राकेश टिकैत यांच्या डोळ्यात जेव्हा अश्रू येतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 05:56 AM2021-02-04T05:56:37+5:302021-02-04T05:57:17+5:30

Farmer Protest : नेत्याच्या डोळ्यात येणारे पाणी अनुयायांच्या हृदयाला कसा पाझर फोडते, हे दिल्लीत पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे!

When tears come to Rakesh Tikait's eyes ... | राकेश टिकैत यांच्या डोळ्यात जेव्हा अश्रू येतात...

राकेश टिकैत यांच्या डोळ्यात जेव्हा अश्रू येतात...

Next

- हरीष गुप्ता
(नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली)

‘एखाद्या माणसाला मी रडताना पाहतो तेव्हा मला ती त्याची दुर्बलता वाटते.’- २०१५ साली ‘पीपल’ या नियतकालिकाला मुलाखत देताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते, ‘लहान मुलगा असताना मी शेवटचे रडलो होतो’ अशी पुस्तीही त्यांनी पुढे जोडली. मात्र, ट्रम्प महाशय त्यांनीच निर्माण केलेल्या भ्रामक जगात वावरत आहेत हे नक्की. जगात असे अनेक नेते आहेत ज्यांच्या डोळ्यात आलेल्या अश्रूंनी लक्षावधी लोकांना हलवले, संकट काळात त्यांचे मनोधैर्य उंचावले, नैराश्यात आशा पेरली आणि इतिहास बदलला. अब्राहम लिंकन, बराक ओबामा, रशियाचे ब्लादिमीर पुतीन, इंदिरा गांधी अशी कित्येक उदाहरणे यासाठी देता येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने त्यात भर पडली आहे. भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना अलीकडेच मोदी यांचे डोळे पाणावले.  ५६ इंची छातीच्या या माणसाला  काही पहिल्यांदाच गलबलून आले नव्हते. २०१४ साली भाजपा संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाली तेंव्हाही त्यांच्या डोळ्यात आसवे तरळली होती. २००७ साली आपल्या अवस्थेचे वर्णन करताना भगवे वस्त्रधारी योगी आदित्यनाथ यांनाही रडू कोसळले होते. सभागृहातला तो दिवस त्यांनी जिंकला आणि दहा वर्षांनी लखनौत समाजवादी पक्षाच्या नेत्यांना रडवले. या रडणाऱ्या नेत्यांचे कोणी ऐकले नाही ही गोष्ट वेगळी. अश्रूंची ताकद गाझीपूरमध्ये पुन्हा एकदा समोर आली. २६ जानेवारीच्या हिंसेनंतर शेतकरी आंदोलन आता हळूहळू विझू लागले आहे, असे वातावरण निर्माण झाले होते. मग राकेश टिकैत अचानक अवतीर्ण झाले  आणि शेतकरी बांधवांसाठी प्राण अर्पण करण्याची भाषा करताना त्यांच्या  डोळ्यात पाणी आले. परिणामी केवळ शेतकरी आंदोलनातच पुन्हा नवा जीव भरला असे नव्हे, तर  टिकैत यांच्या निर्विवाद नेतृत्वावरही शिक्कामोर्तब झाले. आता टिकैत हेच शेतकरी आंदोलनाचा मुख्य चेहेरा बनले आहेत!

आता दार किलकिले कोण करणार?
राकेश टिकैत शेतकऱ्यांचे निर्विवाद नेते झालेले आहेत, हे तर नक्कीच! आंदोलन गाझीपूर, टिकरी आणि शाहजहानपूर खेडा सीमेवर  एकवटले आहे. मात्र, पंजाबचे धरम पाल, एम. एस. पंधेर, राजोवाल किंवा सिरसा कोणतेही पत्रक काढत नाहीत, बोलत नाहीत. पूर्वी ज्यांच्याशी त्यांचे वाजले, अशा नेत्यांच्या गळाभेटी ते घेत आहेत. काँग्रेसच्या एका खासदाराला एकदा मार पडला होता ते दिवसही सरले आहेत. पण या झगमगाटात एक गोष्ट मात्र वेगळी दिसते आहे. आधी हाक मारली की मंत्रीगणातून  कोणीतरी प्रतिसाद द्यायचे. सरकार म्हणते, “ फक्त आम्हाला फोन करा!” - पण कोणीतरी हा फोन केला तर पाहिजे. टिकैत आता मध्यममार्ग अवलंबून शेतकऱ्यांना किमान हमी भाव द्यावा, असे सरकारला  सांगत आहेत. पोलिसांनी दिल्लीत आंदोलकांचा प्रवेश रोखला आहे. प्रमुख नेत्यांना अटक न करता त्यांच्याविरुद्ध खटले दाखल केले जात आहेत. १९८८ साली राकेश यांचे पिता महैन्द्रसिंग यांनी लाखभर  शेतकरी आणून बोट क्लबला  वेढा घातला होता. राजीव गांधी सरकारकडून त्यांनी ३५ कलमी करार पदरात पाडून घेतला होता. मोदी हुशार आहेत. शेतकऱ्यांना ते दिल्लीत प्रवेश करू देणार नाहीत. “सीमा ओलांडू नका” - हेच मोदींचे सांगणे आहे. आता कोणीतरी बोलले पाहिजे, थोडे पडते घेतले पाहिजे... पण हे करणार कोण?

पुढील वर्षी शेतकरी अर्थसंकल्प 
रेल्वेऐवजी यंदाच शेतकरी अर्थसंकल्प आणण्याची कल्पना मोदी यांच्या मनात घोळत होती. तशी पूर्वतयारीही केली गेली होती. नीती आयोगालाही सांगण्यात आले होते. मोदी यांनी शब्दश: अर्थाने रेल्वे अर्थसंकल्प गाडून टाकला. कोणी त्याची फिकीर केली नाही. कृषी मंत्रालयाचे नाव बदलून त्यांनी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय केले आणि पुढच्या पाच वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न पाच पट वाढवण्याचे वचनही दिले. शेतकरी धरणे आंदोलनात उतरल्याने मोदी यांनी आपली योजना बासनात नेली. या दडपणाखाली सध्या केवळ मोदी नाहीत. पुढच्या वर्षी  उत्तरप्रदेशात निवडणुका होत आहेत. २०२२ मध्ये शेतकरी अर्थसंकल्प येऊ शकतो.

Web Title: When tears come to Rakesh Tikait's eyes ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.