विशेष लेख: पाकिस्तानवर सडकून टीका करणारे असदुद्दीन ओवैसी झाले अवघ्या भारताचे हिरो!

By विजय दर्डा | Updated: June 2, 2025 06:48 IST2025-06-02T06:47:13+5:302025-06-02T06:48:00+5:30

ओवैसी यांनी पाकिस्तानी नेत्यांना मूर्ख आणि विदूषकसुद्धा म्हटल्याने पाकिस्तान भडकला असून, तेथील समाजमाध्यमे त्यांच्यावर हल्ले करत आहेत.

Special Article Asaduddin Owaisi who criticized Pakistan harshly became a hero for the entire India | विशेष लेख: पाकिस्तानवर सडकून टीका करणारे असदुद्दीन ओवैसी झाले अवघ्या भारताचे हिरो!

विशेष लेख: पाकिस्तानवर सडकून टीका करणारे असदुद्दीन ओवैसी झाले अवघ्या भारताचे हिरो!

डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

ऑपरेशन सिंदूर’नंतरपाकिस्तानचे पितळ परदेशात उघडे  पाडण्यासाठी पाठवण्यात आलेल्या सातही  शिष्टमंडळांनी उत्तम काम केले आहे. शशी थरूर हे अमेरिका आणि इतर देशांत पाकिस्तानच्या चिंध्या उडवतील, याचा अंदाज सगळ्यांनाच होता आणि त्यांनी ते केलेही. थरूर यांच्या बोलण्याने कोलंबिया इतका प्रभावित झाला की, भारतीय सैन्याच्या कारवाईच्या वेळी मारल्या गेलेल्या पाकिस्तानी सैनिकांबद्दल त्याने दुःख व्यक्त केले होते, ते मागे घेण्यात आले. संपूर्ण भारताला थरूर यांचा निश्चितच अभिमान आहे, परंतु ‘ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लिमीन’चे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांनी मुस्लीम देशांत जाऊन केलेल्या  कामगिरीने ते भारताचे हिरो झाले आहेत. भारतात द्वेषभावना पसरविण्याच्या पाकिस्तानच्या षड्‌यंत्राला ओवैसी यांनी सुरुंग लावला.

अर्थात, ओवैसी यांनी पाकिस्तानचा समाचार घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. परवेज मुशर्रफ राष्ट्रपती असताना, पाकिस्तानात गेलेल्या भारतीय शिष्टमंडळात मी स्वतः, पंजाब केसरीचे प्रबंध संचालक अश्विनी चोपडा ऊर्फ ‘मिन्ना’ आणि ओवैसी असे होतो. मी आणि अश्विनी यांनी, तर पाकिस्तानला त्यांच्या भूमीवर जाऊन पुष्कळच काही ऐकवले होते, परंतु ओवैसी ज्या आक्रमकपणे पाकिस्तानी राजवटीवर तुटून पडले; ती शब्दशः कमाल होती. ‘भारतात राहणाऱ्या मुसलमानांची चिंता पाकिस्तानने करू नये’, असे ओवैसी म्हणाले होते.  यावेळी त्यांनी सौदी अरब, कुवैत, बहारीन आणि अल्जेरियामध्ये जाऊन पाकिस्तानवर पुराव्यांसह हल्ला चढवला. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि सैन्यप्रमुख जनरल मुनीर यांच्याविषयी बोलताना, तर त्यांनी ‘मूर्ख’ आणि ‘जोकर’ असे शब्द वापरले.

कुवेतमध्ये ओवैसी यांनी एक प्रसंग सांगितला. पाकिस्तानचे सेनाप्रमुख जनरल मुनीर हे फिल्ड मार्शल झाल्यावर त्यांनी दिलेल्या रात्रीच्या जेवणाच्या वेळी पंतप्रधान शाहबाज यांना मुनीर यांच्याकडून एक फोटो भेट दिला गेला. तो म्हणे पाकिस्तानी सैन्याच्या तोफदलाने भारतावर केलेल्या हल्ल्याचे फोटो! त्यात अनेक अग्निबाण प्रक्षेपक प्रणाली एकदम गोळीबार करताना दिसत होत्या. प्रत्यक्षात हा फोटो चिनी सैन्याने २०१९ मध्ये युद्ध-सरावाच्या वेळी काढलेला होता, असे सांगून ओवैसी यांनी मुनीर यांचे पितळ उघडे पाडले. चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वेबसाइटवर हा फोटो पाहता येतो. ‘नक्कल करण्यासाठीसुद्धा अक्कल लागते’, अशी टर ओवैसी यांनी उडवली.

