संपूर्ण देशाने आसामचे अनुकरण करायला हवे

By विजय दर्डा | Published: September 25, 2017 01:24 AM2017-09-25T01:24:24+5:302017-09-25T01:24:43+5:30

गेल्या आठवड्यात आसाम विधानसभेने एक अभूतपूर्व असे विधेयक मंजूर केले. ‘प्रोणाम (प्रणाम) विधेयक’ असे या विधेयकाचे नाव असून, ते ध्वनिमताने मंजूर केले गेले

The whole country should follow Assam | संपूर्ण देशाने आसामचे अनुकरण करायला हवे

संपूर्ण देशाने आसामचे अनुकरण करायला हवे

Next

गेल्या आठवड्यात आसाम विधानसभेने एक अभूतपूर्व असे विधेयक मंजूर केले. ‘प्रोणाम (प्रणाम) विधेयक’ असे या विधेयकाचे नाव असून, ते ध्वनिमताने मंजूर केले गेले. आसाम सरकारच्या कर्मचा-याने वृद्ध आई-वडिलांची किंवा दिव्यांग असलेल्या भावा-बहिणीची काळजी न घेता त्यांना वा-यावर सोडून दिले तर अशा कर्मचा-याच्या पगारातून १० टक्के रक्कम कापून घेऊन ती अशा निराधारांना देण्याची तरतूद या विधेयकात आहे. लवकरच राज्यातील आमदार, मंत्री, सार्वजनिक उपक्रम, खासगी कंपन्या व केंद्र सरकारी कर्मचाºयांसाठीही अशाच प्रकारचा कायदा केला जाईल, असे आसाम सरकारने स्पष्ट केले आहे.
मुळात आसाम सरकारला असा कायदा करण्याची गरज का पडली, असा प्रश्न तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे. राज्याचे समाजकल्याण मंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनीच विधेयक मांडताना विधानसभेत या प्रश्नाचे उत्तर दिले. ते म्हणाले की, मुले म्हातारपणी विचारत नाहीत म्हणून वृद्ध आई-वडिलांनी वृद्धाश्रमांमध्ये जाण्याचे प्रमाण वाढत आहे. मंत्री बिस्वा यांचे हे म्हणणे शंभर टक्के खरे आहे.
वृद्धांना पूजनीय मानण्याची व त्यांचे हातपाय थकल्यावर त्यांचा आदरपूर्वक सांभाळ करण्याची आपल्या भारताची संस्कृती आहे. मात्र गेल्या काही वर्षांत पाश्चात्त्य संस्कृतीचा अंगिकार केल्याने भारताच्या तरुण पिढीमध्ये कुटुंबव्यवस्थेविषयीचे उपजत प्रेम कमी होऊ लागले आहे. परिणामी तरुण पिढीला घरातील वृद्ध हे ओझे वाटू लागले आहे. सुरुवात अवहेलनेने होते व त्यातूनच पुढे उपेक्षा केली जाते. शेवटी एक दिवस घरातील आजी-आजोबांची रवानगी वृद्धाश्रमात केली जाते. हा विषय केवळ मध्यमवर्ग किंवा गरिबांपुरता मर्यादित नाही. अनेक सधन कुटुंबातील लोकही आपल्या आई-वडिलांना अशी वागणूक देत असल्याचे मी पाहिले आहे. यामुळेच भारतातही वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. पण आश्चर्य असे की, देशात नेमके किती वृद्धाश्रम आहेत, याची नक्की माहिती केंद्रीय समाजकल्याण खात्याकडे नाही. सरकारकडे ही आकडेवारी मात्र नक्की आहे की, सन २०३० पर्यंत भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी १२.५ टक्के लोक ६० किंवा त्याहून अधिक वयाचे वरिष्ठ नागरिक असतील. भारत सरकारला ही आकडेवारी संयुक्त राष्ट्रसंघाकडून मिळालेली आहे. सन २०५० पर्यंत भारतात वृद्धांची संख्या २० टक्क्यांहून अधिक होईल, हेही त्याच अहवालावरून दिसते. जागतिक पातळीवर वृद्धांची ही टक्केवारी सन २०५० पर्यंत १५ टक्के असेल, असेही हा अहवाल सांगतो.
