शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

तत्त्वांशी तडजोड न करणारा विश्वासार्ह नेता

By यदू जोशी | Published: July 24, 2017 5:56 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज ४७ वा वाढदिवस आहे. त्याबद्दल लोकमत परिवारातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन! कर्तृत्ववान नेते गंगाधरराव फडणवीस आणि करड्या शिस्तीच्या पण आतून फणसासारख्या गोड असलेल्या आईचे (सरिता) संस्कार त्यांना लाभले. राजकारण ते आपल्या वडिलांच्या मांडीवरच शिकले पण जे बाळकडू त्यांना मिळाले ते हेव्यादाव्याचे, कटकारस्थानांचे, कुणाला कसे खाली खेचता ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज ४७ वा वाढदिवस आहे. त्याबद्दल लोकमत परिवारातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन! कर्तृत्ववान नेते गंगाधरराव फडणवीस आणि करड्या शिस्तीच्या पण आतून फणसासारख्या गोड असलेल्या आईचे (सरिता) संस्कार त्यांना लाभले. राजकारण ते आपल्या वडिलांच्या मांडीवरच शिकले पण जे बाळकडू त्यांना मिळाले ते हेव्यादाव्याचे, कटकारस्थानांचे, कुणाला कसे खाली खेचता येईल याचे नव्हते. गंगाधरराव फडणवीस हे एक उमदे व्यक्तिमत्त्व होते. पाचपंचवीस लोकांचा चहा झाला नाही अन् दहावीस लोक घरी जेवायला आले नाहीत असा दिवस सरिताकाकूंनी कधीच पाहिलेला नाही. अमरावतीच्या कलोती या सार्वजनिक कुटुंबातून त्या आलेल्या असल्याने आदरातिथ्य हा त्यांचा अंगभूत गुण होताच. विविध राजकीय आचारविचारांशी गंगाधररावांचे मैत्र होते पण त्या नादात स्वत:च्या पक्षावरील, ध्येयावरील त्यांची निष्ठा ढळली, असे कधीही घडले नाही. ते नगरसेवक, उपमहापौर, दोनवेळा आमदार राहिले पण जीवनमूल्यांशी तडजोड करण्याचे स्वप्नही त्यांना कधी पडले नाही. देवेंद्र यांच्यात तोच स्वभाव पुरेपूर उतरला आहे. राजकारण हे राजकारणासारखेच करावे लागते, असा स्वत:च्या सोईचा तर्क देऊन पक्षहिताला तिलांजली देणारे अनेक नेते अनेक पक्षात असतात, भाजपाही त्याला अपवाद राहिलेला नाही. ‘तुम्ही आमची विधानसभा सीट काढून द्या, आम्ही तुम्हाला लोकसभेला मदत करतो (खाली आम्ही, वर तुम्ही)’ असे मतलबी राजकारण बरेचदा होते. अशी वाट चोखाळल्याने तात्कालीक राजकीय फायदे होतात, कदाचित राजकीय पटलावर दीर्घकाळ राहताही येते, पण विश्वासार्हता लोप पावते. तब्बल ५० वर्षे राजकारण करूनही एखाद्या नेत्याच्या विश्वासार्हतेबाबत भलेमोठे प्रश्नचिन्हच निर्माण होणार असेल आणि कोणत्याही गडबडीच्या मागे तेच असतील असे लोकांना वाटत असेल, तर तो त्या नेत्याचा आत्मिक पराभवच ठरतो.

फडणवीस यांनी नगरसेवक ते मुख्यमंत्रिपदापर्यंतच्या त्यांच्या २५ वर्षांच्या वाटचालीत असा स्वत:चा पराभव एक क्षणदेखील होऊ दिलेला नाही. संघ, भाजपाच्या विचारांवरील अविचल श्रद्धेतून हे घडले आहे.

त्यांच्या मंत्रिमंडळातील दोनतीन वजनदार मंत्र्यांची नावे मध्यंतरी घोटाळ्यांमध्ये समोर आली, तेव्हा प्रसार माध्यमांमधून अशा बातम्या आल्या की फडणवीस यांनी आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना अडचणीत आणले. त्यांना अतिशय जवळून ओळखणाऱ्यांना तसे कधीही वाटू शकत नाही. कारण स्वत:चे राजकीय वजन वाढविण्यासाठी पक्षातील लोकांना अडचणीत आणण्याचा त्यांचा स्वभाव अन् संस्कार नाही. काट्याने काटा काढण्याचे दुसरे नाव हे राजकारणच असते असा अनुभव अनेक नेत्यांनी आजवर पुरोगामी महाराष्ट्राला दिलेला असल्याने फडणवीसही त्याच पठडीतील असावेत असा अनेकांचा समज/गैरसमज झाला असणार. मात्र, फडणवीसांसारखे नेते त्यास अपवाद आहेत. १९७८ मध्ये शरद पवार यांनी पुुलोदचा प्रयोग केला, तेव्हा तत्कालीन जनसंघातून विदर्भाला एक मंत्रिपद देण्याचे ठरले. गंगाधररावांना पक्षाकडून सांगण्यात आले, की तुम्हाला मंत्री व्हायचे आहे, तयारीत राहा. ते ताडकन म्हणाले, मी कसे काय मंत्री होऊ शकतो? माझ्यापेक्षा अकोल्याच्या डॉ. प्रमिलाताई टोपले ज्येष्ठ आहेत, त्यांना मंत्रिपद द्या. प्रमिलाताई मंत्री झाल्या. गंगाधररावांनी ज्येष्ठत्वाचा आब राखत नम्रपणे मंत्रिपद नाकारले. त्या वडिलांचा हा मुलगा आहे. गेल्या ३० वर्षांच्या मैत्रीत मी अनेकदा असे पाहिले की त्यांच्याकडे बरेच लोक येऊन एखाद्याबद्दल वाईटसाईट सांगतात आणि अमूक माणूस चांगला नाही वगैरे कान भरण्याचा प्रयत्न करतात पण त्याच्या सांगण्याने ते समोरच्या व्यक्तीबद्दलचे मत बदलवत नाहीत. पूर्वग्रह तर नसतोच. स्वानुभवावर आजमावून मगच निर्णय करतात. तक्रार घेऊन आलेल्यास व ज्याची तक्रार झाली त्या दोघांनाही ते आपले वाटतात. राजकारणात चांगले अन् वाईटही लोक असतात. पण तुम्ही चांगले असाल तर अपप्रवृत्ती तुमच्याजवळ फिरकण्याची एकतर हिंमत करत नाहीत वा कालांतराने त्या आपोआपच दूर जातात असे त्यांचे साधेसोपे सूत्र आहे. निर्मळ मनाच्या माणसालाच ते सूत्र साधते. हेही तितकेच खरे आहे की तुम्ही त्यांना काही सुचवू शकता पण कुणाच्या कलाने ते चालत नाहीत. ‘वन कान्ट ड्राईव्ह हिम’.

