अस्वस्थ इराणमध्ये विद्रोहाची आग इतकी का भडकली?
By विजय दर्डा | Updated: January 5, 2026 05:03 IST2026-01-05T05:02:12+5:302026-01-05T05:03:09+5:30
एखादी सत्ता आपल्याच लोकांबाबत क्रूर होते तेव्हा दुसऱ्याला त्या आगीत तेल ओतून आपली पोळी भाजण्याची संधी मिळते. इराणमध्ये हेच होत आहे.

अस्वस्थ इराणमध्ये विद्रोहाची आग इतकी का भडकली?
डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
इस्लामिक प्रजासत्ताक असलेल्या इराणमध्ये आपल्याला ताजी हवा मिळावी अशी इच्छा बाळगणाऱ्यांच्या मनात असंतोषाची आग दीर्घकाळापासून धुमसते आहे. परंतु ही आग अचानक भडकली कशी? या जनविद्रोहाच्या मुळाशी केवळ महागाई आणि बेरोजगारी हीच कारणे आहेत काय? की मानवाधिकार किंवा स्त्री स्वातंत्र्य फौजी बुटाखाली चिरडणाऱ्या खामेनेई सरकारला उलथून टाकण्याची ही मोठी योजना आहे?
रस्त्यावरची निदर्शने, पोलिस ठाण्यांवर हल्ले आणि निदर्शकांचा सैनिकतळावर घुसण्याचा प्रयत्न यातून हा जनविद्रोह किती प्रबळ आहे हेच दिसते.. हजारो लोकांना अटक झाली आणि कित्येक निदर्शक पोलिसांच्या गोळ्यांनी मारले गेले. मशहद शहरातून सुरू झालेली जाळपोळ संपूर्ण इराणमध्ये पसरली असून, २००९ नंतर राष्ट्रपती निवडणुकीनंतरच्या जनआक्रोशाने सत्तेला सरळ सरळ आव्हान दिल्याचे हे पहिले प्रकरण आहे. ‘सरकार बरखास्त करावे’, अशी मागणी करणारे निदर्शक परराष्ट्र धोरणावरही टीका करत आहेत.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांना मृत्युदंड देण्याच्याही घोषणा दिल्या जात आहेत. हे खामेनेई पुन्हा पुन्हा अमेरिकेला धमक्या देतात. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचे म्हणणे, ‘इराणी जनतेला खूप वर्षांपासून दडपले गेले. तेथील लोक अन्न आणि स्वातंत्र्याचे भुकेले आहेत. मानवाधिकाराबरोबरच इराणच्या संपत्तीची लूट होत आहे. बदल करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.’
अगदी असाच सूर इराणचे पूर्व शासक शाह मोहम्मद रझा पेहलवी यांचे पुत्र शाह रझा पेहलवी यांनीही आळवला आहे. ते लोकांना रस्त्यावर उतरून राष्ट्रीय क्रांतीत भाग घेण्याचे आवाहन वारंवार करीत आहेत. हे शाह रझा पेहलवी सध्या अमेरिकेत राहतात. त्यांचे वडील शाह मोहम्मद रझा पेहलवी यांना इराणची सत्ता कशी मिळाली याचीही एक कहाणी आहे. १९५१ मध्ये नॅशनल फ्रंटचे उमेदवार आणि व्यवसायाने वकील असलेले मोसद्देक हे लोकशाही पद्धतीने निवडून येऊन प्रधानमंत्री झाले. ते मोठे धाडसी नेते होते आणि त्यांच्या काळात इराणचा तेल उद्योग ब्रिटनच्या नफेखोर कंपन्या नियंत्रित करत होत्या.
मोसद्देक यांनी एक धाडसी निर्णय घेतला आणि तेल उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केले. त्यामुळे पश्चिमी शक्ती नाराज होणे स्वाभाविक होते. ब्रिटिश गुप्तचर संस्था एमआय सिक्स आणि अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयए यांनी मग सोंगट्या हलविल्या. १९५३ मध्ये इराणमध्ये सत्तापालट झाला आणि पश्चिमी शक्तींनी शाह मोहम्मद रझा पेहलवी यांच्याहाती सत्ता दिली. शाह यांनी इराणी तेलाचा मोठा वाटा अमेरिकी कंपन्यांना दिला. या गोष्टी काही सांगोवांगी नाहीत. खुद्द सीआयएने २०१३ मध्ये अधिकृतपणे याची कबुली दिली आहे.
