सायरन वाजतात; पण आम्ही निश्चिंत आहोत, काळजी करू नका..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 09:18 IST2026-03-12T09:17:04+5:302026-03-12T09:18:00+5:30
यूएईत सर्वाधिक म्हणजे सुमारे ४३ लाख लोक भारतीय आहेत. युद्धाच्या तणावामुळे भारतीयांचे लक्ष इकडे लागले आहे; पण इथे सारे सुरळीत आहे.

सायरन वाजतात; पण आम्ही निश्चिंत आहोत, काळजी करू नका..
शिल्पा मोहिते
दुबईस्थित अभियंता
तंत्रज्ञान, संस्कृती यावर लेखन
युनायटेड अरब अमिरात किंवा यूएईमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये सर्वाधिक म्हणजे सुमारे ४३ लाख लोक भारतीय आहेत. त्यामुळे इथे तणावाची परिस्थिती निर्माण होताच साहजिकच भारतीयांच्या नजरा आमच्या दिशेनं रोखल्या गेल्या. मात्र, युद्धजन्य परिस्थिती असूनही यूएईमध्ये दैनंदिन जीवन अगदी सुरळीत सुरू आहे, हे मला आवर्जून नोंदवावंसं वाटतं.
दुबई हा मुळातच शांत, स्थिर आणि सुरक्षित प्रदेश म्हणून ओळखला जातो. इथल्या वास्तव्याबद्दल काय आवडतं असं मला कुणी विचारलं तरी ‘इथली सुरक्षितता’ असं मी नेहमी म्हणत आले आहे. स्थैर्य आणि सुरक्षितता हे ज्या देशाचं वैशिष्ट्य आहे तिथेच युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर भीती, अस्वस्थता आणि अनिश्चिततेचं सावट सर्वांच्याच मनावर होतं; पण यूएई सरकारने मात्र नागरिक, रहिवासी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला आपलं सर्वोच्च प्राधान्य मानलं. नुसतं तसं सांगून ते थांबले नाहीत, तर तशी पावलंही उचलण्यात आली. त्याची प्रचिती आम्ही रोज अगदी जवळून घेत आहोत.
सध्या आमचं जगणं ‘अलर्ट्स’ वर अवलंबून आहे. ताणतणावाच्या परिस्थितीत जे काही घडत असेल त्याची खरीखरी माहिती नागरिकांना देण्यावर इथल्या प्रशासनाचा भर आहे. त्यामुळेच अधिकृत माध्यमं आणि मोबाइल अलर्ट्सच्या मदतीनं आम्हाला वेळोवेळी माहिती दिली जाते. तणाव निवळल्यानंतर त्याबाबतही नागरिकांना सांगितलं जातं. सुरुवातीला प्रत्येक अलर्ट हृदयाचा ठोका चुकवत होता; पण आता त्याची जागा विश्वासानं घेतली आहे. नुकताच रात्री १२ वाजता वाजलेला एक अलर्टही आम्ही ‘रिसिव्ह’ केला, त्यातल्या सूचनांचं पालन केलं आणि तणाव निवळल्याचा ‘अलर्ट’ आल्यानंतर निश्चिंतपणे झोपलो. सरकारच्या कार्यक्षमतेचं आणि त्यावर नागरिकांच्या असलेल्या विश्वासाचंच हे प्रतीक आहे.
इथले सगळे मॉल्स, सुपरमार्केट्स, कार्यालयं आणि सार्वजनिक सेवा सुरळीत सुरू आहेत. लोक नेहमीसारखेच वावरताना, कामावर जाताना, खरेदी करताना किंवा कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसतात.
इथल्या सुपरमार्केटमध्ये मी दैनंदिन गरजेच्या वस्तू आणायला गेले होते. काही नागरिक ट्रॉलीज भरभरून सामान खरेदी करत होते, मात्र दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा तुटवडा निर्माण होणार नाही, घाबरून वस्तू ‘स्टॉक’ करून ठेवू नका असं सांगून प्रशासनानं नागरिकांना दिलासा दिला. नागरिकांनीही सहकार्य केलं. एरवी इथल्या ‘होमडिलिव्हरी सर्व्हिसेस’ आम्हाला पाच ते सात मिनिटांत, उशिरात उशिरा आठ मिनिटांत मिळतात, सध्या त्यासाठी अर्धा-पाऊण तास वेळ लागतो. ॲमेझॉनच्या सेवेवरही परिणाम झाला आहे; पण त्याबद्दल तक्रार नाही.
शेख महंमद बिन झायेद अल नाह्यान हे यूएईचे राष्ट्राध्यक्ष आहेत. यूएईमध्ये वास्तव्य करणारे सर्व रहिवासी इथले नागरिक नसले तरी आमच्यासाठी ते महत्त्वाचे आहेत, त्यांचं आमच्यावर आणि आमचं त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांच्या सुरक्षिततेची आम्हाला काळजी आहे असं म्हणत त्यांनी इथे राहणाऱ्या प्रत्येकाला दिलासा दिला आहे. त्यामुळे इथली परिस्थिती तणावसदृश असली तरी आम्ही निश्चिंत आहोत, तुम्हीही काळजी करू नका..