मुलांच्या जगातली गुंतागुंत अचूक पकडता यायला हवी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 09:07 IST2026-03-14T09:06:57+5:302026-03-14T09:07:18+5:30

रोहन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'इअरफोन्स' या किशोरवयीन मुलांसाठी असलेल्या कथासंग्रहाच्या निमित्ताने लेखक गणेश मतकरी यांच्याशी संवाद.

We must be able to accurately grasp the complexity of children's world! | मुलांच्या जगातली गुंतागुंत अचूक पकडता यायला हवी !

मुलांच्या जगातली गुंतागुंत अचूक पकडता यायला हवी !

मोठ्यांप्रमाणे मुलांचं जगही तितकंच गुंतागुंतीचं असतं. लेखकानं मुलांच्या मानसिकतेचा शोध घेताना त्यांचे प्रश्न आणि संघर्षाशी समरस झालं पाहिजे.

‘इअरफोन्स’ हे शीर्षक आजच्या टीनएज पिढीच्या जगण्याचं रूपक आहे का?

- अनेकदा कथासंग्रहाचं शीर्षक एखाद्या प्रतीकासारखं काम करतं. ‘इअरफोन्स’ हे शीर्षकही तसंच आहे. आजच्या शहरी जीवनात मुलांचं एक स्वतंत्र जग तयार होताना दिसतं. त्यांची ‘पर्सनल स्पेस’ अनेकदा डिजिटल माध्यमातून आकार घेत असते. पूर्वी मुलांचा वेळ पुस्तकं, खेळ आणि मित्रांशी प्रत्यक्ष संवाद यात जात असे; पण आता अनेक मुलं जणू आपल्या कोषात राहिल्यासारखी दिसतात. ‘इअरफोन्स’ हे त्याच वैयक्तिक अवकाशाचं रूपक आहे. संग्रहातील ‘इअरफोन्स’ या कथेतील दोन मुलं भिन्न सामाजिक पार्श्वभूमीतून आलेली आहेत आणि त्यांच्या संवादाचं निमित्तही इअरफोन्सच ठरतात.

टीनएजर्सची भाषा तुम्ही कशी टिपली?

- तपशील आपल्या आजूबाजूलाच असतात. प्रश्न एवढाच असतो की आपण ते किती आणि कसे पाहतो. प्रत्येकजण आयुष्यात कधीतरी त्या वयातून गेलेलाच असतो आणि त्या काळातील अनुभव, आठवणी मनात साठलेल्या असतात. माझी मुलगी आता मोठी आहे; पण तिचे शाळेतील अनुभव आणि तिच्या मित्रमैत्रिणींचं जग मी जवळून पाहिलं आहे. शिवाय आमच्या घरी बालनाट्य संस्थेचं वातावरणही होतं. त्यामुळे मुलांच्या जगाशी संपर्क राहिला. माझ्या कथांमध्ये भाषा हा महत्त्वाचा घटक असतो. अनेक कथा प्रथमपुरुषी निवेदनातून सांगितलेल्या असतात. त्यामुळे पात्र कोण आहे, ते कसं बोलतं, याला मोठं महत्त्व येतं. पात्राला साजेशी भाषा सापडली नाही तर कथा पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही. टीनएजर्सच्या कथा लिहितानाही हाच नियम लागू होतो.

वास्तवातील निरीक्षणं किती महत्त्वाची?

- निरीक्षणातून प्रेरणा मिळतेच. ‘शिमर’ या कथेतील प्राण्यांबद्दल वाटणारं प्रेम ही सार्वत्रिक भावना आहे. काही कथांमध्ये प्रत्यक्ष अनुभवांचं बीजही असतं. ‘खोटी गोष्ट’ या कथेतील मुख्य प्रसंग माझ्या आयुष्यात घडलेला आहे. एकदा मी शाळेत जायच्या आधी ‘किशोर’ मासिक वाचत बसलो होतो. बाबांनी विचारलं, ‘शाळेला नाही का जायचं?’ तेव्हा मी सांगितलं की वर्गात गोष्ट सांगायची आहे म्हणून वाचतोय. प्रत्यक्षात मला गोष्ट पूर्ण वाचायची होती. हा छोटासा अनुभव मनात राहिला. पुढे तो कथेत वेगळ्या स्वरूपात उलगडला.  

