ये हाफिज और मसूद अजहर हमें दे दो, मुनीर!
By विजय दर्डा | Updated: May 12, 2025 04:36 IST2025-05-12T04:31:44+5:302025-05-12T04:36:07+5:30
युद्धविराम झाला खरा, पण पाकिस्तानने जे दहशतवादी पाळले आहेत, त्यांचे काय? या देशाची शेपटी वाकडीच आहे. ती कधी ना कधी कापावीच लागणार, हे नक्की!

ये हाफिज और मसूद अजहर हमें दे दो, मुनीर!
डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर याच स्तंभात मी लिहिले होते, ‘रक्त उसळते आहे. आता आरपार होऊन जाऊ द्या.’ भारताने ज्याप्रकारे पाकिस्तानच्या आगळिकीला उत्तर दिले ते पाहून वाटले होते की आता फैसला होऊनच जाईल. परंतु भारत-पाकिस्तान युद्धविरामाला तयार झाले असल्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे अचानक ट्वीट आले.
हे काय? दोन्ही देशांच्या आधी ट्रम्प यांनी घोषणा कशी काय केली?- असे प्रश्न पडले; परंतु ट्रम्प वाट्टेल ते करू शकतात. अमेरिकेच्या टीमने भारत आणि पाकिस्तानचे समकक्ष अधिकारी आणि नेत्यांमध्ये बोलणे घडवून आणले. भारताला समजावले की हे प्रकरण चीनच्या हातात जाऊ नये यासाठी युद्धविराम गरजेचा आहे.
‘भविष्यात कोणतीही दहशतवादी घटना युद्ध मानली जाईल,’ अशी घोषणा भारताने युद्धविरामाच्या आधी केली. युद्ध काही चांगली गोष्ट नाही, संवादातून प्रश्न सोडवणेच केव्हाही चांगले. परंतु पाकिस्तानचे शेपूट इतके वाकडे आहे; ते सरळ होण्याची अपेक्षा ठेवणे फोल होय! शनिवारी संध्याकाळी युद्धविराम झाला. त्यानंतरही पाकिस्तानने जम्मू-काश्मीरपासून राजस्थानपर्यंत ड्रोन हल्ल्यांचे प्रयत्न केले. आपल्या सैन्याने ते निष्फळ ठरवले; परंतु पाकिस्तानचा खोटेपणा समोर आला.
रविवारी हा स्तंभ लिहित असताना सीमेवर शांतता स्थापित झाली आहे; परंतु ती कुठवर टिकेल हे सांगणे कठीण. तेथील लष्करप्रमुख जनरल मुनीर यांनी शहबाज शरीफ यांचे हात पिरगाळले आहेत. शहबाज यांना त्यांचे बंधू नवाज यांनीही समजावले. परंतु रात्री शरीफ यांनी मुनीर यांची केलेली प्रशंसा पाहता ते आपली खुर्ची वाचवण्याच्या मागे आहेत हे दिसतेच. इम्रान खान होणे त्यांना कसे मानवेल?
पाकिस्तानातील सरकार सैन्य आणि आयएसआय या गुप्तचर संस्थेच्या हातात असते. अमेरिका आणि चीन अशा दोन्ही देशांच्या संपर्कात राहण्याची चलाखी मुनीर यांनी केली. पाकिस्तानला १.३ अब्ज डॉलर्सचे कर्ज नुकतेच मंजूर झाले आहे. ते मिळवायचे तर युद्धविराम करणे आवश्यक होते. एरवी पैसे मिळाले नसते. भारताने ज्याप्रकारे त्यांची एअर डिफेन्स सिस्टम निकामी केली ती पाहता पाकिस्तान लढाईच्या मैदानात टिकणे अशक्यच होते.
याशिवाय आणखीही एक कारणही असू शकते. ‘एचक्यू नाइन’ नावाची पाकची एअर डिफेन्स सिस्टम एकदम फुसकी निघाली. तो चिनी माल होता. आपल्या या एअर डिफेन्स सिस्टमसाठी चीन बाजारपेठ शोधतो आहे. पाकिस्तानमध्ये ती यंत्रणा निकामी ठरणे त्यांच्या प्रयत्नांवर परिणाम करू शकते.
