समुद्रात विरघळणारं प्लॅस्टिक- नवं ‘सीक्रेट’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 11:07 IST2025-06-12T11:04:05+5:302025-06-12T11:07:34+5:30
Plastic: जपानी संशोधकांनी अवघ्या काही तासांमध्ये समुद्राच्या पाण्यात विरघळून जाईल अशा प्लॅस्टिकचा शोध लावल्याची बातमी नुकतीच आली आहे.

समुद्रात विरघळणारं प्लॅस्टिक- नवं ‘सीक्रेट’
जपानी संशोधकांनी अवघ्या काही तासांमध्ये समुद्राच्या पाण्यात विरघळून जाईल अशा प्लॅस्टिकचा शोध लावल्याची बातमी नुकतीच आली आहे. प्लॅस्टिक कचरा आणि त्याचा पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम हा संपूर्ण जगाच्या चिंतेचा विषय आहे. प्लॅस्टिकचा भस्मासुर रोखायचा कसा, प्लॅस्टिकची विल्हेवाट कशी लावायची, प्लॅस्टिकला पर्याय काय, अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्यात जगातले किती तरी लोक गुंतले आहेत. कुणी प्लॅस्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी रस्तेबांधणीत त्याचा उपयोग करतंय, कुणी इंधन बनवतंय, तर कुणी इतर काही; पण अजून तरी प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना सापडलेली नाही. जपानी शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या या नव्या प्लॅस्टिकमुळे मात्र भविष्यात तरी या सर्व प्रश्नांवर उत्तरं सापडतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
जपानमधील रिकेन सेंटर फॉर इमर्जन्सी मॅटर सायन्स आणि टोकियो विद्यापीठाने अवघ्या काही तासांत विरघळून नष्ट होणारं प्लॅस्टिक तयार तयार केलं आहे. या प्लॅस्टिकचं संपूर्ण विघटन होतं आणि कोणतेही अवशेष उतर नाहीत. जपानमधील वाको या शहरात हे संशोधन करण्यात आलं आहे. अद्याप तरी या संशोधकांच्या गटाने अशा प्लॅस्टिकच्या उत्पादनाबाबत काही नियोजन केलेलं नाही. मात्र, पॅकेजिंग उद्योगानं या संशोधनात मोठ्या प्रमाणात रस घेतल्याचं संशोधकांच्या गटाचे प्रमुख ताकुझो ऐदा यांनी म्हटलं आहे. प्लॅस्टिकला पर्याय शोधण्यासाठी जगभर चाललेल्या वेगवान प्रयत्नांना या संशोधनामुळे एक नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे.
प्लॅस्टिक आणि त्यामुळे होणारं प्रदूषण हा सध्या समस्त मानवजातीपुढील चिंतेचा विषय आहे. मानवी रक्तातही प्लॅस्टिक आढळल्याचं संशोधनातून सिद्ध झालं आहे. प्लॅस्टिक कचरा समुद्रात गेल्यामुळे समुद्रातील जैवविविधता धोक्यात आल्याच्या बातम्या कायमच समोर येत असतात. अशातच २०४० पर्यंत प्लॅस्टिकमुळे होणारं प्रदूषण तिप्पट होणार असल्याचा, त्याचाच परिणाम म्हणून जगातील महासागरांमध्ये दरवर्षी सुमारे २३-३७ मिलियन मेट्रिक टन प्लॅस्टिक कचरा जमा होण्याचा धोक्याचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रम विभागाकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या पुढच्या पिढ्यांकडे इतर कुठल्याही ग्रहावर जाऊन राहण्याचा पर्याय नसल्यामुळेच त्यांना अधिकाधिक सुस्थितीतील पृथ्वीवर राहायला मिळावं, ही आपली जबाबदारी असल्याची भावना ऐदा यांनी व्यक्त केली आहे.
ऐदा म्हणतात, समुद्राच्या पाण्यात विरघळणारं प्लॅस्टिकही सध्याच्या प्लॅस्टिकइतकंच मजबूत आहे. समुद्राच्या पाण्यात मीठ असल्यामुळे त्यात ते अवघ्या काही तासांत विरघळून जाईल. विरघळल्यानंतर त्या पाण्यात मिसळलेल्या मायक्रोप्लॅस्टिकचा समुद्री जीवांवर काहीही विपरीत परिणाम होत नाही. कारण ते पूर्णपणे ‘ओशन डिग्रेडेबल’ आहे. त्यामुळे अन्नसाखळीवरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाही. केवळ समुद्राच्या पाण्यातच नाही तर जमिनीतही या प्लॅस्टिकचं विघटन शक्य आहे. फक्त ती प्रक्रिया थोडी वेळखाऊ असेल. जमिनीतही काही प्रमाणात मिठाचा अंश असल्यामुळे सुमारे पाच सेंटिमीटरच्या नव्या प्लॅस्टिकच्या तुकड्याचं २०० तासांमध्ये विघटन शक्य असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.