जगाच्या इतर देशांमध्ये वृद्धांची आबाळ व हेळसांड याविषयी चिंता व्यक्त करणे सुरू झाले तेव्हा आपण अशा भ्रमात होतो की, पाश्चात्त्यांची ही लागण आपल्या येथे होणार नाही; कारण आपल्याकडे कुटुंबव्यवस्था बळकट आहे. आपल्याकडे आजी-आजोबांच्या गोष्टी ऐकत मुलांनी मोठे होण्याची परंपरा आहे. आपल्याकडे कौटुंबिक संस्कारांचा पाया मजबूत आहे, असे आपण मानत होतो. परंतु काळाच्या ओघात आपला हा भ्रम खोटा ठरला. ‘हेल्पएज इंटरनॅशनल नेटवर्क’ नावाच्या संस्थेने जगभरातील ९६ देशांमधील वृद्धांच्या स्थितीचे सर्वेक्षण करून ‘ग्लोबल एज वॉच इन्डेक्स’ प्रसिद्ध केला. त्यावरून वास्तव समोर आले. यात वृद्धांची काळजी घेण्यामध्ये स्वित्झर्लंडचा पहिला, नॉर्वेचा दुसरा, स्वीडनचा तिसरा, जर्मनीचा चौथा, कॅनडाचा पाचवा तर भारताचा तब्बल ७२ वा क्रमांक आहे. याचा सरळ अर्थ असा की, वृद्धांसाठी स्वित्झर्लंड हा सर्वात उत्तम देश आहे व भारतातील परिस्थिती खूप वाईट आहे. वृद्धांची ही वाईट स्थिती सुधारण्यासाठी भारताने काही खास प्रयत्नही केले नाहीत, हे त्याहूनही वाईट आहे. आई-वडील मुलांसाठी खस्ता खातात, आपले मन मारून मुलांच्या गरजा पुरवतात. मूल जरा आजारी पडले तरी आई-वडिलांची झोप उडते. मात्र तीच मुले मोठी झाली की आई-वडिलांना विचारेनाशी होतात, याहून मोठे दुर्दैव कोणते?
संयुक्त राष्ट्र संघाच्या पुढाकाराने दरवर्षी १ आॅक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय वृद्धदिवस म्हणून पाळणे सुरू झाले. सन १९९९ हे संपूर्ण वर्ष आंतरराष्ट्रीय ‘बुजुर्ग वर्ष’ म्हणून साजरे केले गेले. आपल्या भारतातही हा दिवस साजरा केला जातो. त्यादिवशी वृद्धाश्रमांमध्ये जाऊन तेथील निराधार वृद्धांना फळे वाटत असतानाची छायाचित्रेही आपण माध्यमांमध्ये पाहिली असतील. पण वृद्धाश्रमांमधील या वृद्धांच्या वास्तवकथा जेव्हा समोर येतात तेव्हा मन पिळवटून जाते! माता-पित्याला परमेश्वराचा दर्जा देण्याची आपली परंपरा आहे. वृद्ध आई-वडिलांना कावडीतून तीर्थयात्रेला नेणाºया श्रावणबाळाचे उदाहरण आपण अभिमानाने देतो. त्याग, प्रेम आणि आपुलकी यासाठी भारत जगात ओळखला जातो. अशा या देशात वृद्धांची अवस्था एवढी खराब का होत आहे, यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आपण भगवान राम व कृष्ण यांना आदर्श मानतो. रामायण, गीता व महाभारत आपल्या जीवनाचे पथदर्शन करतात. मग आपण आपल्या सांस्कृतिक आदर्शांपासून दुरावत का चाललो आहोत? पाश्चात्त्यांच्या चांगल्या गोष्टी जरूर घ्याव्यात, पण ज्याने आपली संस्कृतीच नष्ट होईल अशा गोष्टींचे अंधानुकरण कटाक्षाने टाळावे लागेल.
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी शुक्रवारी नागपुरात होते. भरगच्च कार्यक्रमांमधूनही त्यांनी माझ्यासाठी वेळ दिला. त्यांच्याशी भेट झाली, खूप गोष्टींवर बोलणे झाले. आम्ही राज्यसभेत सोबत होतो व त्यांचा माझ्यावर नेहमीच मित्रवत स्नेह राहिला आहे. आता नागपुरात झालेल्या भेटीने मला जाणवले की, देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचूनही कोविंदजी बदललेले नाही. पूर्वीइतकेच ते आजही उमदे, विनम्र व संवेदनशील आहेत. एक उत्तम माणूस असण्याची हीच तर खरी ओळख आहे...!

Web Title: The whole country should follow Assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.