-डॉ. गौरी कानिटकर (विवाह संवर्धन समुपदेशक, पुणे)आजच्या जगात, वेगवान डिजिटल जगात, आपण सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाशी जोडले गेलो आहोत. मात्र, याच सोयीचा फायदा घेऊन काही विकृत प्रवृत्तींचे लोक 'लव्ह ट्रॅप' किंवा आर्थिक फसवणुकीचे जाळे विणत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या काही घटनांमधून एक बाब स्पष्ट होते की, आपली थोडीशी घाई किंवा भावनिक गुंतवणूक आपल्याला मोठ्या संकटात टाकू शकते. या वरूनच लग्नापूर्वी मुलगा आणि मुलगी एकमेकांसाठी अनोळखी असतात, त्यामुळे शारीरिक संबंधांबाबत घाई न करता अत्यंत सावधगिरीने आणि विचारपूर्वक वागणे गरजेचे आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच एका प्रकरणात नोंदवले आहे.
सोशल मीडियावरून होणाऱ्या ओळखींची सुरुवात सहसा खूप गोड संवादाने होते. समोरची व्यक्ती स्वतःची अतिशय चांगली प्रतिमा उभी करते. विशेषतः ज्या स्त्रिया नोकरी-व्यवसायानिमित्त घरापासून लांब राहतात किंवा ज्यांचे वय लग्नासाठी वाढत चालले आहे, अशांच्या भावनिक गरजांचा फायदा घेतला जातो. संभाषणातून एकदा का विश्वास संपादन केला की, मग ही व्यक्ती लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक मागण्या करू लागते.
सोशल मीडियामुळे नात्यांचे पदर बदलले आहेत. पूर्वी लग्नाआधी भावी वर-वधूंच्या भेटीगाठींवर मर्यादा होत्या, पण आता 'एंगेजमेंट' ते 'लग्न' हा काळ बराच मोठा असतो. हा काळ एकमेकांना समजून घेण्याचा काळ असतो.
पालकांशी मोकळा संवाद महत्त्वाचा
खरं तर फसवणूक होताना अनेकदा संवादाचा अभावही कारणीभूत ठरतो. हा संवाद घरच्यांशी असायला हवा. त्यानंतर तुमच्या अवतीभवती असणाऱ्यांशी असायला हवा. मग ते मित्र-मैत्रीण असोत किंवा तुमचे सहकारी. आजकाल मुलं आणि पालकांमधील संवाद कमी झाल्याने किंवा संवाद मोकळा होत नसल्याने मुली त्यांच्यावर आलेल्या संकटांची माहिती पालकांना देतच नाहीत त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या मानसिक आधाराचा फायदा त्यांना मिळत नाही.
'एंगेजमेंट' ते 'लग्न' हा काळ महत्त्वाचा
आता 'एंगेजमेंट' ते 'लग्न' हा काळ बराच मोठा असतो. या काळात भावनिक ओढ वाढणं स्वाभाविक आहे. याच काळात अनेकदा फसवणूक होण्याची शक्यता असते. अनेकदा मुलगा-मुलगी पालकांपासून दूर राहात असतात. अशावेळी मुला-मुलींनी एकमेकांना भेटायला जाताना दोन्ही बाजूच्या पालकांना विश्वासात घेत भेटींविषयी माहिती द्यायला हवी. स्त्रियांनी बाहेर पडताना स्वतःची सुरक्षा स्वतःच्या हातात ठेवणं गरजेचं आहे.
कायद्याचा आधार घेत अजिबात न घाबरता लढा
फसवणूक झाली तर अनेक स्त्रिया 'लोक काय म्हणतील?' किंवा 'बदनामी होईल' या भीतीने गप्प बसतात. पण लक्षात ठेवा, गुन्हेगार तुमच्या याच भीतीवर ताठ उभा असतो.जर तुमची आर्थिक किंवा भावनिक फसवणूक झाली असेल, तर पोलिसांत रितसर दाखल करा. पोलीस स्टेशनमध्ये महिला अधिकारी तुमचं म्हणणं ऐकून घ्यायला असतात. भारतीय दंड संहितेच्या कलमां नुसार अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई होऊ शकते. तुमची ओळख गुप्त राखण्याची जबाबदारी पोलिसांची असते, त्यामुळे न घाबरता पुढे या आणि सर्व पुरावे पोलिसांकडे सोपवा.
सतर्क राहा, सुरक्षित राहा
सोशल मीडियाद्वारे भेटलेल्या कोणत्याही व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवण्यापूर्वी त्याचे कुटुंब, राहण्याचे ठिकाण आणि कामाचे स्वरूप याची खातरजमा करणे आपले कर्तव्य आहे. कोणीतरी गोड बोलतंय म्हणून डोळे झाकून विश्वास ठेवू नका. जर तुम्हाला कोणाला प्रत्यक्ष भेटायचं असेल, तर खालील गोष्टी नक्की पडताळून पाहा.
सार्वजनिक जागाच निवडा
पहिली भेट नेहमी हॉटेल किंवा थेट घराऐवजी सार्वजनिक ठिकाणी (उदा. बागेत किंवा मोठ्या कॅफेमध्ये) असावी. सोबत मैत्रिणीला किंवा एखाद्या नातेवाईकाला नेणं अधिक सुरक्षित.
फिजिकल व्हेरिफिकेशन
समोरच्याने सांगितलेल्या ऑफिसचा पत्ता किंवा घरचा पत्ता स्वतः जाऊन तपासा. त्या व्यक्तीने फोनवर किंवा सोशल मीडियावर दिलेली माहिती खरी असेलच असं नाही.
पैशांची मागणी ही धोक्याची घंटा समजा
जर समोरची व्यक्ती "कार्ड ब्लॉक झालंय", "आई आजारी आहे" किंवा "इमर्जन्सी आहे" अशी कारणं देऊन पैशांची मागणी करत असेल, तर बहुतांशी प्रकरणांमध्ये ती १००% फसवणूक आहे.
पुरावे जपून ठेवा
तुमचे व्हॉट्सअॅप चॅट्स आणि कॉल रेकॉईस ही तुमची ताकद आहे. ते कधीही डिलीट करू नका. ते जपून ठेवा.
Web Summary : Beware of online relationships leading to emotional or financial exploitation. Stay vigilant, verify information, and prioritize open communication with family. Report fraud without fear, safeguarding yourself against digital deception.
Web Summary : भावनात्मक या वित्तीय शोषण की ओर ले जाने वाले ऑनलाइन रिश्तों से सावधान रहें। सतर्क रहें, जानकारी सत्यापित करें और परिवार के साथ खुले संचार को प्राथमिकता दें। बिना किसी डर के धोखाधड़ी की रिपोर्ट करें, डिजिटल धोखे से खुद को सुरक्षित रखें।