विद्यापीठाच्या ३०४ परीक्षा बंद करण्याचा निर्णय; कामकाजात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी ठरणार लाभदायी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 07:16 IST2026-02-13T07:16:46+5:302026-02-13T07:16:46+5:30
वेळेमध्ये बचत होऊन प्रशासन अधिक कार्यक्षम होणार

विद्यापीठाच्या ३०४ परीक्षा बंद करण्याचा निर्णय; कामकाजात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी ठरणार लाभदायी
मुंबई - मुंबई विद्यापीठानेपरीक्षा प्रणालीत मोठे फेरबदल करत अनेक वर्षांपासून शून्य नोंदणी असलेल्या आणि बंद होऊन १० वर्षे उलटलेल्या तब्बल ३०४ परीक्षा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून विद्यापीठाच्या वेळेमध्ये बचत होऊन प्रशासन अधिक कार्यक्षम होणार आहे.
मुंबई विद्यापीठाकडून घेतल्या जाणाऱ्या १२५ परीक्षांना गेल्या दोन ते तीन वर्षात एकाही विद्यार्थ्याने नोंदणी केली नाही. तर जवळपास १७९ अभ्यासक्रम बंद होऊन १० वर्षांहून अधिक कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र दरवर्षी विद्यापीठ या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करत होते. तसेच प्रशासनाच्या कामकाजात त्यांचा समावेश होता. त्यातून या परीक्षांच्या पडताळणीसाठी यंत्रणा राबवावी लागत असे. त्यातून विद्यापीठाच्या कामकाजात अनावश्यक भर पडत होती. या पार्श्वभूमीवर पकामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी निष्क्रिय परीक्षा म्हणून घोषित केल्या. या निर्णयामुळेअतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होईल, असे संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी नमूद केले आहे.
...तर परीक्षा घेता येणार
या अभ्यासक्रमांना कोणत्याही संलग्नित महाविद्यालयातील किंवा संस्थेकडून विद्यार्थी नोंदणी बाबतचा प्रस्ताव प्राप्त झाल्यास फक्त या अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यासाठी विद्यापीठाकडून या परीक्षा पुनर कार्यान्वित केल्या जाणार असून परीक्षा कार्यक्रम, प्रश्नपत्रिका निर्मिती, परीक्षक नियुक्ती व इतर परीक्षा प्रक्रिया विद्यापीठाकडून नियमानुसार राबविण्यात येईल. ज्या अभ्यासक्रमांचा कालावधी १० वर्षे पूर्ण झाला आहे अशा अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येणार नाहीत, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.