श्वेतवर्णी ते ताम्रवर्णी अश्वकथा

By Admin | Updated: June 1, 2015 01:25 IST2015-06-01T01:25:06+5:302015-06-01T01:25:06+5:30

तर त्यांच्या या मंगोलीयाच्या दौऱ्यात म्हणे त्यांना तिथल्या सरकारने एक मोठी उमदी भेट दिली. या भेटीचे स्वरूप म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही, चक्क एक ताम्रवर्णी अश्व!

White-stroke to Tamarvarni Ashvakatha | श्वेतवर्णी ते ताम्रवर्णी अश्वकथा

श्वेतवर्णी ते ताम्रवर्णी अश्वकथा

मध्यंतरी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि त्यांचे मतदार यांचे वर्णन करताना मोठी बहारदार तुलना केली होती. मोदींना भरभरुन मते देणाऱ्या लोकांच्या नजरेत नरेन्द्रभाई म्हणजे ‘रोनाल्ड रेगन रायडींग आॅन अ व्हाईट हॉर्स’ होते आणि आजही आहेत, असे राजन म्हणाले. याचे तसे दोन अर्थ होऊ शकतात. रेगन हेही तसे अत्यंत सामान्य कुटुंबातून आणि अगदीच तसे म्हणायचे तर हलाखीच्या परिस्थितीतून वर आलेले. प्रचंड आशावाद हा त्यांच्या ठायी असलेला गुण आणि तेच त्यांचे भांडवल. साहजिकच अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी याच आशावादाच्या बळावर आपल्या देशात कमालीचे आशावादी वातावरण निर्माण केले आणि त्याला कृतीची जोडही दिली. त्यांना एकच षोक होता, तो अश्वपालनाचा. तो षोक पुरा करण्यासाठी त्यांनी खास अरबस्तानातून खरेदी केलेले काही अश्व आपल्या खासगी पागेत सांभाळले होते आणि सपत्नीक रपेट मारण्याचीही त्यांना प्रचंड हौस होती. दुसरा अर्थ म्हणजे राजकारणात येण्याआधी रेगन सिनेमात काम करीत असत. हॉलीवूडच्या ‘देमार छाप’ काऊबॉय सिनेमांचे ते हिरो होते. अशा सिनेमांमधला हिरोदेखील कमरेला पिस्तूल लटकवून, घोड्यावर बसून दुष्टांचे निर्दालन आणि सुष्टांचे संरक्षण करीत दौडत असतो. तेव्हा त्याही अर्थी राजन यांनी मोदींना अश्वस्वाराची उपमा दिली असल्यास सांगता येत नाही. पण ही उपमा आणि हे वर्णन थेट मंगोलीयाला कसे जाऊन पोहोचले हे गूढच आहे. मोदी यांनी त्यांच्या विश्व भ्रमण यात्रेत मध्यंतरी मंगोलीयादेखील गाठले होते. तिथेच बोलताना बहुधा त्यांनी पूर्वी (म्हणजे ते पंतप्रधान होण्यापूर्वी) भारतात जन्म घेणे कसे लांच्छनास्पद होते वगैरेसारखे काही उद्गार काढून टीकेचे मोहोळ अंगावर ओढवून घेतले होते. तर त्यांच्या या मंगोलीयाच्या दौऱ्यात म्हणे त्यांना तिथल्या सरकारने एक मोठी उमदी भेट दिली. या भेटीचे स्वरूप म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही, चक्क एक ताम्रवर्णी अश्व! राजशिष्टाचाराचा एक भाग म्हणून अशा भेटी दिल्या आणि घेतल्या जात असतात. विशेषत: एखाद्या देशाचा राष्ट्रप्रमुख वा सरकार प्रमुख जेव्हा विदेश दौऱ्यावर जातो, तेव्हा तो जसा जाताना काही भेटी म्हणजे उपहार घेऊन जातो, तसेच यजमान देशदेखील त्याची परतफेड करीत असतो. अशा उपहाराची निवड करताना, त्यात तो दिल्या जाणाऱ्या देशाचे काही वैशिष्ट्य प्रतिबिंबीत झालेले