-डॉ. प्रवीण शिनगारे (माजी संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय)मागील वर्षी (२०२४) राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) काही विद्यार्थ्यांना दोनदा द्यावी लागली. या नीट परीक्षेतील एका प्रश्नाच्या उत्तरासाठी सर्वोच्च न्यायालयाला आयआयटी दिल्लीच्या संचालकाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी लागली. त्यांनी दिलेल्या निर्णयामुळे हजारो मुलांचे गुण बदलले.
यातील शेकडो मुलांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिळालेला प्रवेश रद्द झाला. त्यांना पुढील राउंडमध्ये खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला. मागील अनुभवावरून प्रशासन सुधारणा करेल आणि यावर्षी (२०२५) ‘नीट’ परीक्षा नीट होईल, अशी विद्यार्थी व पालकांची अपेक्षा होती. पण नॅशनल टेस्टिंग एजन्सीने त्यांचा यावर्षीही भ्रमनिरास केला.
साधारणपणे ५० पर्सेन्टाइल गुण मिळालेला विद्यार्थी हा पात्रता परीक्षा पास झाला असे समजण्यात येते. भारतात २२ लाख विद्यार्थ्यांपैकी १२.३७ लाख विद्यार्थ्यांना पात्र घोषित केले. आता प्रवेशाचा प्रश्न येतो. यासाठी याच परीक्षेतील ऑल इंडिया रँक वापरण्यात येतो.
त्यानुसार सरकारी की खासगी वैद्यकीय महाविद्यालय मिळणार हे ठरते. नीट २०२५ परीक्षेचा निकाल दोन टप्प्यांत जाहीर झाला. पहिल्या टप्यात विद्यार्थ्यांना गुण कळाले. या गुणांच्या आधारे विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
चांगल्या नावाजलेल्या कॉलेजमधील शेकडो मुलांपेक्षा एकाही मुलाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही हे २०२४च्या गुणांच्या तुलनात्मक आकडेवारीवरून दिसून आले. पालकांसोबत संस्थाचालकांचीसुद्धा घाबरगुंडी उडाली.
त्यानंतर निकालाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये राष्ट्रीय गुणवत्ता क्रमांकानुसार यादी जाहीर झाली. त्यामुळे राष्ट्रीय गुणवत्ता (ऑल इंडिया रँक) क्रमांकानुसार प्रवेश सहज मिळतो, हे पालकांना दिसून आले. गुणवत्ता क्रमांकाचा गुणांशी संबंध नसतो तर तो गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिसंख्येवर असतो.
परीक्षक मूल्यांकन प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेले असतात का?
मला खेदाने म्हणावे लागते की असंख्य विद्यार्थी आणि पालकांना परीक्षेतील गुण (पुढील वर्गात जाण्यासाठी) व स्पर्धा परीक्षेतील गुणवता क्रमांक यातील फरक लक्षात येत नाही. नीट २०२५च्या परीक्षेतील ३० ते ४० टक्के प्रश्न हे बहुतांश विद्यार्थ्यांना सोडवता आले नाहीत, म्हणजेच पेपर अवघड होता. नीट परीक्षेमध्ये डिफिकल्टी इंडेक्स व डिस्क्रीमिनेशन इंडेक्स हे योग्य प्रमाणात असावेत हे पाहण्याची जबाबदारी नॅॅशनल टेस्टिंग एजन्सीची आहे. त्यांनी हे प्रमाण योग्य प्रकारे हाताळले नाही.
यूजीसी, एनएमसी व तत्सम राष्ट्रीय परिषद अध्यापकांच्या नियुक्तीमध्ये वरीलप्रमाणे मूल्यांकन प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असली पाहिजे, ही अट घालतात. तशा प्रकारचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण न केलेले अध्यापक हे परीक्षक म्हणून नेमल्यामुळे असे प्रकार घडतात. यामध्ये पालक व विद्यार्थी भरडले जातात. जर या पेपरसेटरनी सदरचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर त्यांना पुन्हा रिफ्रेशर कोर्ससाठी पाठवणे सयुक्तिक ठरेल, त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही.
एका प्रश्नाला फक्त ५५ सेकंद
नीट २०२४ ही परीक्षा २०० प्रश्नांची होती. त्यातील प्रत्येक ५०च्या सेटमध्ये फक्त ४५ प्रश्न सोडविण्याची मुभा होती. सदरची सवलत अचानकपणे रद्द करण्यात आली व २०२५ मध्ये नीट परीक्षा १८० प्रश्नांची घेण्यात आली. यामुळेसुद्धा विद्यार्थ्यांचे गुण कमी झाले. नीट परीक्षेमध्ये ३ विषयांचा समावेश आहे.
परीक्षेमध्ये १८० प्रश्न व वेळ १८० मिनिटे, यातील १५ मिनिटे रिव्हिजनसाठी समजल्यास प्रत्येक प्रश्न जास्तीत जास्त सरासरी ५५ सेकंदात सोडविला पाहिजे. नीट २०२५चा पेपर हा लेन्दी (वेळेत न संपणारा) होता, अशी बहुतांश विद्यार्थांची तक्रार होती.
परीक्षकांची (पेपरसेटर) जबाबदारी आहे की, काढलेले प्रश्न सरासरी वेळेत सर्वसाधारण विद्यार्थ्याला सोडवता येतील. २०२५ नीटमध्ये पेपरसेटर कमी पडले, असे दिसून येते.
समुपदेशकांचा व्यवसाय जोरात
एनटीए ही नामांकित व विश्वासू संस्था म्हणून ओळखली जाते. नीट २०२४ मध्ये ६८० गुणांपेक्षा जास्त गुण मिळवणारे ६,००० विद्यार्थी होते, तर २०२५ मध्ये ६८० गुणांपेक्षा जास्त गुण मिळवणारे फक्त १० विद्यार्थी आहेत, हे कसे?
६८० पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या १० विद्यार्थ्यांच्या कुटुंबामध्ये सुतकी वातावरण काही दिवस होते. विद्यार्थी-पालक पुन्हा दुसऱ्यांदा नीट घ्यावी (२०२६ मध्ये) का? असा विचार करत होते. कारण या गुणांवर २०२४च्या तुलनेत मुंबईच्या केईएम महाविद्यालयातसुद्धा प्रवेश मिळणार नव्हता. पण जेव्हा गुणवत्ता क्रमांक जाहीर झाले तेव्हा या सर्वांच्या असे लक्षात आले की आपण भारतात पहिल्या १० टॉपरमध्ये आहोत.
गोंधळामुळे समुपदेशकांचा व्यवसाय जोरात वाढला. त्यामध्ये पालकांची लाखो रुपयांची होणारी लूटमार वाढतच जाईल. काही मार्गदर्शक चांगले काम करतात. नीट परीक्षा नीटनेटकी घेणे व पालक व विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करणे हे अंतिम ध्येय असले पाहिजे.