"नाश्ता नाही, आहारात भाकरी अन् पालेभाज्या..."; राज मोरेचं फिटनेस सीक्रेट वाचून चकीत व्हाल, घटवलं ५ किलो वजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 16:18 IST2026-05-10T15:41:51+5:302026-05-10T16:18:01+5:30
"गोड जास्त खात नाही...",'वीण दोघांतली तुटेना' फेम राज मोरेने सांगितली दिनश्चर्या, असं ठेवतो स्वत:ला फिट; जाणून घ्या त्याचा फिटनेस प्लॅन !

"नाश्ता नाही, आहारात भाकरी अन् पालेभाज्या..."; राज मोरेचं फिटनेस सीक्रेट वाचून चकीत व्हाल, घटवलं ५ किलो वजन
Raj More Diet Plan: राज मोरे हा मराठी मालिका विश्वातील एक अत्यंत लोकप्रिय आणि हरहुन्नरी अभिनेता आहे. सध्या तो झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' या नव्या मालिकेत तेजश्री प्रधान हिच्या भावाची भूमिका साकारताना दिसतो आहे. या आधी याच वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या गाजलेल्या मालिकेत त्याने काम केलं आहे. या मालिकेच्या चित्रीकरणानंतर त्याने स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष केंद्रित करत चक्क ५ किलो वजन यशस्वीरीत्या कमी केले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आपल्या फिटनेस आणि आहाराबद्दल अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या.
नुकतीच राज मोरेने राजश्री मराठीला मुलाखत दिली. वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल बोलताना राज मोरे याने सांगितलं, रात्री उशिरा म्हणजे अगदी अकरा , बारा किंवा एक वाजता जेवण्याची त्याची चुकीची सवय होती. शूटिंगच्या वेळा निश्चित नसल्यामुळे हा त्रास होत होता. मात्र ही सवय त्याने आता पूर्णपणे मोडली आहे. या एका मोठ्या बदलाचा त्याला खूप फायदा झाला. नवरी मिळे हि़टलरला मालिकेनंतर राजने तब्बल पाच किलो वजन घटवल्याचं सांगितलं. या मुलाखतीत राज म्हणाला," माझ्याकडे डब्यात नेहमी भाजलेले शेंगदाणे, प्रोटीन शेक या गोष्टी असतात. जेवण झाल्यानंतर मी नेहमी ताक पितो. तसंच सॅलडसाठीही मी एक वेगळा डब्बा घेऊन जातो." शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळेल तसा तो सेटवरही व्यायाम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, असंही राजने यादरम्यान सांगितलं.
आपल्या आहाराबद्दल आणि दिनश्चर्येत केलेल्या बदलाबद्दल सांगताना राज म्हणाला, "माझ्या जेवणाची वेळ आधी ठरलेली नसायची. शूटिंग करताना जेवणाच्या वेळा फिक्स नसतात. त्यामुळे माझं रात्रीचं जेवण अकरा-बारा तर कधी एक या दरम्यान व्हायचं. हे मी कमी केलं आणि त्यानंतर मी थोडं व्यायामाकडे लक्ष दिलं. नवरी मिळे हिटलरला संपल्यानंतर मी पाच किलो वजन कमी केलं. असे बदल मी केले आहेत. तसंच मी गोड जास्त खात नाही. त्यामुळे गोड नाही खाल्लं तरी मला काही फरक पडत नाही."
अभिनेत्याच्या आहारात असतात हे पदार्थ...
मग राज म्हणाला, "आमच्या घरी एक नियम आहे की रोज एकतरी पालेभाजी बनवली जाते. घरी भाज्या, भाकरी आईच बनवते. पण, प्रोटिनयुक्त जे पदार्थ असतात ते मी बनवतो. तांदळाची भाकरी मला खूप आवडते आणि ती पालेभाजीसोबत छान लागते. त्यामुळे भाकरी नेहमीसोबत आणतो. पण, हे पदार्थ रोज बदलत असतात. " यापुढे राज त्याच्या फिटनेसबद्दल म्हणाला, " मी बदलापूरवरून ऑडिशनसाठी प्रवास करायचो. कधी ४ ते कधी ५ अशा वेळी मला घरातून बाहेर पडावं लागायचं. तेव्हापासून नाश्ता वगैरे करणं जमायचं नाही, त्यामुळे काही फरक पडला नाही. मग सेटवर आल्यानंतरच मी जेवायचो. तसंच व्यायामही करतो. आठवड्यातून मी चार-पाच दिवस व्यायाम करतो. " असा फिटनेस प्लॅन अभिनेत्याने सांगितला.