१४ हजार लोक गृह विलगीकरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST2020-04-01T05:00:00+5:302020-04-01T05:00:40+5:30

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदीमध्ये बाहेर न पडता घरात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यातही बाहेरून आलेल्या लोकांना गृह विलगीकरणाचा शिक्का मारल्याने त्यांनी घरातील इतर सदस्यांसोबतही विशिष्ट अंतर ठेवूनच राहणे अपेक्षित आहे. त्याचे पालन सर्वांनी करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.

14,000 people in home isolation | १४ हजार लोक गृह विलगीकरणात

१४ हजार लोक गृह विलगीकरणात

ठळक मुद्देहातावर मारले शिक्के : बाहेरच्या जिल्ह्यातून आल्याने १४ दिवस घराबाहेर न निघण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्यामुळे अत्यावश्यक सेवेशिवाय कोणालाही घराबाहेर निघण्यास मनाई आहे. मात्र बाहेरच्या जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात आलेल्यांना कोणत्याच कारणासाठी घराबाहेर पडण्यास मनाई करून त्यांच्या हातावर ‘होम क्वॉरंटाईन’ (गृह विलगिकरण)चे शिक्के मारण्यात आले आहेत. दरम्यान अशा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या आता १४ हजार २८७ वर पोहोचल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदीमध्ये बाहेर न पडता घरात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यातही बाहेरून आलेल्या लोकांना गृह विलगीकरणाचा शिक्का मारल्याने त्यांनी घरातील इतर सदस्यांसोबतही विशिष्ट अंतर ठेवूनच राहणे अपेक्षित आहे. त्याचे पालन सर्वांनी करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १४ दिवस त्यांनी घरातच थांबून होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करणे गरजेचे आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १५५२ नागरिकांचा नागरिकांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यामुळे त्यांना शंकामुक्त करण्यात आले.
कोरोना संसर्गाची लक्षणे जरी उशिरा दिसत असली तरी त्याची लक्षणे दिसण्यापूर्वीच संसर्गाची लागण इतरांना होऊ शकते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या सर्वच नागरिकांना घरात राहणे बंधनकारक केले आहे. त्यांच्या हातावर आरोग्य विभागाने शिक्के मारले आहेत. या लोकांमध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे दिसतात का, याबाबतचे निरीक्षण आरोग्य विभागाकडून केले जात आहे.

ही लक्षणे दिसल्यास तातडीने कळवा
आरोग्य विभागाकडून अशा लोकांच्या हातावर शिक्के व घरावर स्टिकर लावण्यात आले आहेत. तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी स्थानिक पातळीवर दैनंदिन निरीक्षणे नोंदवत आहेत. यातील काही लोकांना ताप, खोकला, शिंका अशी लक्षणे दिसल्यास त्यांची पुढील तपासणी केली जात आहे. अशा वेळी घरातील इतर सदस्यांनी जर काही लक्षणे संबंधित व्यक्तीमध्ये आढळून आल्यास याबाबत तातडीने आरोग्य विभागाला कळवावे, जेणेकरून वेळेत त्याबाबत उपचार करता येतील.

असे करा गृह विलगीकरण
कोरोनाबाधित प्रदेशातून आलेल्या व्यक्तीने समाजापासून तसेच स्वत:च्या कुटुंबातील इतर सदस्यांपासून दूर राहणे म्हणजे गृह विलगीकरण होय. यामध्ये आरोग्याच्या दृष्टीने आपल्यापासून इतरांना संसर्ग होऊ न देण्याची काळजी घ्यावी लागते. दैनंदिन वापरावयाच्या वस्तू, कपडे, भांडी वेगळ्या स्वरूपात वापरणे या घटकांचा समावेश यामध्ये आहे. गृह विलगीकरणाचा कालावधी एकूण १४ दिवसांचा आहे. या कालावधीत कोरोना आजाराची कोणतीही लक्षणे किंवा आजार आढळून न आल्यास त्या व्यक्तीला १४ दिवसानंतर होम क्वारंटाईनमधून बाहेर येता येते.

गृह विलगीकरण केलेल्या व्यक्तीची शौचालय व्यवस्थाही वेगळी असावी. संबंधित व्यक्तीने साबण, सॅनिटायझर, मास्क अशा आवश्यक बाबी स्वतंत्र वापरणे गरजेचे आहे. घरातील इतर सदस्यांनी या व्यक्तीपासून संसर्ग होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी. लक्षणे दिसत नसली तरी याबाबत आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.

Web Title: 14,000 people in home isolation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.