शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

कित्येकजण अडथळ्यांना घाबरतात...पण स्वप्नांचे काजवे हाती लागतात, फक्त ‘विश्वास’ हवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 05:56 IST

उदय लळीत भारताचे निवृत्त सरन्यायाधीश कित्येकजण अडथळ्यांना घाबरतात, निम्म्या वाटेत थकून मागे वळतात. ही वेळ कधीच आपल्यावर येऊ नये, ...

उदय लळीतभारताचे निवृत्त सरन्यायाधीश

कित्येकजण अडथळ्यांना घाबरतात, निम्म्या वाटेत थकून मागे वळतात.ही वेळ कधीच आपल्यावर येऊ नये, एवढा प्रयत्न तारुण्यात कायम हवा!

माझा जन्म सोलापूरचा. माझं शालेय शिक्षणही सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशालेत झालं. वकिलीच्या व्यवसायात मी जवळजवळ ३९ वर्ष आहे. मी कामाला सुरुवात केली तेव्हा वकिलांनी कसं असावं किंवा कसं असू नये, असे उपदेश मलाही मिळाले होते. त्यातलं जे मला पटलं, ते मी जरुर घेतलं. व्यक्तिगत आणि व्यावसायिक मूल्यं जीवापाड जपली. आपण सर्वच काही एक मूल्यांची शिदोरी घेऊन आपापली वाटचाल करीत असतो. त्या वाटचालीमध्ये  अडथळे येतात. ठेचा लागतात. आपण सावरतो, पुन्हा एकवार हिमतीने उठून चालू लागतो, अखेर मुक्कामाचं ठिकाण दिसू लागलं, की मागे वळून पाहतो तेव्हा अचानक वाटतं, अरे? इतके पुढे आलो आपण?.. मग वाटतं, हे कसं साधलं आपल्याला? थोडेसे परिश्रम,  ईश्वरी आशीर्वाद किंवा वडीलधाऱ्यांचा वारसा असं खूप काही असतं आपल्या यशात! मीही कुणी वेगळा नाही. मी खूप मोठं काहीतरी केलंय, वेगळं केलंय असं काही नाही.

प्रत्येकजण तेच करतो. उत्कटता थोडीशी कमी-जास्त असते, एवढंच!...  माझ्यामध्ये ती थोडी जास्त असेल! कोणत्याही व्यवसायात पुढे जाण्यासाठी जिद्द लागते. त्या जिद्दीला हत्यार बनवणं आणि त्यातून वाटचाल करीत पुढे जात राहणं, हीच खरी जीवनाची गुरुकिल्ली आहे. मी तेवढंच करीत आलो.. ध्येय सांभाळून पुढं जाणं हे आपल्यातला प्रत्येकजण करीत राहिला, तर सगळंच काही सुखकर होईल... पण ते दुर्दैवाने होत नाही. कित्येक जण निम्म्या वाटेत थकून मागे वळतात. काही लोक अडथळ्यांना घाबरतात. काही लोक वाटेत लागलेल्या ठेचांनी बेजार होतात. असे लोक मार्ग सोडून जातात. ही वेळ कधीच आपल्यावर येऊ नये हे ध्येय मनाशी बाळगून निवडलेल्या रस्त्यावरून पुढे जात राहणं पुरेसं असतं. भारत हा तरुणांचा तरुण देश आहे. आपल्या लोकसंख्येत ३० वर्षांच्या खालच्या युवकांची संख्या जवळजवळ निम्मी आहे. इथून पुढे या तरुण  पिढीच्या हातातच देशाची सूत्रं  असतील. अशा युवकांना थोडी ध्येयासक्ती पाहिजे! तरुण वयात कुठेतरी दूर  काजवे चमकल्यासारखी ‘स्वप्नं’  दिसतात; पण ती दूर नसतात... तुमच्या कवेतच  असतात ती, आवाक्यात येऊ शकतात; कमी पडतो तो स्वत:वरचा विश्वास! मी ज्या जमान्यात तरुण वकील म्हणून काम सुरू केलं, तेव्हा आमच्यासाठी ग्रंथालय हाच एकमेव पर्याय होता. अभ्यास करायचा, संदर्भ शोधायचे म्हणजे ग्रंथालयात जायचं! आज सगळ्यांसाठी प्रचंड साधनं उपलब्ध आहेत. मी ज्युनिअर असताना सिनिअर वकील युक्तिवाद करीत असतील, तर आम्ही आमची कामं सोडून कोर्टात त्या वकिलांचा युक्तिवाद ऐकायला जायचो. काल यू-ट्यूबवर पाहत असताना लक्षात आलं, की खुद्द फली नरिमन यांचा संविधान पीठासमोरील युक्तिवादही मला तिथे  एका क्लिकसरशी ऐकता येतो. ही संदर्भांची श्रीमंती सर्वांना उपलब्ध आहे. तुम्ही कधीही उघडून पाहू शकता. तुमच्या मागच्या दोन पिढ्यांच्या तुलनेत इतके फायदे असताना जर त्याचा उपयोग नाही केला तर कदाचित भविष्यच तुम्हाला म्हणेल की, मी तुला दिलं होतं उदंड हातांनी, पण कर्म नव्हतं! - ही परिस्थिती कोणत्याही वकिलावर, कुणावरही येऊ नये. मी जेव्हा वकील झालो, तेव्हा एका वरिष्ठांनी मला सांगितलं होतं, सरस्वतीची पूजा करीत राहा; लक्ष्मी सदैव तुझ्या मागे येत राहील!- यात वकिली व्यवसायाचं सार आहे. या व्यवसायाने मला सगळं काही दिलं. नाव दिलं, कीर्ती दिली. मला जे हवं होतं ते सगळं मिळालं. पैसा  जितका हवा होता, त्यापेक्षा जास्त मिळाला... आणि सगळ्यात शेवटी एक संधी मिळाली... आणखी काय हवं असतं माणसाला?(सोमवारी सेवानिवृत्त झालेले सरन्यायाधीश उदय लळीत यांनी सोलापूर येथे वकील परिषदेत केलेल्या भाषणाचा संपादित सारांश) शब्दांकन : समीर इनामदार, लोकमत, सोलापूर

टॅग्स :Uday Lalitउदय लळीत