२६ हजार शेतकरी मदतीसाठी पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 06:00 AM2019-11-21T06:00:00+5:302019-11-21T06:00:26+5:30
दिवाळीपूर्वी व दिवाळीनंतर म्हणजे ऑक्टोबर महिन्यात परतीच्या वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले. राज्यपालांनी जाहीर केलेल्या निकषानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. ३३ टक्केपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे. या निकषानुसार गडचिरोली जिल्ह्यात १६ हजार ७२२ हेक्टर क्षेत्र मदतीस पात्र ठरले आहे.
दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ऑक्टोबर महिन्यात झालेली अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील धान व कापूस पिकाचे नुकसान झाले. सर्वेक्षणानुसार २५ हजार ९३९ शेतकऱ्यांचे १६,७२२.१० हेक्टर क्षेत्र बाधित झाले. नुकसानग्रस्त या २६ हजार शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ८ हजार रुपयानुसार नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शासनाकडून गडचिरोली जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात ३ कोटी ४० लाख ६७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. सदर निधी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदारांकडे बुधवारीच वळता करण्यात आला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी जमा करण्यात येणार आहे.
दिवाळीपूर्वी व दिवाळीनंतर म्हणजे ऑक्टोबर महिन्यात परतीच्या वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले. राज्यपालांनी जाहीर केलेल्या निकषानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. ३३ टक्केपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे. या निकषानुसार गडचिरोली जिल्ह्यात १६ हजार ७२२ हेक्टर क्षेत्र मदतीस पात्र ठरले आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी व परतीच्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील पिकांना फटका बसला. महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने थेट बांधावर जाऊन सर्वेक्षणाची मोहीम राबविण्यात आली. हे सर्वेक्षण जवळपास २० ते २५ दिवस चालले. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने नुकसानीचा गोषवारा तयार करण्यात आला.
या अहवालानुसार शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील १६ हजार ७२२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. यासाठी शासनाकडे १२ कोटी ४९ लाख १९ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तेवढीच मदत शासनाकडून मिळणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला ३ कोटी ४० लाख ३७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. राज्यपालांनी जाहीर केलेल्या निकषानुसार फळबागांच्या नुकसानीसाठी प्रतीहेक्टरी १३ हजार व धान, कापूस व इतर पिकांसाठी प्रती हेक्टर ८ हजाराची मदत देय आहे. जिल्ह्याला प्राप्त झालेला निधी जवळपास २५ टक्के आहे. उर्वरित ७५ टक्के निधी प्राप्त होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
तूर्तास सरसकट मदत नाही
गडचिरोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसला. शेतकरी नुकसानीमुळे हैराण झाले. परिणामी पेरणी व रोवणी लांबली. त्यानंतरही शेतकऱ्यांनी पिकांची लागवड केली. त्यानंतर परतीच्या पावसाने आॅक्टोबर महिन्यात कहर केला. त्यामुळे सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी व अपेक्षा शेतकऱ्यांची होती. मात्र शासनाकडून शेतकऱ्यांना तुर्तास सरसकट मदत उपलब्ध झाली नाही. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणानुसार २५ हजार ९३९ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.
अतिवृष्टी व पावसामुळे १६ हजार ७२२ हेक्टर क्षेत्र बाधित
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६ हजार ७२२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. सर्वेक्षणानुसार एवढेच क्षेत्र बाधित झाल्याची नोंद आहे. तालुक्यात बाधित झालेल्या क्षेत्रानुसार नुकसानभरपाईचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर निधी संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन ते तीन टप्प्यात मिळणार आहे. १२ कोटी ४९ लाख १९ हजार इतका निधी नुकसानभरपाईसाठी मिळणार असून पहिल्या टप्प्यात ३ कोटी ४० लाख ६७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.