शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

संध्याकाळी टीव्ही बंद करणारं अन् पोरांना भाकरी भाजायला शिकवणारं पश्चिम महाराष्ट्रातील गाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 08:19 IST

संध्याकाळी टीव्ही बंद करणारं गाव, मुलग्यांना भाकरी भाजायला शिकवणारं गाव... पश्चिम महाराष्ट्रातल्या ‘बदलां’चा वेध!

- श्रीनिवास नागे

सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातलं मोहित्यांचं वडगाव. पहिल्या मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्याचे जनक, दिवंगत वृक्षमित्र धों. म. मोहिते या अवलियाचं हे गाव. संध्याकाळी ७ वाजता इथल्या ग्रामपंचायतीवर बसवलेला भोंगा वाजतो. त्या कर्ण्यावरून आठवण करून दिली जाते आणि घराघरातले टीव्ही पटाटा बंद होतात. मोबाईल खाली ठेवले जातात. दीड तास सगळं बंद. बायका टीव्हीसमोरून हलतात. चुलीसमोर जातात, तर पोरं अभ्यासाला. या वेळेत पोरं रस्त्यावर दिसली की, त्यांना अभ्यासाची आठवण करून देत घरी पाठवलं जातं. दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांच्या कचकड्याच्या दुनियेत गुरफटलेल्या बायकांना आणि मोबाइलच्या मोहजालात अडकत चाललेल्या पोरांना आभासी जगापासून वास्तवात आणण्याचा हा प्रयत्न!

शेजारच्या पलूस तालुक्यातल्या भिलवडीत सकाळी नऊला भोंगा सुरू होतो. त्यावरून सूचना दिली जाते आणि सगळे स्तब्ध होतात. रस्त्यावरच्या गाड्याही जागेवर थांबतात. लोक असतील तिथं उभं राहतात. राष्ट्रगीत सुरू होतं. बावन्न सेकंदांनंतर पुन्हा सगळे आपापल्या कामाला लागतात. उत्साहानं आणि देशभक्तीची प्रेरणा घेऊन. हा दोन वर्षांपासूनचा पायंडा, व्यापारी संघटनेनं पाडलेला. कुलाळवाडी हे जत तालुक्यातल्या पूर्व भागातलं ऊसतोड मजुरांचं गाव. साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला की, पुरुषमाणसं बायका-पोरांना घेऊन ऊसपट्ट्यातली गावं जवळ करतात. दिवसभर बापयगडी, बायका ऊसतोड करण्यात गुंततात, तेव्हा पालावर साताठ वर्षांवरची पोरंच कच्च्याबच्च्यांना सांभाळत असतात. आईबापामागं जाताना गाव सोडल्यामुळं शाळेत जाणाऱ्या पोरांची शाळा सुटते.

साखर कारखान्यांनी काढलेल्या साखरशाळाही चालत नाहीत. या पोरांना गावाकडं ठेवता येत नाही, कारण घरात मागं राहिलेली म्हातारी-कोतारी कशीबशी जगत असतात, मग या पोरांना भाकरतुकडा कोण करून घालणार? त्यांना कोण सांभाळणार? त्यांच्या वाट्याला आबाळच. यावर उपाय म्हणून कुलाळवाडी गावातल्या गुरुजींनी पोरांना चुलीवर भाकरी करायला शिकवलं. भाकरी करण्याच्या स्पर्धा घेऊन बक्षिसं दिली. ऐंशी-नव्वद पोरं भाकरी करायला शिकली आणि त्यांची आईबापामागं जायची फरफट थांबली. ती गावात थांबून शाळेतच शिकू लागली.

गावानंही त्यांना जगण्याचं बळ दिलं. सांगलीजवळच्या बिसूरसारख्या काही गावांनी मृताच्या रक्षाविसर्जनालाच सर्व विधी आटोपून सुतक संपवायचा निर्णय घेतला. त्यात मराठा समाजातल्या जाणत्यांनी पुढाकार घेतला. गेल्या काही वर्षांत शेजारच्या गावांतल्या भावक्यांनीही तोच कित्ता गिरवला. अलीकडं पर्यावरण जपण्यासाठी गावं शहाणी व्हायला लागलीत. मृताची रक्षा नदी-तलावाच्या पाण्यात विसर्जित करण्याऐवजी झाडांना घालण्याचा आदर्श समोर ठेवला जातोय.