नगरसेवक असल्यापासून त्यांनी कधीही स्वत:चा असा ‘फडणवीस गट’ तयार करण्याचा कोणताच प्रयत्न केला नाही. त्यातून ते सर्वांना स्वीकारार्ह होऊ शकले हा फायदा झाला. प्रदेश भाजपामध्ये पूर्वी हा अमुक गटाचा, तो तमुक गटाचा अशी उभी विभागणी होती. फडणवीस प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी गटबाजीचे हे पक्षांतर्गत राजकारण हद्दपार केले. त्यांच्यापेक्षा वडील असलेल्या नेत्यांशी संघर्षाऐवजी समन्वयाची भूमिका घेत त्यांनी हे साध्य केले. प्रदेश भाजपामध्ये आज गटतट न दिसण्याचे श्रेय फडणवीस, त्यांच्या आधी प्रदेशाध्यक्ष असलेले सुधीर मुनगंटीवार अशा नव्या पिढीच्या नेत्यांना दिले पाहिजे.

फडणवीस यांचा आणखी एक गुणविशेष म्हणजे त्यांना कदाचित स्वत:पेक्षाही प्रिय काय असेल तर ती त्यांची प्रतिमा. सार्वजनिक, राजकीय प्रवासात त्यांनी स्वच्छ प्रतिमा सदैव जपली आहे. विरोधी पक्षात असताना ते सत्तापक्षावर तुटून पडत, अनेक घोटाळे त्यांनी बाहेर काढले. काहीवेळा बाहेरच्या तसेच पक्षातील नेत्यांचे निरोप येत, ‘अरे! एवढे ताणू नकोस’ असे ते सांगत, पण अशा निरोपांना आणि निरोप्यांना ते कधीही बधले नाहीत. कुणाकडून कधीही उपकृत झाले नाहीत. तसे केले असते तर आज मुख्यमंत्री म्हणून त्यांना त्या उपकृततेची परतफेड करावी लागली असती, पण त्या पापाचे वाटेकरी होण्याचे त्यांनी जाणीवपूर्वक टाळले.

४७ व्या वर्षी फडणवीस यांच्या पाठीशी २५ वर्षांच्या लोकप्रतिनिधीत्वाचा अनुभव आहे. जातीपातीचा विचार त्यांना कधी शिवलेला नाही. कागदावर ते ब्राह्मण आहेत पण त्यांच्या राजकारणाचा तोंडवळा बहुजनच राहिला आहे. आणखी एक म्हणजे यशाचा शॉर्टकट त्यांनी कधीही शोधला नाही. लॉ करीत असताना ते रात्ररात्र अभ्यास करायचे, आम्ही आपले कॉलेजच्या गेटवर विकायला आलेल्या नोट्स घेऊन वेळ मारून न्यायचो. त्यांच्या दीर्घ आणि मोठ्या यशात दीर्घकाळच्या सखोल अभ्यासाचा मोठा वाटा आहे.

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता या बँकेत वरिष्ठ अन् हुशार अधिकारी आहेत. त्या उत्तम गायिका आहेत. अ‍ॅसिड हल्लाग्रस्त मुलींबरोबर मध्यंतरी त्या रॅम्पवर चालल्या. गाव दत्तक घेण्यापासून अनेक बाबतीत सामाजिक दायित्व निभावण्याची त्यांची धडपड असते. स्त्रीस्वातंत्र्य, पुरोगामित्वावर अनेक नेते बोलतात. पण त्यातील बऱ्याच जणांना त्याची सुरुवात शेजाऱ्यापासून व्हावी, असे वाटते. देवेंद्र फडणवीस दाम्पत्याने ती सुरुवात आपल्यापासून करीत सहजीवन, सहचर्य, समानतेला कृतीची अर्थपूर्ण जोड दिली आहे. हा मोठेपणा समाजाने स्वीकारण्यातही पुरोगामित्वच आहे.

 

(विशेष प्रतिनिधी, लोकमत, मुंबई)