भारताच्या सात शिष्टमंडळांमध्ये सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतले ते ओवैसी यांनी. त्यांच्या तुकडीचे प्रमुख भाजपचे खासदार वैजयंत पांडा आहेत. त्याशिवाय निशिकांत दुबे, फांगनोन कोनॅक, रेखा शर्मा, सतनाम सिंह सिंधु, गुलाम नबी आझाद आणि हर्ष श्रींगला हे त्या समितीचे सदस्य आहेत. ओवैसी यांनी घेतलेल्या कडक पवित्र्यामुळे पाकिस्तान अतिशय बेचैन झाला आहे. ‘पाकिस्तानने  इस्लामबद्दल बोलूच नये. जितके मुसलमान पाकिस्तानात राहतात, त्यापेक्षा जास्त भारतात आहेत’, असे ओवैसी यांनी स्पष्टच सांगितले.  भारतीय मुसलमान इस्लामला पाकिस्तानपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ‘जाणतो’ आणि त्याप्रमाणे वागतो. हे लोक पाकिस्तानच्या चिथावणीला बळी पडणार नाहीत. 

धर्माच्या नावावर पाकिस्तान आपले शत्रुत्व रचत असताना,  भारतात इस्लाम मानणारा एक नेता त्याला खाली खेचत असेल, तर तो देश अस्वस्थ होणारच. भारतामध्ये धार्मिक उन्माद पसरावा, यासाठी पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी धर्म विचारून  हत्या केल्या. परंतु, त्यांचे षडयंत्र निकामी ठरले; कारण आम्ही भारतीय त्यांची चाल ओळखतो, असे ओवैसी यांनी म्हटले. हे सगळे त्यांनी इस्लामिक देशात जाऊन सांगितले; हे पाकिस्तानच्या अस्वस्थतेचे दुसरे कारण. इस्लामिक देशांचे नेतृत्व करण्याचे पाकिस्तानचे स्वप्न चक्काचूर होत आहे.  ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) नावाची पाकिस्तानी दहशतवादी संघटना भारतात उपद्रव घालू शकते, हे भारताने २०२३ च्या डिसेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत स्पष्ट सांगितले होते, हे ओवैसी  यांनी पुराव्यासहित इस्लामी देशांसमोर मांडले. पाकिस्तानला मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा उपयोग हा देश भारताविरुद्ध दहशतवाद भडकवण्यासाठी करतो, असे ओवैसी म्हणतात, ते खरेच आहे. पाकिस्तानला मिळालेल्या नव्या कर्जाचा उपयोगही त्यासाठीच होणार, म्हणून पाकिस्तानला पुन्हा एकदा आर्थिक बाबतीत वेगळ्या यादीत टाकले पाहिजे. ओवैसी यांच्या तिखट पवित्र्याने पाकिस्तानमध्ये चलबिचल झाली असून, तेथील समाजमाध्यमे ओवैसींवर सातत्याने हल्ले करत आहेत. परंतु,  ओवैसी  अशा हल्ल्यांना घाबरणारे नेते नाहीत, शिवाय संपूर्ण भारत त्यांच्याबरोबर उभा आहे.

जाता जाता..

मी नुकताच इटली आणि संयुक्त अरब अमिरातीचा दौऱ्यावर होतो. तेथे काम करणाऱ्या अनेक  पाकिस्तानी नागरिकांशी संवाद झाला. सगळ्यांचे हेच म्हणणे होते की, ‘इथे  भारतीयांबरोबर आम्ही बंधुभावाने राहतो. पाकिस्तानच्या खोडसाळपणाशी आम्हाला काहीही देणे-घेणे नाही. आम्ही या देशाच्या हातात फसलो, हे आमचे दुर्दैव आहे.’ त्यांच्याशी बोलत असताना माझ्या मनात सतत येत होते, उपद्रवखोरांच्या हातातून पाकिस्तानची सुटका करण्याचा कोणता मार्ग आहे?

vijaydarda@lokmat.com

Web Title: Special Article Asaduddin Owaisi who criticized Pakistan harshly became a hero for the entire India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.