१६१ गावांत ‘एक गाव-एक गणपती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:15 IST2017-08-23T23:14:53+5:302017-08-23T23:15:17+5:30
गावागावात शांतता व सुव्यवस्था राहून सामाजिक सलोखा टिकावा तसेच भांडण, तंट्यांचा मागमूसही नसावा,.....

१६१ गावांत ‘एक गाव-एक गणपती’
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गावागावात शांतता व सुव्यवस्था राहून सामाजिक सलोखा टिकावा तसेच भांडण, तंट्यांचा मागमूसही नसावा, शिवाय गावात एकतेची भावना वृंद्धिगत व्हावी या उदात्त हेतूने गेल्या अनेक वर्षांपासून ‘एक गाव-एक गणपती’ची संकल्पना गडचिरोली जिल्ह्यात राबविली जात आहे. यंदा जिल्ह्याच्या ९ पोलीस विभागाच्या हद्दीतील तब्बल १६१ गावांमध्ये ‘एक गाव-एक गणपती’ची संकल्पना साकारण्यात येणार आहे. त्यादृष्टीने संबंधित गणेश मंडळांनी पोलीस विभागाकडे रितसर नोंदणी केली आहे.
जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात यंदा ५४५ सार्वजनिक मंडळातर्फे श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मंडळांच्या पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांनी यंदाचा गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. २५ आॅगस्ट रोजी शुक्रवारपासून यंदा गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. त्यादृष्टीने शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या हेतूने प्रत्येक पोलीस ठाणेस्तरावर गणेश मंडळांच्या पदाधिकाºयांची शांतता सभा घेतली जात आहे. गतवर्षीही गडचिरोली जिल्ह्यात १०० वर गावात ‘एक गाव, एक गणपती’ची संकल्पना साकारण्यात आली होती. सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी गणेशोत्सवाच्या तयारीला लागले असून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होणाºया ठिकाणची जागा स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी भव्यदिव्य मंच तयार केला जात आहे. याशिवाय विद्युत रोषणाई व वाद्यांचे नियोजन मंडळातर्फे करण्यात आले आहे. यावर्षी जिल्ह्यातील काही गणेश मंडळ रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर आदी सामाजिक उपक्रमासह प्रबोधनात्मक कार्यक्रमही आयोजित करणार आहेत. सार्वजनिक गणेश मंडळाचा मनोरंजनात्मक कार्यक्रमावरही भर राहणार आहे. त्यादृष्टीने मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते गणेशोत्सवाच्या तयारीला जोमात भिडले आहेत.
यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक गडचिरोेली पोलीस उपविभागाच्या हद्दीतील ५९ गावांमध्ये ‘एक गाव - एक गणपती’ची संकल्पना राबविली जाणार आहे. या संकल्पनेसाठी संबंधित गावांनी काही दिवसांपूर्वीच बैठक घेतली. या बैठकीत बहुमताने निर्णय झाल्यावर रितसर पोलीस विभागाकडे नोंदणी करण्यात आली.
ही संकल्पना राबविणारे अनेक गणेश मंडळ सामाजिक उपक्रम राबविणार आहेत.
महावितरणची वीज चोरट्यांवर करडी नजर
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी चोरीची वीज वापरू नये, यासाठी महावितरणच्या वतीने उत्सवकाळात मंडळांना सवलतीच्या दरात वीज जोडणी दिली जाते. उत्सव मंडळांना प्रतीजोडणी प्रतीमाह ३३० रूपये स्थिर आकार तर प्रती युनिट ४३१ रूपये अस्थिर आकार आकारण्यात येणार आहे. वीज जोडणीसाठी उत्सव मंडळांना सदर कालावधीसाठी १ हजार रूपये सुरक्षा रक्कम भरावी लागणार आहे. या उत्सव मंडळांना प्राधान्याने वीज जोडणी देण्याबाबत महावितरणच्या सर्व क्षेत्रिय अधिकाºयांना महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकाने निर्देश दिले आहेत. सार्वजनिक मंडळांनी उत्सव काळासाठी महावितरणकडून रितसर वीज जोडणी घ्यावी, याकरिता जनजागृती सुरू आहे. उत्सव काळात महावितरणचे अधिकारी व कर्मचाºयांची वीज पुरवठा व चोरीवर करडी नजर राहणार आहे. तपासणीकरिता महावितरणचे पथकही गठित करण्यात आले आहे.
तगडा पोलीस बंदोबस्त राहणार
शुक्रवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून प्रतिष्ठापनेपासून तर विसर्जन मिरवणुकीच्या दिवसापर्यंत जिल्ह्याच्या सर्व पोलीस ठाण्यातर्फे सार्वजनिक गणेश उत्सवाच्या ठिकाणी तगडा पोेलीस बंदोबस्त राहणार आहे. पोलिसांच्या दिमतीस शेकडो गृहरक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी गणेशोत्सवादरम्यान सुरक्षा व्यवस्था सांभाळणार आहेत.