पवार नावाचे महाकोडे
By Admin | Updated: November 24, 2014 04:19 IST2014-11-24T04:19:11+5:302014-11-24T04:19:11+5:30
शरद पवार हे गेली ४० वर्षे महाराष्ट्राला न उलगडलेले आणि तरीही आवडत आलेले महाकोडे आहे.

पवार नावाचे महाकोडे
शरद पवार हे गेली ४० वर्षे महाराष्ट्राला न उलगडलेले आणि तरीही आवडत आलेले महाकोडे आहे. १९७८ पासूनची त्यांची राजकीय वाटचाल साऱ्यांनी पाहिली. पाहणाऱ्यांना ती भावलेलीही दिसली. पण, ती नेहमीच तिच्या खऱ्या स्वरूपात त्यांना उमगली, असे मात्र नाही. अलिबागेत नुकत्याच झालेल्या त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिंतन-बैठकीनंतर तर शरद पवार हे त्यांच्या पक्षालाच नव्हे, तर घरालाही पुरते समजले नाहीत, असे अनुमान काढायला जागा आहे. महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या भाजपा सरकारला स्थिर राखू, असे प्रथम म्हणणारे पवार पुढे ते सरकार स्थिर राखणे ही आमची जबाबदारी नाही, असे म्हणताना दिसले. सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी त्यांच्या पक्षाचे आमदार ठरावाच्या बाजूने मतदान करतील, तटस्थ राहतील की बहिर्गमन करतील, याचा निर्णय ते अखेरच्या क्षणी घेणार होते. प्रत्यक्षात मतदानाची वेळ सभापतींनीच येऊ न दिल्यामुळे त्यातले गौडबंगाल तसेच कायम व अनुत्तरित राहिले. भाजपाला विधानसभेत १२१ जागा मिळाल्या तेव्हा त्या पक्षाने मागणी न करताही त्याला आपला बिनशर्त पाठिंबा असल्याची घोषणा करण्याचा आदेश पवारांनी आपले बिनीचे शिलेदार प्रफुल्ल पटेल यांना दिला. राजकारणात बिनशर्त असे काही नसतेच, हे सगळ्या जाणत्यांना कळत असतानाही त्यांच्या पक्षातील वा बाहेरच्याही कुणी त्यांना त्याचा अर्थ विचारला नाही आणि त्यांनीही तो उघड करून सांगण्याची तसदी घेतली नाही. महाराष्ट्राला आता आणखी निवडणुका नकोत, हे त्यांचे म्हणणे पटण्याजोगे असले, तरी त्यांचा ‘सेक्युलर’ पक्ष (राष्ट्रवादी काँग्रेसचे त्याच्या एका पूर्वावतारातील नाव सेक्युलर कॉँग्रेस असेच होते. त्या नावातील एस काँग्रेस या आद्याक्षरांवरून काही जण त्याला शरद काँग्रेस असेही म्हणायचे. पण ते तितकेसे बरोबर नसावे.) भाजपासारख्या हिंदुत्वनिष्ठ पक्षाला बिनशर्त पाठिंबा तेवढ्यासाठी देतो हे कोणालाही न पटणारे होते. शिवसेनेला सत्तेबाहेर राखण्यासाठी त्यांनी ते केले, असे म्हणावे तर आज ना उद्या शिवसेना हा पक्ष आपली शिंगे मोडून सरकारात सामील होणारच आहे, हे न कळण्याएवढे पवार खुळेही नाहीत. काँग्रेसला धडा शिकवायचा म्हणून त्यांनी हे केले, असे म्हणावे तर मतदारांनी त्या पक्षाला आधीच धडा शिकविला आहे. (तसा तो पवारांच्या राष्ट्रवादीलाही त्यांनी शिकवला आहे) मग ‘बाहेरून’ व ‘बिनशर्त’ पाठिंबा कशासाठी असावा? एक गोष्ट मात्र खरी राजकारणात कोणी कोणाचे कायमचे मित्र वा शत्रू नसतात. त्यात कायम काय असेल, तर ते फक्त स्वहितच. शिवाय शरद पवारांएवढा स्वहितदक्ष पुढारी महाराष्ट्रात आजतरी दुसरा कोणी नाही. त्यांनी तडजोडी केल्या. त्यासाठी प्रसंगी आपले आग्रह बाजूला सारले. आर्जवे केली. ते काँग्रेसबाहेर पडले व पुन्हा त्याच पक्षात गेलेही. मात्र, यातल्या कोणत्याही वळणावर त्यांनी आपले स्वहित-सावधपण सोडले नाही. आताचे त्यांचे वागणेही स्वहितार्थ आहे, हे उघड आहे. पण तसे उघड होऊ देतील,तर ते पवार कसले? त्यांनी आपल्या पक्षातील वरिष्ठांजवळच नव्हे, तर सुप्रिया सुळे या आपल्या कन्येजवळही ते उघड होऊ दिले नाही. परिणामी, ‘भाजपा सरकारला बिनशर्त पाठिंबा देणे ही आमच्या पक्षाची चूक झाली,’ असे उद््गार भीतभीत का होईना जयंत पाटलांनी अलिबागेत काढले. त्यांना लागलीच वरून चपराक आली असणार. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपले ते वक्तव्य मागेही घेतले. तसेच उद््गार सुप्रिया सुळे यांनीही काढल्याची बातमी आली. त्यांनीही भाजपा सरकारला पाठिंबा दिल्यामुळे समाजातील अल्पसंख्यकांचा वर्ग आपल्यापासून दूर गेला, भाजपाला पाठिंबा ही चूकच, असेही त्यांनी ठामपणे म्हटल्याचे प्रसिद्ध झाले, पण आता सुप्रियातार्इंना त्यांचे शब्द गिळावे लागले. तसाही पवारांच्या पक्षावर जनतेचा रोष आहे. आघाडी सरकारच्या काळात त्यांच्या पक्षाच्या पुढाऱ्यांनी आणि मंत्र्यांनी सिंचनापासून विजेपर्यंतच्या क्षेत्रात जो प्रचंड हैदोस घातला तो लोकांच्या विस्मरणात जाणारा नाही. या घोटाळ्यात पवारांचे पुतणे अजितदादा व त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ही दोन्ही दुसऱ्या पातळीवरची मोठी माणसे अडकली आहेत. ती दीर्घकाळ राजकारणात राहणार आहेत आणि ती तशी राहतील तोपर्यंत जनतेच्या नजरा त्यांच्यावर खिळून राहणार आहेत. पवारांना त्यांचा पक्ष आणि त्यातले हे दोन पुढारी सुरक्षित झालेले पाहायचे आहेत. बाहेरून पाठिंबा किंवा बिनशर्त पाठिंबा, असे एकदा म्हणायचे आणि सरकार स्थिर राखणे ही आमची जबाबदारी नाही, हे नंतर सांगायचे आणि साऱ्यांची आसने अस्थिर ठेवायची व त्यांची नजर आपल्यावर राखायची, हे यातून पवारांनी पुन्हा एकवार साधले आहे.