रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो

By विजय दर्डा | Updated: April 28, 2025 05:46 IST2025-04-28T05:44:53+5:302025-04-28T05:46:54+5:30

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद आसीम मुनीर यांनी जे गरळ ओकले, त्यावरून हे उघडच होते, की हा कारस्थानी माणूस काश्मीरकरता षड्‌यंत्र रचतो आहे.

Special editorial on Pahalgam attack | रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो

रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो

डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड,  लोकमत समूह

काही विपरीत घडले असेल तरी मी बहुधा शांत राहतो आणि कुठलाही निष्कर्ष काढण्याच्या आधी विवेक बुद्धीने विचार करतो. परंतु, काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानी नरपिशाच्चांनी जे कृत्य केले त्यामुळे माझे रक्त उसळते आहे. आपल्या सरकारला मी एवढेच सांगू इच्छितो की, आता बास! अब की बार आरपार झाले पाहिजे.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख  जनरल सय्यद आसीम मुनीर हेच गुन्हेगार असून, काही दिवसांपूर्वीच त्यांनी गरळ ओकले होते.  त्यांच्या केवळ जिभेवर विष नाही, तर त्यांच्या रक्तातच षड्‌यंत्र  मिसळलेले आहे. कारण, मुनीर हे कुविख्यात गुप्तचर संस्था आयएसआयचे संचालक होते. काश्मीर शांततेच्या रस्त्याने चालले आहे, ही गोष्ट मुनीर यांना पचवता आली नाही. गेल्यावर्षी २.३५ कोटी पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली, हा आकडा पाहून मुनीर नक्कीच मत्सरग्रस्त झाले असणार. देशातच खूप प्रश्न असल्याने त्यांचे हात बांधलेले. इम्रान खान यांचा बंदोबस्त करायचा होता; तेवढा त्यांनी केला.

शेवटी, इस्लामाबादमध्ये ओवरसीज पाकिस्तानी कन्व्हेन्शनमध्ये इम्रान खानच्या समर्थकांसमोर मुनीर यांनी भारताविरुद्ध गरळ ओकलेच.

“आम्ही सर्व प्रकारे हिंदूंपेक्षा वेगळे आहोत. आमचा धर्म, रितीरिवाज, परंपरा, विचार आणि उद्दिष्ट सर्व वेगळे आहेत,” असे ते म्हणाले. “पाकिस्तान काश्मीरला कधीही एकटे पडू देणार नाही,” असेही वर सांगितले. भारत आणि हिंदूंचा उल्लेख अशासाठी केला गेला की मुनीर यांच्याजवळ दुसरा कुठला मुद्दा नव्हता. दहशतवादाचा कारखाना बनलेल्या ज्या देशात पिठासाठी लांब लांब रांगा लागतात, तिथला  असंतोष दडपण्यासाठी धर्म आणि काश्मीरपेक्षा जास्त उपयोगाचे हत्यार दुसरे कोणते असणार?

जनाब मुनीर, आपण कुठल्या धर्मीयांबद्दल बोलत आहात? १९७१ मध्ये पाकिस्तानी सैन्याने पूर्व पाकिस्तान म्हणजेच आताच्या बांगलादेशात ज्यांचा नरसंहार केला ते तर आपल्याच धर्माचे होते! आपले सैन्य कित्येक दशकांपासून पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या १० लाख अफगाणींना देशातून पळवून लावत आहे; तेही आपल्याच तर धर्माचे आहेत.

आपण ज्या प्रकारे जगभर दहशतवादाची निर्यात करीत आहात त्याला धर्माची मंजुरी नाही. आपणच तर हाफीज सईद आणि त्याच्यासारख्या न जाणो किती दहशतवाद्यांना पाळले. आपणही त्याचे परिणाम भोगत आहात.

