शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

कांद्याच्या लालीमागील श्वेत सत्य!

By किरण अग्रवाल | Updated: December 5, 2019 10:05 IST

कांदा उत्पादकांना आज आलेल्या काहीशा ‘अच्छे दिना’मागे गतकाळातील प्रचंड नुकसानीचे वास्तव असल्यामुळे त्या बुऱ्या दिनांकडे दुर्लक्ष करून या विषयाकडे पाहता येणार नाही.

- किरण अग्रवाल

दरवाढीमुळे कधीकाळी दिल्लीचे सरकार गडगडायला कारणीभूत ठरलेला कांदा सध्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये ‘भाव’ खातोय खरा; पण या दरवाढीमागे गेल्या दोन महिन्यातील अवकाळी पावसाने आणून ठेवलेले अश्रू आहेत हे विसरता येऊ नये. कांद्याच्या दरवाढीविषयी चर्चा करताना केंद्र सरकारच्या आयात-निर्यात धोरणाची चिकित्सा होणे क्रमप्राप्त आहे व ते गैरही नाही, परंतु कांदा उत्पादकांना आज आलेल्या काहीशा ‘अच्छे दिना’मागे गतकाळातील प्रचंड नुकसानीचे वास्तव असल्यामुळे त्या बुऱ्या दिनांकडे दुर्लक्ष करून या विषयाकडे पाहता येणार नाही.

राज्यातील सोलापूरसह नाशिक व अन्य ठिकाणच्या बाजार समित्यांमधील कांद्याची आवक रोडावल्याने कांद्याचे दर वाढून गेले आहेत. सोलापूरला इतिहासात कधी नव्हे तो तब्बल १५ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला, तर कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याला १२ ते १४ हजारांच्या आसपास भाव मिळाला, परिणामी किरकोळ विक्रीचे दर वाढून गृहिणींच्या डोळ्यात पाणी आले आहे. तसेही कांदा चिरताना डोळ्यात पाणी येतच असते; पण आता दर वाढल्याने हे पाणी येत आहे. विशेषत: मुंबईच्या बाजारात यासंबंधीचा फटका बसताना दिसून येतो आहे. त्यामुळे या दरवाढीची चर्चा होऊन लगेचच नफ्याची गणिते मांडली जाऊ लागली आहेत. परंतु उन्हाळ कांद्याला आज लाभलेली ही दरवाढीची लाली क्षणिक आहे. यापूर्वीच्या काही महिन्यांत परतून आलेल्या पावसाने कांद्याचे जे अतोनात नुकसान घडविले होते व त्यामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले होते ते पाहता त्यापुढे ही आजची लाली फिकी पडावी.

ऑक्टोबर महिन्यात आलेल्या परतीच्या पावसाने तसा सर्वच पिकांना तडाखा दिला होता. त्यात चाळीमध्ये साठवलेल्या उन्हाळ व लागवडीत असलेल्या पोळ कांद्याचाही समावेश होता. बरे, हे केवळ महाराष्ट्रातच घडले असे नाही. तामिळनाडू व कर्नाटकसह लगतच्या राज्यांतही पावसाने दणका दिलेला असल्याने तेथील कांदा उत्पादनावरही मोठा परिणाम झाला. स्वाभाविकच कांदा उत्पादकांचे नुकसान झाले व कांद्याची बाजारातली आवक घटली, परिणामी दर वाढले. दरवर्षी सुमारे २० ते २५ लाख टन कांद्याची भारतातून निर्यात होत असते, ती यंदा होणे दुरापास्त तर ठरले आहेच; देशांतर्गत बाजारातही पुरेशी उपलब्धता होत नाहीये. दरम्यान, केंद्र सरकारने निर्यातबंदी घातली असली तरी त्याचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी कुठलाही उपयोग होऊ शकला नाही, कारण कांद्याचे उत्पादन व आवकच कमी होती. शिवाय, शासनाने नाफेडच्या माध्यमातून खरेदी करून ठेवलेला कांदाही मोठ्या प्रमाणात सडल्याने तोही बाजारात आणता आला नाही. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून आजच्या दरवाढीकडे बघता येणारे आहे. आजच्या कांद्याच्या लाली मागील श्वेत सत्य असे अश्रुधारीत आहे.

कांद्याच्या या दरवाढीकडे बघताना सरसकट लाभाची बाब म्हणूनही त्याकडे पाहता येऊ नये. कारण बाजार समित्यांमध्ये जो काही उच्चांकी भाव मिळतो तो मोजक्या व निर्यातक्षम प्रतिच्या कांद्याला. पण चर्चा होते ती सरसकटच्या उच्चांकी दराची. वस्तुत: आज कांद्याचे दर वाढले आहेत; पण टोमॅटो घसरला आहे. अगदी दीड ते दोन रुपये किलो टोमॅटो झाला आहे. शेतातून बाजार समितीमध्ये टोमॅटो वाहून आणण्याचा खर्चही निघत नाही अशी ही स्थिती आहे. लागवड खर्च व वाहतूक खर्च अशा दोन्ही पातळ्यांवर नुकसान ओढवले आहे; पण टोमॅटोच्या घसरणीपेक्षा कांद्याची दरवाढच चर्चिली जाते. महागाईचे म्हणायचे तर, डाळींच्या किमतीही वाढल्या आहेत. काही डाळींनी तर शंभरी ओलांडली आहे. अगदी प्रतिकिलो १० ते २० रुपये दर वाढले आहेत, ते दर आटोक्यात आणायचे आणि महागाई जाणवू द्यायची नाही ठरवले तर डाळींची परदेशातून आयात करावी लागणार आहे. कारण पावसाच्याच फटक्याने डाळींचे उत्पादनही घटले आहे. पावसात भिजलेल्या डाळी मातीमोल ठरल्या आहेत. त्यामुळे जुन्या साठवणुकीतील डाळींना भाव आला आहे. पण त्याबाबत फारशी ओरड होताना दिसत नाही. कांद्याची दरवाढ झाली की लगेच चर्चेचे पेव फुटतात. किरकोळ बाजारातील खरेदीदारही चिंता व्यक्त करतो आणि सरकारचा जीवही वर-खाली होतो.

महत्त्वाचे म्हणजे, आज कांदा दराने उच्चांक गाठला असला तरी, हीच स्थिती यापुढेही कायम राहील याची शाश्वती देता येत नाही. किंबहुना हे दर असे राहणार नाहीत. कारण, याच महिन्याच्या म्हणजे डिसेंबरच्या अखेरीस लेट खरिपाचा रांगडा कांदा बाजारात यायला सुरुवात होईल. महाराष्ट्राप्रमाणे अन्य राज्यांतील कांदाही या सुमारास हाती येईल. शिवाय, केंद्र सरकारने इजिप्त व तुर्कीमधून कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला असल्याने तो कांदाही उपलब्ध होईल. परिणामी आजचे वाढीव दर नियंत्रणात येतील. त्यामुळे घाबरून जाण्याचे अथवा त्याचा नको तितका बाऊ करण्याचे कारण नाही. रांगडा कांदा बाजारात येईपर्यंत कमी राहणारी आवक बघता या काळात दरवर्षीच अशी स्थिती निर्माण होत असते. या वास्तविकतेच्या पलीकडील निसर्गाने यंदा दिलेल्या फटक्याची व त्यातून ओढवलेल्या नुकसानीची श्वेतपत्रिका काढण्याइतके हे संकट मोठे होते. पण चर्चा होते ती दरवाढीच्या लालीची. म्हणूनच ती यथोचित म्हणता येऊ नये.   

टॅग्स :onionकांदा