बसमध्ये बिघाड आल्याने प्रवाशांची १५ किमी पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST2021-02-05T08:48:14+5:302021-02-05T08:48:14+5:30
अहेरीवरून सकाळी ७.१५ वाजता सुटणारी अहेरी-कांदोळी बस एटापल्लीवरून परत येत असताना सकाळी ९ वाजताच्या दरम्यान आलापल्ली व तोंडेल फाट्याच्या ...

बसमध्ये बिघाड आल्याने प्रवाशांची १५ किमी पायपीट
अहेरीवरून सकाळी ७.१५ वाजता सुटणारी अहेरी-कांदोळी बस एटापल्लीवरून परत येत असताना सकाळी ९ वाजताच्या दरम्यान आलापल्ली व तोंडेल फाट्याच्या मध्ये अचानक बंद पडली. यात आलापल्ली येथे ये-जा करणारे विद्यार्थी तथा नागपूरला जाणारे प्रवासी बसून होते. ही बस ९.१५ वाजता आलापल्लीवरून परत एटापल्लीकडे जात असते. त्यामुळे अनेक कर्मचारी याच बसने प्रवास करतात. मात्र बस आलापल्ली येथे न पोहोचल्याने विद्यार्थी आलापल्ली येथे शाळेच्या पहिल्या दिवशी वेळेवर पोहोचू शकले नाहीत.
९ वाजता बसमध्ये बिघाड आल्यानंतरही ११ वाजतापर्यंत अहेरी आगारातून दुरुस्ती पथक बस दुरुस्तीसाठी आले नाही. त्यामुळे प्रवासी तथा विद्यार्थी जंगलात ताटकळत होते. बसमधील बिघाडामुळे कांदोळी फेरी रद्द करण्यात आल्याने एटापल्ली येथे कामानिमित्त आलेले नागरिक बुर्गी, कांदोळी येथे १५ किमीचे अंतर पायी कापून गावाला परत गेले. अहेरी आगाराच्या बहुतांश बसेस भंगार झाल्या आहेत. ग्रामीण भागात चालणाऱ्या बसेस या नेहमीच रस्त्यात बिघाड येऊन जंगलात उभ्या कराव्या लागतात. आगार व्यवस्थापकांनी याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवासी तथा विद्यार्थ्यांनी केली आहे.
बाॅक्स
डिझेलच्या तुटवड्यामुळे अनेक बसफेऱ्या उशिरा
अहेरी आगारात मागील ४ ते ५ दिवसांपासून डिझेलचा तुटवडा आहे. एटापल्ली मार्गावरच डिझेल संपल्याने एक बस जंगलात उभी करावी लागली. तसेच मंगळवारी सकाळपासून अनेक बसफेऱ्या सोडण्यात आल्या नाही तर काही फेऱ्या दुपारी सोडण्यात आल्या. अहेरी आगारात मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणात डिझेल प्राप्त हाेत असल्याने अनेक बसफेऱ्या रद्द हाेत आहेत.