पडदा पडला, पण...
By Admin | Updated: December 2, 2014 02:02 IST2014-12-02T02:02:36+5:302014-12-02T02:02:36+5:30
चला, माणसे जोडू या’ या बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उद्घाटनीय आवाहनापासून सुरू झालेल्या इफ्फीचा पडदा अखेर अनेक कडू गोड आठवणी ठेवून पडला

पडदा पडला, पण...
चला, माणसे जोडू या’ या बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उद्घाटनीय आवाहनापासून सुरू झालेल्या इफ्फीचा पडदा अखेर अनेक कडू गोड आठवणी ठेवून पडला. मराठी चित्रपटांना देशानेच नव्हे तर परदेशी चिकित्सकांनीही आता गांभीर्याने घ्यावे, हे हा पडदा पडतानाचे भरतवाक्य. मराठी चित्रपटांच्या संदर्भात या महोत्सवातील स्थान काय राहिले हे पाहणे महत्त्वाचे ठरावे. श्रीहरी साठे दिग्दर्शित ‘एक हजाराची नोट’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा स्पेशल ज्युरी पुरस्कार आणि त्याचबरोबर शताब्दी पुरस्कार अशा दोन रजतमयूरांची केलेली कमाई मराठी चित्रपट कथानक आणि तंत्र अशा दोन्ही बाबतींत जागतिक सिनेमापेक्षा तसूभरही कमी नाही हेच सिद्ध करणारी आहे. ‘नोट’बरोबरच ‘प्रकाश बाबा आमटे’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘किल्ला’, ‘लोकमान्य’ आणि ‘यलो’ या चित्रपटांनी या महोत्सवात मराठीचे दालन समृद्ध असल्याचा निर्वाळा दिला होताच. त्यामुळेच एका आश्वासक दिशेने मराठी चित्रसृष्टीतली नवी पिढी वाटचाल करते आहे याची ग्वाही या महोत्सवाने दिली, असे म्हणता येईल. बाकी यंदाच्या चित्रपट महोत्सवाने अनेक प्रश्नांची जंत्रीही मागे ठेवली आहे. २00४ मध्ये, गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कारकिर्दीत सुरू झालेला इफ्फी यंदा त्याच्या अकराव्या वर्षी ‘कायम केंद्र’ म्हणून स्थापित झाला आहे. २0१२ मध्ये पुन्हा सत्तेवर आल्यानंतर आपल्या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्याची वेळ आली असताना दोनच वर्षांत त्यांना केंद्रात जावे लागले आहे. गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष दामू नाईक यांनी वर्षभरात ‘इफ्फी व्हिलेज’ उभारण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले आहे. या भविष्यातील योजना झाल्या. मात्र, यंदाच्या आयोजनात अनेक त्रुटी राहिल्याचे अनेक प्रतिनिधी, कलाकार, व्हीआयपी यांच्या बोलण्यातून जाणवत राहिले. रिट्रोस्पेक्टिव्ह व इतर नवनवीन विभागांच्या नावाने चित्रपटांची खोगीरभरती करताना गंभीरपणे चित्रपट पाहायला येणाऱ्यांचा भ्रमनिरास झाला. इफ्फी हा जगातील त्या वर्षातील उत्कृष्ट सिनेमा प्रदर्शित करण्याचा सोहळा ठरायला हवा. दोनशे चांगले चित्रपट आणले आणि ते कोणीच पाहिले नाहीत, अशी वेळ येण्यापेक्षा शंभरच चित्रपट आणा; पण ते अधिकाधिक लोकांना पाहू द्या, अशी मागणी पुढे आली आहे. त्याचा विचार पुढील वर्षी होईल, अशी अपेक्षा आपण करायला हरकत नाही. त्यातून महोत्सवातील काही त्रुटींवर वारंवार बोलले गेलेले आहे. त्यामध्ये चित्रपट वेळेत सुरू न होणे, चित्रपटगृहाबाहेर लांबच लांब रांगा लागणे, चित्रपटाची वेळ आली तरी प्रतिनिधींना आतच न सोडणे, अशा अनेक गोष्टी या वर्षी घडल्या. अशा घटनांमुळे प्रतिनिधी नाराज होतात. त्यांना गंभीरपणे चित्रपट पाहता आला पाहिजे, त्यावर चर्चा करता आली पाहिजे असे वातावरण इथे तयार व्हायला हवे. गेली दहा वर्षे इफ्फी इथे स्थिरावू नये म्हणून अनेक लॉबींकडून प्रयत्न होत आहेत, आता गोवा कायम केंद्र झाल्यानंतर त्यांच्या मागणीला पुष्टी देण्यासाठीच आपली पावले पडणार आहेत का? आयनॉक्सचे चार स्क्रिन, माकिनेझ पॅलेसचे दोन आणि कला अकादमी अशी जवळपास अडीच हजार आसनक्षमताच आपल्याकडे आहे. पुढील वर्षी ही क्षमता पाच हजारपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले असेल तर ती स्वागतार्ह गोष्ट आहे. मात्र, पणजीत अजून दोन चांगली चित्रपटगृहे आहेत. त्यातील एकात भारतीय रेट्रोस्पेक्टिव्ह विभागातील चित्रपट आणि दुसऱ्यात माहितीपट दाखविण्याची व्यवस्था झाली तर या दोन गोष्टींत रस असणारे प्रेक्षक त्याचा चांगल्या प्रकारे आस्वाद घेऊ शकतील. ज्या चित्रपटांची सर्वाधिक चर्चा त्या वर्षी झाली असेल, असे चित्रपट जास्त आसनक्षमता असणाऱ्या चित्रपटगृहात दाखवले जावेत, त्यामुळे प्रतिनिधींची कमीत कमी निराशा होईल. ज्या चित्रपटांची महोत्सवात अधिक चर्चा होते, अशा चित्रपटांचे आणखी दोन खेळ लहान प्रेक्षागारात दाखवता येतील. या महोत्सवासाठी देशभरातून प्रतिनिधी येत असतात, हे लक्षात घेता त्यांच्यासमोर ‘हाउसफुल’ची पाटी नाचवणे गोव्याची नकारात्मक प्रतिमा बनवेल. इफ्फीत उद्घाटनीय, समारोपीय आणि पारितोषिकप्राप्त चित्रपटांचे महोत्सवानंतर एक दिवस पुन्हा प्रदर्शन व्हावे, म्हणजे हा चित्रपट चुकलेल्यांना ते पाहण्याची संधी मिळेल. इफ्फीतील प्रतिनिधी नोंदणी तेरा हजारांच्या आसपास आहे. त्यातील आठेक हजार प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थिती लावतात. पुरस्कारप्राप्त चित्रपट कला अकादमीत दोनदा प्रदर्शित झाला तरी जास्तीत जास्त १६00 प्रेक्षकच तो बघू शकतात. ज्यांना खराच चित्रपटांत रस आहे, ते हे चित्रपट पाहण्यासाठी आणखी एखादा दिवस सहज गोव्यात राहतील. इफ्फीचा पडदा पडताना निर्माण झालेले प्रश्न पुढील पडदा उघडण्यापूर्वी सोडविल्यास प्रतिनिधींना तो मोठा दिलासा ठरेल.