हिलरी क्लिंटन म्हणाल्याच होत्या, “साप पाळाल तर तो साप तुम्हालाही डसेल.” परंतु आम्ही त्या सापाला घाबरणारे नाही. साप कसा मारायचा हे आम्हाला ठाऊक आहे आणि त्याचे विष उतरवणेही आम्ही जाणतो. “जगातली कोणतीच ताकद काश्मीरला पाकिस्तानपासून वेगळे करू शकत नाही,” असे आपण म्हणता तो आपला भ्रम आहे. काश्मीर भारताचा भाग होता, आहे आणि राहील. कुठलेही बळ वापरण्याची गरज न पडता तो प्रदेशही आमच्याकडे येईल. म्हणून आज आम्ही जम्मू-काश्मीर विधानसभेत आपल्या ताब्यातील काश्मीरसाठी २४ जागा राखून ठेवल्या आहेत.

जनाब मुनीर, आपल्या सैन्याने बलुचिस्तानमध्ये ज्या प्रकारची कत्तल चालवली आहे, ती पाहता बांगलादेशप्रमाणेच तोही भाग एक दिवस वेगळा होईल. भारताचे १३ लाखांचे सैन्य पाकिस्तानला घाबरवू शकले नाही तर बलुच्यांची काय कथा, असे आपण म्हणता! पण, आपली स्मरणशक्ती कमजोर झालेली दिसते. चला, मी तुम्हाला आठवण करून देतो. १६ डिसेंबर १९७१.  वेळ संध्याकाळी ४:३१ मिनिटांची. पाकिस्तानचे तत्कालीन सेनाध्यक्ष आमीर अब्दुल्ला नियाझी यांनी ९३ हजार  पाकिस्तानी सैन्याबरोबर ढाक्यात भारतीय सैन्याचे लेफ्टनंट जनरल जगजितसिंह अरोरा यांच्यासमोर गुडघे टेकले होते. कारगिल तरी  आठवते आहे ना? का तेही विसरलात?

काश्मीर खोऱ्यात तुमच्या भाडोत्री दहशतवाद्यांनी नाव विचारून आणि पँटी उतरवून ज्या हत्या केल्या आहेत, त्यामागे भारतात द्वेषाची आग भडकविण्याचा हेतू होता. परंतु, आम्ही समजदार आणि संयमी आहोत हे लक्षात ठेवा. आम्ही मंदिरात पूजा करतो तशीच मजारीवर चादरही चढवतो. “हे आमचे पाहुणे आहेत. या पर्यटकांना मारू नका,” असे दहशतवाद्यांसमोर छाती पुढे काढून सईद आदिल हुसेन शाह नावाचा तरुण म्हणत होता, हे आपण ऐकलेच असेल. पहलगाममधील घटनेने संपूर्ण काश्मीर ढवळून निघाले आहे. तेथील वृत्तपत्रांनी भरपूर काळी शाई खर्च करून आपले दुःख आणि संताप व्यक्त केला आहे. तुम्ही धर्माच्या गोष्टी करता आणि परिस्थिती अशी निर्माण करू पाहता की पर्यटन ठप्प झाल्याने काश्मिरी माणूस भुकेने तडफडून मरावा. पाकिस्तानी खोडसाळपणाविरुद्ध तूर्तास आम्ही सिंधू नदीचे पाणी बंद करणे, सीमा बंद करणे, व्हिसा रद्द करणे अशा काही गोष्टी केल्या. शत्रूला त्याची जागा कशी दाखवायची हे आम्ही उत्तम प्रकारे जाणतो. उपचारांसाठी भारतात येणाऱ्या गरीब पाकिस्तान्यांचा मात्र तुम्ही जरूर विचार करा. गरजूंना उपचार मिळाले नाहीत, तर त्यालाही आपणच जबाबदार असाल.

आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो, जनाब मुनीर! उलट गर्वाने म्हणतो, जय हिंद! जय जवान!

Web Title: Special editorial on Pahalgam attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.