२८२ गावांत धान्य धाडण्याचे काम वेगात
By Admin | Updated: May 30, 2014 23:41 IST2014-05-30T23:41:11+5:302014-05-30T23:41:11+5:30
पावसाळ्यात दरवर्षी अतवृष्टी होऊन जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत होत असते. जिल्ह्यात नदी व नाल्यांची संख्या लक्षात घेता दुर्गम भागातील नागरिकांना आपत्तीचा सामना करावा लागू नये,

२८२ गावांत धान्य धाडण्याचे काम वेगात
दुर्गम तालुके : पावसाळ्यात अनेक गावांचा तुटतो संपर्क
दिलीप दहेलकर - गडचिरोली
पावसाळ्यात दरवर्षी अतवृष्टी होऊन जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत होत असते. जिल्ह्यात नदी व नाल्यांची संख्या लक्षात घेता दुर्गम भागातील नागरिकांना आपत्तीचा सामना करावा लागू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासूनच नियोजन केले आहे. पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण संपर्क तुटणार्या दुर्गम तालुक्यातील २८२ गावांना नवसंजीवन योजनेंतर्गत चार महिन्याचे धान्य पोहोचविण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे.
पावसाळ्याच्या दिवसात अतवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण होते. परिणामी अनेक गावांचे रस्ते बंद होऊन तेथील नागरिकांचा संपर्क तुटतो. गतवर्षी चारदा अतवृष्टी होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान जिल्ह्यातील दुर्गम तालुक्यातील शेकडो गावांचा अनेक दिवस संपर्क तुटला होता. परिणामी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अतवृष्टी व पूरपरिस्थितीदरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून नवसंजीवन योजनेची अंमलबजावणी केल्या जात आहे.
अतवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने जिल्ह्यातील ६ अतिदुर्गम तालुके प्रभावित होत असतात. यात धानोरा, मुलचेरा, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा व अहेरी आदींचा समावेश आहे.
या तालुक्यातील एकूण २८२ गावांचा नवसंजीवन योजनेत समावेश आहे. या गावातील नागरिकांना १२३ स्वस्त धान्य दुकानातून जून, जुलै, ऑगस्ट या चार महिन्याच्या कालावधीचे धान्य पोहोचविले जात आहे. नवसंजीवन योजनेंतर्गत धानोरा तालुक्यातील १४, मुलचेरा ३, अहेरी ८९, सिरोंचा ४३, एटापल्ली ७0 व भामरागड तालुक्यातील ६३ अशा एकूण २८२ गावातील एपीएल, बीपीएल, अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना एकूण १९ हजार ९६६ क्विंटल धान्य लागणार आहे. धान्य पुरविण्याच्या कामाला वेग आला असून आतापर्यंत ७५ टक्के गावांना धान्य पोहोचले असल्याची माहिती आहे. उर्वरित गावांमध्ये ३१ मेपर्यंत चार महिन्याच्या कालावधीचे धान्य पोहोचणार असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून मिळाली आहे. संपर्क तुटणार्या गावातील नागरिक स्वत धान्य दुकानातून धान्याची उचल करीत आहेत.