मोबाइल, सोशल मीडियाचा किशोरवयीन मुलांच्या भावविश्वावर परिणाम कसा होतो?

- डिजिटल आणि सोशल मीडिया ही आज सर्वांसाठीच एक समांतर दुनिया तयार करत आहेत. वास्तव आयुष्यासोबतच एक वेगळी ओळख डिजिटल जगात निर्माण होत जाते. ‘इअरफोन्स’, ‘नीरूचा फोन’ किंवा ‘शिमर’ अशा कथांमध्ये या डिजिटल जगाचा संदर्भ येतो. कधी फोन, कधी व्हॉट्सॲपवरील फोटो अशा माध्यमांतून कथानक पुढे सरकतं. पूर्वी मैत्री, खेळ आणि संवाद प्रत्यक्ष घडत; आता त्यात डिजिटल माध्यमांचाही मोठा वाटा आहे. हे चांगलं की वाईट, असा सरळ निष्कर्ष काढण्यापेक्षा त्या बदलाकडे वास्तव म्हणून पाहणं महत्त्वाचं वाटतं. 

किशोरवयातील भावविश्व मांडताना लेखक म्हणून कोणती जबाबदारी जाणवते?

- मुलांसाठी लिहिताना अनेकदा गोष्टी अतिशय सोप्या करून सांगण्याची प्रवृत्ती दिसते; पण मुलांचं जगही तितकंच गुंतागुंतीचं असतं. त्या वयातही अनेक प्रश्न आणि संघर्ष असतातच. लेखक म्हणून ती गुंतागुंत जशी आहे तशी पकडणं महत्त्वाचं आहे. मुलांच्या मानसिकतेचा शोध घेणं मला अधिक महत्त्वाचं वाटतं. चांगलं बालसाहित्य किंवा मुलांसाठी बनवलेला चांगला चित्रपट मोठ्यांनाही भावतो. मुलांना त्यात स्वतःचं जग दिसतं, तर मोठ्यांना त्यांचा भूतकाळ. कथेत उतरवताना हे मुलांचं जग अबाधित ठेवणं महत्त्वाचं आहे. कथा मुलांसाठी असाव्यात; पण त्या बालिश होऊ नयेत. इंग्रजी साहित्यात यंग अडल्ट ही स्वतंत्र श्रेणी आहे. आपल्याकडेही किशोरवयीन अनुभवांना गांभीर्याने हाताळणारं साहित्य अधिक प्रमाणात लिहिलं जाण्याची गरज आहे.

चित्रपट, नाटक, समीक्षण या क्षेत्रांतील अनुभवांचा कथनशैलीवर काही परिणाम?

- माझ्यावर चित्रपट आणि स्थापत्यकला या दोन क्षेत्रांचा विशेष प्रभाव आहे. मी शिक्षणाने आर्किटेक्ट आणि त्या क्षेत्रात कामही केलं. कथा बांधताना प्रसंगांची रचना आणि दृश्यरचना यासाठी सिनेमाचा प्रभाव उपयोगी पडतो, तर वातावरणनिर्मितीसाठी स्थापत्याचा विचार मदत करतो. मुलांच्या कथा लिहितानाही मर्यादित जागेत प्रभावी कथा उभी करण्यासाठी ही दृश्यात्मकता आणि नेमकी बांधणी उपयोगी ठरते.

मुलाखत व शब्दांकन :
दुर्गेश सोनार, सहायक संपादक, 'लोकमत'

Web Title : बच्चों की दुनिया की जटिलता को पकड़ना ज़रूरी है!

Web Summary : बच्चों की दुनिया जटिल है; उनकी मानसिकता को समझना ज़रूरी है। 'ईयरफ़ोन' आज के किशोरों के डिजिटल जीवन का प्रतीक है। अवलोकन कहानियों को प्रेरित करता है; डिजिटल मीडिया रिश्तों को प्रभावित करता है। बच्चों के लिए लिखते समय प्रामाणिकता और अतिसरलीकरण से बचना ज़रूरी है।

Web Title : Capturing the complexity of children's world is essential!

Web Summary : Children's world is complex; understanding their mindset matters. 'Earphones' symbolize today's teens' digital lives. Observation inspires stories; digital media impacts relationships. Authenticity and avoiding oversimplification are key when writing for children.