तिकडं कोल्हापुरातल्या हेरवाड गावानं तर पुढचं पाऊल टाकलं. गावात विधवा प्रथेला मूठमाती दिली. नवऱ्याच्या निधनानंतर बायकोचं कुंकू पुसणं, गळ्यातलं मंगळसूत्र काढणं, हातातल्या बांगड्या फोडणं, पायातली जोडवी काढणं, धार्मिक-सामाजिक कार्यात डावलणं हे सगळं बाईला जिवंतपणी जाळण्यासारखंच. सौभाग्यलेणी हिरावून घेणं म्हणजे सतीच्या चटक्यांपेक्षा भयानक. त्यामुळं  या गावानं विधवा प्रथा बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. असा निर्णय घेणारं राज्यातलं हे पहिलंच गाव. नंतर राज्य शासनानंही तसा निर्णय घेण्याचं आवाहन ग्रामपंचायतींना केलं. बघताबघता सगळीकडं अनुकरण होऊ लागलं.

आता या विधवाप्रथा बंदी निर्णयाच्याही पुढं जाऊन कोल्हापूर जिल्ह्यातल्याच दोन ग्रामपंचायतींनी विधवांना पुनर्विवाह करण्यासाठी ११ हजारांचं अनुदान जाहीर केलंय. शिरोळ तालुक्यातली टाकळीवाडी आणि राधानगरी ही ती दोन गावं. या ग्रामपंचायतींनी विधवांना कार्यक्रमांमध्ये हळदी-कुंकवासाठी बोलावणंही सुरू केलं. सांगली-कोल्हापूर-साताऱ्यातल्या काही गावांनी महिला सन्मान समितीच स्थापन केली, तर काहींनी धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात विधवांचं पूजन सुरू केलं. त्यांच्या हस्तेच झेंडावंदन, पायाभरणी, उद्घाटनांचा घाट घातला. हा नवा दिशादर्शक वस्तुपाठ! ही सगळी पश्चिम महाराष्ट्रातली गावं. जिथं महात्मा जोतिबा फुल्यांनी सामाजिक क्रांतीची बीजं रूजवली, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी पुरोगामी विचारांची कृतिशील पेरणी केली, क्रांतिसिंह नाना पाटलांनी ग्रामोद्धाराचा धडा शिकवला. या गावांना वाटलं, आता बदललं पाहिजे. नवतेचा आग्रह धरत अनिष्ट रूढी-परंपरांचं जोखड झुगारून दिलं पाहिजे.

कर्मकांडांना फाटा दिला पाहिजे. एकत्र येऊन निर्णय घेतले पाहिजेत. बुरसटलेल्या विचारांचं विसर्जन करताना आधुनिकतेचा अतिरेकही पाचर मारून रोखायला हवा. ‘गाव करील ते राव काय करील’ याचा प्रत्यय आणून द्यायला हवा. तसं महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात मागील सहा दशकांत प्रचंड उलथापालथ झाली. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक पातळीवर चढउतार दिसून आले. इथल्या समाजधुरिणांनी पुरोगामी-परिवर्तनावादी महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं होतं. त्यानुसार खेड्यांचा सर्वांगीण विकास केंद्रबिंदू मानून पहिली दशकं महाराष्ट्राची वाटचाल सकारात्मक पद्धतीनं सुरू झालेली.

स्वातंत्र्य आंदोलनाच्या मुशीतून तयार झालेल्या ध्येयवादी नेतृत्वानं विकासाभिमुख राजकारणाला प्राधान्यक्रम देऊन आश्वासक प्रगतीकडे वाटचाल सुरू केली; पण १९८० नंतर नागरीकरणाच्या झपाट्यात खेड्यांचा सर्वांगीण विकास मागं पडत गेला. गावखेड्यांत कमीत कमी राजकारण आणि अधिकाधिक समाजकारण-अर्थकारण या मूल्यांवर आधारित वाटचाल अभिप्रेत होती. प्रत्यक्षात मात्र १९८० नंतर सत्ताकेंद्री स्पर्धात्मक राजकारणाचा उदय झाल्यामुळं ही वाटचाल अगदी विरुद्ध दिशेनं झाली. दुसऱ्या बाजूला सामाजिकदृष्ट्या राहणीमानातला बदल स्वीकारला गेला, पण गावातलं गावपण कानकोंडं होऊ लागलं. त्यामुळंच वेगळं काहीतरी करण्याची ऊर्मी तयार झाली... आणि छोटेछोटे पण दीर्घकालीन परिणाम करणारे बदल गावकरी घडवू लागलेत; त्याची ही कहाणी! 

टॅग्स :Sangliसांगली