४०८८ कार्डधारकांचे धान्यवाटप वांद्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:01 IST2020-04-15T05:00:00+5:302020-04-15T05:01:15+5:30
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू झाल्यानंतर गोरगरीबांची उपासमार होऊ नये म्हणून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य देण्याचे राज्याच्या पुरवठा विभागाने जाहीर केले. गडचिरोली हा धान उत्पादकांचा जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्यात ५ किलो तांदूळ देण्याचे निश्चित झाले.

४०८८ कार्डधारकांचे धान्यवाटप वांद्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील मिळून २ लाख ५ हजार ६१२ कार्डधारकांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत ५ किलो मोफत तांदूळ वाटपाचे नियतन मंजूर झाले आहे. परंतू मूळ योजनेनुसार ३ रुपये किलो दराने तांदूळ आणि २ रुपये किलो दराने गहू असे महिन्याला ३५ किलो धान्य मिळण्याचे वांदे कायम आहे. जिल्ह्यातील अंत्योदय योजनेत नव्याने समाविष्ट झालेल्या ४०८८ लाभार्थींना या योजनेचे कार्ड मिळाले असले तरी धान्य वाटपासाठी त्यांचे नियतन मंत्रालयातून अद्याप मंजूरच झालेले नाही. त्यामुळे यात काही गौडबंगाल तर नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू झाल्यानंतर गोरगरीबांची उपासमार होऊ नये म्हणून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य देण्याचे राज्याच्या पुरवठा विभागाने जाहीर केले. गडचिरोली हा धान उत्पादकांचा जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्यात ५ किलो तांदूळ देण्याचे निश्चित झाले. त्यानुसार अंत्योदयच्या ९९ हजार १६९ कार्डधारक कुटुंबांमधील ४ लाख ७ हजार ७४० व्यक्तींना आणि प्राधान्य कार्डधारक असणाऱ्या १ लाख ६ हजार ४४४ कुटुंबांमधील ४ लाख ३२ हजार ३०९ व्यक्तींसाठी प्रतिव्यक्ती ५ किलो तांदळाचे नियतन मंजूर करण्यात आले. हा तांदूळ ठिकठिकाणच्या रेशन दुकानांमधील पोहोचवण्याचे कामही सुरू आहे.
मार्च २०२० पर्यंत जिल्ह्यात अंत्योदयचे ९२ हजार ८३७ कार्डधारक होते. परंतू पंडीत दिनदयाल योजनेअंतर्गत एपीएल मधील कमी उत्पन्न गटातील लोकांना अंत्योदयचे कार्ड देण्याच्या मोहिमेअंतर्गत नवीन लाभार्थींची भर पडून अंत्योदयच्या कार्डधारक कुटुंबांची संख्या ९५ हजार ८० झाली. त्यानंतर पुन्हा त्यात ४०८८ कार्डची भर पडून अंत्योदयचे कार्डधारक ९९ हजार १६८ झाले. मात्र एप्रिल महिन्याचे नियतन देताना ९५ हजार ८० कार्डधारकांचेच नियतन मंत्रालयातून देण्यात आले. त्यामुळे उर्वरित ४ हजार ८८ कुटुंबांमधील जवळपास १६ हजार नागरिकांना गहू व तांदळाच्या लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे कोरोना व्हायरसचा प्रसार माणसाच्या तळहातावरील जंतूसंसर्गातून होण्याची शक्यता पाहता बायोमेट्रिक पद्धतीने रेशन मालाच्या विक्रीची नोंद घेणे बंद आहे. अशा स्थितीत दुकानदार रेशन पुस्तिकेत जे नमूद करेल त्यावर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नाही. मात्र दुर्गम भागात नागरिकांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन रेशन दुकानदार धान्य वाटप योग्य पद्धतीने करणार का? याबद्दल शंका निर्माण होत आहे.
१७८ रेशन दुकानांमध्ये पोहोचला मोफत तांदूळ
लॉकडाऊनमुळे एप्रिल, मे आणि जून असे तीन महिने दिल्या जाणाºया ५ किलो मोफत तांदळापैकी एप्रिल महिन्याचा तांदूळ १९८ पैकी १७८ रेशन दुकानांमध्ये पोहोचला आहे. मात्र एप्रिल महिन्याच्या नियतनातील नियमित गहू आणि तांदळाचे वाटप करण्यास प्रथम प्राधान्य दिले जात असल्यामुळे काही ठिकाणी मोफत तांदळाचे वाटप सुरू झालेले नसल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान सदर तांदूळ वाटपासंदर्भात कोणत्या तक्रारी आल्यास त्याची चौकशी होऊन संबंधित रेशन दुकानदारावर कारवाई केली जाणार आहे. सिरोंचा तालुक्यात अशा तक्रारी आल्या असून तहसीलदारामार्फत त्यांची चौकशी केली जात आहे.
‘फोर्टिफाईड’ तांदळाला बगल
जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या रेशन कार्डधारकांना पौष्टिक तांदूळ मिळावा यासाठी टाटा ट्रस्टच्या वतीने फोर्टिफाईड (गुणवर्धक) तांदूळ पुरविला जातो. हा फोर्टिफाईड तांदूळ १०० किलो तांदळात एक किलो या प्रमाणात मिसळून तो रेशन दुकानांमधून वाटप केला जातो. परंतू लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर फोर्टिफाईड तांदूळ येणे बंद झाल्याने जिल्हाभरात साधाच तांदूळ वाटप केला जात आहे.
वाढीव कार्डधारकांचे नियतन मंजूर करण्यासाठी मंत्रालयाकडे पाठपुरावा केला जात आहे. पण सध्या लॉकडाऊनमुळे तिथे मर्यादित अधिकारी-कर्मचारी हजर असल्यामुळे नियतन मंजुरीची फाईल प्रलंबित आहे. हे नियतन मंजूर होईल असे गृहित धरून संबंंधित लाभार्थींना तांदूळ वाटप करणे शक्य होईल, पण त्यासाठी गहू उपलब्ध नाही.
- नरेंद्र भागडे,
जिल्हा पुरवठा अधिकारी