काश्मीरमधले लोक आपल्याला मदत करतील असे पाकिस्तानला वाटले असेल, परंतु तसे काहीही झाले नाही. उलट जम्मू-काश्मीरच्या लोकांनी पाकिस्तानचा विरोधच केला. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची विशेष प्रशंसा केली पाहिजे. त्यांनी काश्मीरला प्रगतिपथावर नेले आहे. ओमर अब्दुल्ला यांच्याबरोबर ओवेसी यांनीही मने जिंकली; पण काँग्रेस पक्षाने मात्र खमकी भूमिका घेण्याची संधी गमावलीच. भारतीय सैन्याच्या बाजूने कर्नल सोफिया कुरेशी यांच्या ‘प्रेस ब्रीफिंग’मधून हा संदेश गेला की भारतात धर्म कोणताही असला, तरी सगळे भारतीय एक आहेत.
भारताची संस्कृती कायमच शांततेचा पुरस्कार करत आली आहे. आपण भगवान महावीर, भगवान बुद्ध आणि महात्मा गांधी यांच्या रस्त्याने चालणारे शांतताप्रिय लोक आहोत. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे आपले सूत्र आहे. भारताने कधी कुठल्या दुसऱ्या देशावर हल्ला केलेला नाही याची साक्ष इतिहास देईल. ‘जगा आणि जगू द्या’ या सूत्रावर भारताचा विश्वास आहे. परंतु जर कुणी भारताच्या वाटेला गेले, भारतावर डोळे वटारले तर त्याचे डोळे काढून हातात देण्याची क्षमताही या देशात आहे. भारत लवकर क्रोधित होत नाही, पण गरज पडली तर शिवशंकराप्रमाणे तांडवही करू शकतो आणि महाकालीप्रमाणे राक्षसांचा संहार करण्यातही मागे राहत नाही.
पाकिस्तानने आधी पहलगाममध्ये निर्दोष पर्यटकांचे रक्त सांडले. भारताने विरोध केला असता त्या देशाने सीमेवर नागरी वस्तीत बॉम्बवर्षाव करून १६ पेक्षा जास्त भारतीयांची हत्या केली. इतके सगळे होऊनही भारताने पाकिस्तानच्या नागरी वस्तीत हल्ला केलेला नाही. भारताचा हल्ला केवळ दहशतवादाविरुद्ध होता. पाकिस्तानी सैन्याने सर्व दहशतवाद्यांना आता आपल्या छायेखाली घेतले आहे; जेणेकरून कोणी त्यांना कंठस्नान घालू नये. असे असूनही भारतीय सैन्याच्या हल्ल्यात कुख्यात दहशतवादी मसूद अजहर याच्या कुटुंबातील १० सदस्य मारले गेले. पाच जहाल दहशतवाद्यांचेही शिरकाण झाले.
लष्कर-ए-तोयबाचा मुदस्सर खादियान ऊर्फ अबू जुंदाल याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी पाकिस्तानी सैन्याने ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिले. जनरल मुनीर आणि पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. जैश-ए-महंमदचा हाफिज मोहम्मद जमील, आयसी ८१४ विमान अपहरणाचा गुन्हेगार मोहम्मद युसूफ अजहर, मोहम्मद हसन खान आणि लष्कर-ए-तोयबाचा खालिद उर्फ अबू आकाश यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीही पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी उपस्थित होते.
युद्धामुळे अंतिमतः नुकसानच होते. भारताला युद्ध नको आहे हे तर खरेच. परंतु भारताला दहशतवादही नको आहे. पाकिस्तानला जर शांतता हवी असेल आणि भारताचे रौद्र रूप पुन्हा पहावयाचे नसेल तर त्या देशाने हाफिज सईद आणि अजहर मसूद यांना भारताकडे सोपवावे असे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. जनरल मुनीर, यातच तुमचे भले आहे. अन्यथा आम्ही सोडणार नाहीच. जय हिंद!