शाह यांच्या जमान्यात इराणने पुष्कळ प्रगती केली, हे मात्र खरे. त्यांनी देशाला आधुनिकतेच्या रस्त्यावर खूपच पुढे नेले. स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य दिले. इराणमध्ये जवळपास युरोपसारखी स्थिती होती. परंतु कट्टरपंथीयांसह सोवियत युनियनसारख्या शक्तींना इराण अमेरिकेच्या कह्यात जाणे पसंत पडणारे नव्हते. १९७९ मध्ये इराणमध्ये इस्लामी क्रांती झाली. पहलवी यांचे शासन संपुष्टात आले. इराणी विद्यार्थ्यांच्या एका गटाने दि. ४ नोव्हेंबर १९७९ रोजी अमेरिकी दूतावासावर कब्जा केला. विद्यार्थ्यांच्या एका गटाने ५२ अमेरिकी नागरिकांना ४४४ दिवसांपर्यंत ओलीस ठेवले. महाशक्ती अमेरिकेसाठी हा घोर अपमान होता.
सत्तेवर आलेल्या अयातुल्ला खोमेनी यांनी अमेरिकेविरुद्ध रणशिंग फुंकले. तेव्हापासून अमेरिका आणि इराण यांच्यातील नात्यात कडवटपणा उत्पन्न झाला; तो आतापर्यंत चालला. ज्या वाटेवर खोमेनी होते, सध्याचे सर्वोच्च नेते खामेनेई त्याच रस्त्याने जाताना दिसत आहेत. इराण अणुबॉम्ब तयार करण्याच्या निकट पोहोचलेला असून त्याला यापासून दूर ठेवण्यासाठी पश्चिमी शक्ती काहीही करू शकतात. इराणच्या अनेक अणुवैज्ञानिकांना इस्त्रायलने ठार मारले आहे. अमेरिकेने गतवर्षीच इराणच्या तीन अण्वस्त्र ठिकाणांना लक्ष्य केले होते. त्याशिवाय विद्यमान सत्ताही अणुबॉम्ब तयार करण्याविषयी हटवादी असून, खामेनेई यांची सत्ता उलथून टाकणे हाच या परिस्थितीतून सुटकेचा मार्ग आहे, असे महाशक्तींना वाटते.
एखाद्या देशामध्ये अंतर्गत असंतोष निर्माण झाला असेल तर त्याला हत्यार म्हणून वापरण्याची राजनीतीतील जुनी परंपरा आहे. सध्या इराणमध्ये उसळलेल्या लोकक्षोभाच्या मागेही हेच कारण असणार. इराणमध्ये अमेरिका, ब्रिटन, इस्रायल आणि रशियासहित अनेक शक्ती आपापले खेळ खेळत आहेत. आता खामेनेई फ्रंटफूटवर येऊन खेळतात की बॅकफूटवर जातात; याकडे जगाचे लक्ष असेल. या खेळात ते आपली विकेट गमावून बसतील का, हाही प्रश्न आहेच !
जाता जाता - देशातील सर्वांत स्वच्छ शहर म्हणून ज्या शहराच्या मस्तकी टिळा लागला त्या इंदूर शहरात प्रदूषित पाण्याने डझनभर लोकांचा मृत्यू ओढवल्याची बातमी चिंतित करणारी आहे. जास्त क्लेश याचे की प्रदूषित पाणी नळाद्वारे लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्याइतपत आपली यंत्रणा बेपर्वा कशी झाली? त्यानंतर जबाबदार नेतृत्व जी लाजिरवाणी भाषा बोलत आहे ते तर आणखीनच दुःख देणारे आहे. मानवी जीविताचे काहीच मोल नसावे?