२४ तासांपासून ४५ गावे अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:32 IST2018-02-15T01:32:06+5:302018-02-15T01:32:27+5:30
मंगळवारी सायंकाळपासून झालेल्या वादळी पावसामुळे घोट व परिसरातील शेतकऱ्यांच्या रबी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मंगळवारी रात्री ९ वाजता या भागातील वीज पुरवठा खंडित झाला.

२४ तासांपासून ४५ गावे अंधारात
लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : मंगळवारी सायंकाळपासून झालेल्या वादळी पावसामुळे घोट व परिसरातील शेतकऱ्यांच्या रबी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मंगळवारी रात्री ९ वाजता या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. तब्बल २४ तासानंतरही वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने जवळपास ४० ते ४५ गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
घोट परिसरात मंगळवारी सायंकाळपासूनच वातावरण बदल झाला. त्यानंतर ७ ते ७.३० वाजतापासून वादळी पावसाला सुरूवात झाली. दरम्यान लहान स्वरूपात गारपीटही झाली. त्यामुळे या परिसरात अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेले उडीद, मूग, हरभरा, जवस, पोपट, वटाणा, मटकी यासह अन्य कडधान्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले. घोट येथील ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या ४० ते ४५ गावातील वीज पुरवठा मंगळवारच्या ९ वाजतापासून बुधवारी रात्री उशिरापर्यंत खंडितच होता. या संदर्भात महावितरणच्या अभियंत्यांना विचारणा केली असता, वीज दुरूस्तीचे काम सुरू आहे, असे सांगितले. परिसरात वादळ वाऱ्यासह पाऊस झाल्याने या भागातील वीज तारांवर झाडे कोसळली. मुलचेरा तालुक्याच्या काही भागातही वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना त्रास झाला.
मुलचेरा तालुक्यात पिकांचे नुकसान
मुलचेरा तालुक्यातील गणेशनगरसह परिसरात मंगळवारी रात्री अवकाळी पाऊस झाल्याने या भागातील शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले. गणेशनगर येथील मका, हरभरा तसेच भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला. त्यामुळे या भागातील नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार अनिरूद्ध कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. विदर्भ कृती समितीचे अध्यक्ष बादलशहा यांच्या नेतृत्त्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुभाष गणपती, निकुरे, शंकर हलदार, रंजीत मंडल, रामपद मंडल, लक्ष्मण बाला, विश्वनाथ मंडल, सुभाष पटेल उपस्थित होते. या संदर्भात नाराजी व्यक्त करीत महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी झालेल्या नुकसानीची पाहणी न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे, अशी प्रतिक्रिया मुलचेराचे नगराध्यक्ष सुभाष आत्राम यांनी दिली.