३०९७ बालके कुपोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 23:24 IST2018-07-05T23:23:04+5:302018-07-05T23:24:58+5:30

३०९७ बालके कुपोषित
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मागे असला तरी बालकांना सदृढ आहार मिळण्याच्या सर्व उपाययोजना सरकारी खर्चातून करण्यात आल्या आहेत. तरीही जिल्ह्यात आजच्या स्थितीत तब्बल ३०९७ बालक कुपोषित आहेत. त्यामुळे पोषण आहाराच्या कार्यक्रमावरच प्रश्नचिन्ह लागले आहे.
मे २०१८ मध्ये जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाकडून ० ते ५ वर्षे वयोगटातील ७९ हजार ९१८ बालकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यापैकी ७९ हजार ९ बालकांचे वजन घेतले असता १३ हजार ४७७ बालकांचे वजन अपेक्षित वजनापेक्षा कमी आढळले. त्यातही ३२९१ बालकांचे वजन अतिशय कमी आढळले. अंगणवाड्यांच्या माध्यमातून या सर्व बालकांना नियमित आहार पुरविला जात असताना एवढ्या मोठ्या संख्येने बालक कमी वजनाचे कसे आढळले ही बाब आश्चर्यात टाकणारी आहे.जिल्हाभरात अंगणवाड्यांच्या माध्यमातून ५ वर्षेपर्यंतच्या बालकांसह गरोदर आणि स्तनदा मातांनाही पोषक आहार दिला जातो. अंगणवाड्यांमध्ये येऊ न शकणाऱ्यांना घरपोच आहाराचीही सोय केली जाते. दर महिन्याला त्या बालकांचे वजन करण्याची सोय अंगणवाड्यांमध्येच केली जाते. कोणत्या बालकाचे वजन कमी आहे, का कमी आहे याची तपासणी करून त्यांना त्याप्रमाणे आहार दिला जातो. तरीही वजन वाढत नसेल तर रुग्णालयात भरती केले जाते. मात्र ही सर्व कामे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात इमानदारीने होतच नाही. या कामांवर देखरेख ठेवणारे तालुकास्तरावरील अधिकारीही बसल्या जागेवरूनच अहवाल तयार करून पाठवितात. परिणामी शासनाचे पोषण आहारावर खर्च होणारे कोट्यवधी रुपये पाण्यात जात आहेत.नियमित पोषण आहार दिला जात असेल तर कुपोषित बालकं राहतातच कशी, याचे उत्तर कोणत्याच अधिकाºयांकडे नाही. यावरून योजना कितीही चांगली असली तरी त्याच्या अंमलबजावणीत गडबड आहे हे स्पष्ट होत आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन त्या कुपोषित बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी योग्य ते निर्देश देऊन तपासणी करणे गरजेचे झाले आहे.