असावे, असाही एक संकेत असतो. तसे असल्याने, मंगोलीयाने मोदींना उपहाराप्रित्यर्थ अश्वभेट द्यावी यामागेही कारण आहे. त्या देशातील घोडे लहान चणीचे असले तरी ते तट्टू किंवा शिंगरू नव्हेत. चेंगीझखानाच्या काळापासून या मंगोलीयन घोड्यांची काळजीपूर्वक पैदास म्हणे त्या देशात केली जाते आणि आज त्यांची संख्या जनसंख्येहूनही अधिक म्हणजे सुमारे तीस लाखांच्या घरात आहे. तरीही या घोड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे अधिक-उणे चाळीस सेल्सियस तपमानातही ते तग धरू शकतात, असे सांगितले जाते. आता इतके सारे गुण असणारा घोडा भारताच्या पंतप्रधानांना भेट देणे उचितच म्हणायचे. याचा अर्थ त्या देशात पाहुण्याला उपहारादाखल देण्यायोग्य केवळ एकच जिन्नस असावा, असे होऊ शकत नाही. पण तरीही घोड्याचीच निवड केली जावी, यात काही संकेत असावेत. मोदींनी त्या घोड्यावर बसून टकडक टकडक करीत देशभर भ्रमण करावे, (विदेशात जाण्यासाठी तो उडता घोडा नाही म्हणूनच) खलांचे निर्दालन करावे आणि सुष्टांना अभय द्यावे अशी काही तरी मंंगोलीयनकरांची अपेक्षा असावी. मोदींना त्यांनी ती सांगितली वा नाही, हे काही उघड झाले नाही. पण मोदींनी या भेटीचा सहर्ष स्वीकार केला आणि तिचे नामकरणही केले. गौतम बुद्धांच्या अश्वाचे कंथक हेच नाव त्यांनी भेटीदाखल मिळालेल्या अश्वाला दिले. ज्या बुद्धाने जगाला शांतीचा, सद्भावाचा आणि क्षमेचा संदेश दिला, त्याच्याच प्रिय अश्वाचे नाव मोदींनी आपल्याला प्राप्त उपहाराला द्यावे, यातही मोठा काव्यगत न्यायच म्हणायचा. पण हाय रे दैवा! ही अनमोल भेट स्वीकारून मोदींनी ती तिथे भारतीय दूतावासाच्या ताब्यात देऊन टाकली. सोबत भारतात आणलीच नाही. पंतप्रधानांच्या निवासस्थानी प्राणीजगतास बंदी आहे म्हणून? पण तसे तर काहीच नाही. परदेश दौऱ्यात मिळालेल्या भेटी घरी न्यायच्या नसतात, म्हणून? पण तसेही काही नाही. त्यांना मनोमन ती भेट आवडली नाही, म्हणून? तेही नाही. कारण वेगळेच आहे, म्हणतात. परदेशी पाहुण्यांना सजीवांच्या भेटी देण्यावर भारत सरकारने फार आधीच बंदी लागू केली आहे. कोणताही सजीव प्राणी ज्या वातावरणात जन्मला आणि वाढला, त्या वातावरणातून अगदीच भिन्न स्वरूपाच्या वातावरणात तो टिकाव धरू शकत नाही व तसे झाल्यास मुक्या प्राण्याच्या हत्त्येस कारणीभूत ठरल्याचे पातक लागू शकते, म्हणून म्हणे तो नियम केला गेला आहे. अर्थात हा नियम भारताने कोणाला काय द्यावे वा देऊ नये इतक्यापुरता मर्यादित आहे. भारताने वा भारताच्या प्रतिनिधीने काय घ्यावे अथवा घेऊ नये, यावर कोणतेही बंधन नाही. तरीही मोदींनी मंगोलीयन अश्व सोबत न आणता, परस्पर दूतावासाच्या ताब्यात देऊन टाकला. त्यामुळे रघुराम राजन यांच्या उपमेतील अश्व तर आता वजा झाला. अवघ्या वर्षभरातच अश्वस्वार मोदींचा अश्व असा निसटणे काही बरे नाही !

Web Title: White-stroke to Tamarvarni Ashvakatha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.