित गरोदर मातेकडून तिच्या बाळाला होतो. या चार कारणांमुळे एड्स होण्याची शक्यता असते. बाळांपर्यंत एड्सचा प्रसार थांबविल्या जाऊ शकतो. यासाठी एमडीआर ही नवीन उपचार पद्धती आली आहे. पालकांकडून शिशूकडे प्रसार प्रतिबंधक उपाय असे या पद्धतीचे नाव आहे. प्रतिबंधासाठी लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. यासाठी रूग्णालयातील आयसीटीसी केंद्राशी संपर्क साधून तेथील समुपदेशकांचा सल्ला घ्यावा. सर्व सरकारी रूग्णालयात प्रसूतीपूर्व चिकित्सा विभागातील आयसीटीसी केंद्रात ही सेवा उपलब्ध आहे. येथे उपचार घेतल्यास बाळांना एचआयव्ही संसर्गापासून दूर ठेवता येऊ शकते.
नैतिक मूल्यांचे महत्त्व अधिक
जीवनात नैतिक मूल्यांना अधिक महत्त्व आहे. समाजाला व विशेषत: तरूणांना एचआयव्हीची लागण होऊ नये, यासाठी शालेय जीवनापासूनच मुलांमध्ये शिस्त, नैतिक मूल्य जोपासण्याचे संस्कार तरूण अवस्थेतील हालचालींकडे लक्ष म्हणून मित्र संगतीकडे लक्ष द्यावे. तसेच वडिलांनी मुलांचे मित्र बनून वागावे. नैतिक मूल्य ढासळणार नाही यासाठी मुलांवर योग्य संस्कार करून त्यांना वेळोवळी मार्गदर्शन केल्यास संस्कारक्षम पिढी निर्माण होईल.