शिळे अन्न का धोकादायक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 14:44 IST2026-01-25T14:43:50+5:302026-01-25T14:44:08+5:30
Food: आजच्या धावपळीच्या जीवनात वेळेअभावी अनेक घरांत जास्त प्रमाणात अन्न केले जाते. त्यातील काही अन्न शिल्लक ठेवले जाते आणि नंतर पुन्हा गरम करून खाल्ले जाते. मात्र ही सवय आरोग्यास हानिकारक ठरू शकते. शिळे अन्न दिसायला जरी ठीक वाटत असले, तरी त्यात सूक्ष्म जंतू वाढलेले असू शकतात.

शिळे अन्न का धोकादायक?
- डॉ. रेणू सिंह-मोकाशी
(सदस्य, मायक्रोबायोलॉजिस्ट्स सोसायटी, इंडिया)
आजच्या धावपळीच्या जीवनात वेळेअभावी अनेक घरांत जास्त प्रमाणात अन्न केले जाते. त्यातील काही अन्न शिल्लक ठेवले जाते आणि नंतर पुन्हा गरम करून खाल्ले जाते. मात्र ही सवय आरोग्यास हानिकारक ठरू शकते. शिळे अन्न दिसायला जरी ठीक वाटत असले, तरी त्यात सूक्ष्म जंतू वाढलेले असू शकतात. हे जंतू डोळ्यांना दिसत नाहीत; पण ते शरीरावर गंभीर दुष्परिणाम करू शकतात. फार काळ ठेवलेली भाजी, भात किंवा आमटीत जंतूसंसर्ग होऊ शकतो. उष्ण व दमट वातावरणात अन्न लवकर खराब होते. असे अन्न खाल्ल्यामुळे पोटदुखी, जुलाब, उलटी, अॅसिडिटी, ताप किंवा अंगात अशक्तपणा जाणवू शकतो. काही वेळा अन्नविषबाधा (फूड पॉइझनिंग) होण्याचीही शक्यता असते. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गर्भवती आणि रुग्णांसाठी शिळे अन्न अधिक धोकादायक ठरते. त्यांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे शिळ्या अन्नाचा त्रास लवकर आणि तीव्र स्वरूपात होतो.
फ्रिजमध्ये ठेवलेले अन्नही अमर्याद काळ सुरक्षित राहते, असा अनेकांचा गैरसमज आहे. प्रत्यक्षात फ्रिजमधील अन्नही ठराविक कालावधीसाठीच योग्य असते. बहुतेक शिजवलेले अन्न २४ तासांच्या आत वापरणेच योग्य ठरते. अन्न वारंवार बाहेर काढून गरम केल्यास त्यातील पौष्टिक घटक नष्ट होतात आणि चवीतही फरक पडतो. शिवाय, पुन्हा-पुन्हा गरम करताना अन्न दूषित होण्याचा धोका वाढतो आणि जंतुवाढीस पोषक वातावरण तयार होते.
गरजेपुरतेच अन्न शिजवा
- शिळे अन्न टाळण्यासाठी काही लहान पण महत्त्वाच्या सवयी अंगीकारता येतात. गरजेपुरतेच अन्न शिजवणे, उरलेले अन्न स्वच्छ व कोरड्या भांड्यात झाकून ठेवणे, अन्नावर तारीख लिहिणे आणि शक्यतो दुसऱ्या दिवशी पुन्हा न वापरणे या सवयी आरोग्यास उपयुक्त ठरतात.
- उन्हाळ्यात उरलेले अन्न खोलीच्या तापमानावर ठेवण्याऐवजी योग्य काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे. थोडे-थोडे पण ताजे अन्न शिजवण्याची सवय लावल्यास शिळ्या अन्नाचा प्रश्नच उरत नाही.
- आरोग्य टिकवण्यासाठी औषधांपेक्षा अन्नाकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. ताजे, स्वच्छ आणि योग्य वेळी घेतलेले अन्न शरीरासाठी हितकारक ठरते. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने ताजेपणाला नेहमीच प्राधान्य देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.