आता ‘मदर’वर हल्ला
By Admin | Updated: February 25, 2015 23:14 IST2015-02-25T23:14:02+5:302015-02-25T23:14:59+5:30
समाजाला ज्या कोणाविषयी आदर, आस्था, श्रद्धा वा प्रेम वाटत असेल त्या प्रत्येकाविषयी कोणत्या ना कोणत्या त-हेच्या संशयाचे बीज पेरत राहणे

आता ‘मदर’वर हल्ला
समाजाला ज्या कोणाविषयी आदर, आस्था, श्रद्धा वा प्रेम वाटत असेल त्या प्रत्येकाविषयी कोणत्या ना कोणत्या त-हेच्या संशयाचे बीज पेरत राहणे हा काही व्यक्तींच्या व संघटनांच्या कार्यक्रमपत्रिकेचाच एक भाग आहे. त्यातून गांधी सुटत नाहीत, टिळक नाहीत, नौरोजी नाहीत आणि मौलानाही नाहीत. त्यातही ज्यांच्याविषयी असा संशय पेरायचा ती माणसे परधर्माची असली की हे बीजारोपण आणखी सोपे होते. ख्रिश्चन मिशनऱ्यांचे वर्ग व त्यांचे संत यांच्याविषयी तसे करणे सहज जमणारे आहे आणि संघाच्या कार्यक्रम पत्रिकेचाच तो एक भाग आहे. इंदिरा गांधींचा खून करणाऱ्या गुन्हेगारांचा गौरव करण्याचा एक घातक पायंडा अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने अकाली दलाच्या सोबतीने पाडला आहे. या अकाल्यांशी राजकीय समझोता केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या संघ या पितृसंस्थेने गांधीजींचा खून करणाऱ्या गोडसेविषयी तिला वाटणारे ममत्व नेहमी असेच सूचित केले आहे. काही वर्षांपूर्वी ओडिशाच्या अरण्य प्रदेशातील कुष्ठरुग्णांची सेवा करणाऱ्या ग्रॅहम स्टेन या धर्मगुरूला त्याच्या दोन मुलांसह मोटारीत कोंडून जिवंत जाळणाऱ्यांचा धर्मवीर म्हणून गौरव करायला पुढे आलेले लोकही अशावेळी आपल्याला आठवावे. हा सारा प्रकार येथे सांगण्याचे कारण व्हॅटिकनच्या धर्मपीठाने जिला संतत्व प्रदान केले आणि देशाने जिचा भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरव केला, त्या सेवामूर्ती मदर तेरेसावर छुप्या पद्धतीने धर्मांतर घडवून आणल्याचा रा.स्व. संघाच्या मोहन भागवतांनी केलेला आरोप हे आहे. भागवतांचा आरोप एकट्या मदरवर नाही, संघापासून फटकून असणाऱ्या साऱ्यांविषयीच त्यांची ती भावना आहे. भारत हे हिंदू राष्ट्र आहे हे त्यांचे विधान मान्य नसणारे सारेच त्यांच्या मते धर्मद्रोही व देशद्रोही आहेत. साऱ्यांना असे घाऊक पद्धतीने द्रोही ठरविणाऱ्या माणसांची मानसिकता एकारलेली व एकांगी असते. भागवत व संघ या दोहोंचीही मानसिकता त्या प्रकारची आहे. मदर तेरेसा काय किंवा अल्बर्ट श्वाएट््झर काय, सेवा धर्माचा वसा घेतलेली मिशनरी माणसे जगभर गेली. जेथे कुणी जाणार नाही अशाही ठिकाणी पोहचून त्यांनी त्यांचे मानवी सेवेचे कार्य चालविले. स्वाभाविकच त्यांचा गौरवही जागतिक पातळीवर झाला. मात्र त्यांच्या सेवाधर्माचे अनुकरण करणे, त्यासाठी अरण्यप्रदेशात राहून आदिवासींची व वंचितांची खरी सेवा करणे ज्यांना जमले नाही त्यांच्या मनात या सेवाधर्मी माणसांविषयी नेहमीच एक विषाक्त असूया राहिली. (त्यांनी आदिवासींना आदिवासी न म्हणता वनवासी म्हटले. आदिवास हा हक्क आहे आणि वनवास ही शिक्षा आहे हे ठाऊक असतानाही त्यांनी हे जाणीवपूर्वक केले.) मदर तेरेसांविषयी कोलकाता शहरात व बंगालमध्येच नव्हे तर साऱ्या देशात श्रद्धेची व प्रेमाची भावना आहे. त्यांच्या निखळ सेवाकार्याचा गौरव सर्वत्र आदरभावाने केला जातो. भागवतांनी मात्र मदरचा हा सेवाभाव खरा नसून तो त्यांच्या धर्मप्रसाराच्या कार्याचा भाग होता असे मदरच्या मृत्यूनंतर १७ वर्षांनी सांगून त्यांच्याविषयी संशय उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला आहे. मदर तेरेसा यांच्या कामाविषयीची जाण असणाऱ्यांनी भागवतांच्या या आगाऊपणाचा तत्काळ निषेधही केला. त्यांच्या या आरोपाची दखल घेऊन प्रत्यक्ष व्हॅटिकनच्या धर्मपीठाने मदरचे कार्य त्यांच्या संस्थेत जाऊन पाहण्याचे व मगच आपले मत बनविण्याचे आपले आवाहन भागवतांना केले आहे. मदर तेरेसांच्या सेवाभावाने भारावून जाऊन एखाद्याने त्यांचा धर्म स्वीकारला असेल तर त्याला त्यांनी विरोध केला नाही. पण धर्म प्रसाराची सक्ती करण्याचे किंवा जाणीवपूर्वक कोणाचे धर्मांतर घडवून आणण्याचे धार्मिक पापही त्यांच्या हातून कधी घडले नाही. असीमानंद नावाचा संघाचा एक कार्यकर्ता ‘वनवासी’ क्षेत्रात मारुतीचे मुखवटे वाटून तेथील नागरिकांचे धर्मांतर घडवून आणतो. तसाही कोणता प्रकार मदरने केला नाही. त्यांचे कार्य लोकांच्या साक्षीने व जनतेच्या डोळ्यांसमोर झाले. त्यातून त्यांच्याविषयीचा लोकादर वाढला. पण दुसऱ्यांविषयीचा असा आदर जोवर पुसून काढला जात नाही तोवर त्या जागांवर आपल्या श्रद्धामूर्तींची स्थापना करता येत नाही ही अडचण असल्याने प्रत्येकच थोरामोठ्याविषयी संशय उभा करीत सुटणे हे काम जाणीवपूर्वक करावे लागते. २०१४च्या निवडणुकीत भाजपाला सत्ता मिळाल्यापासून दिल्लीतील ख्रिश्चनांच्या श्रद्धास्थानांवरचे हल्ले वाढले. भागवतांच्या तेरेसावरील टीकेनंतर कर्नाटकातील मंगलोर परिसरातल्या चर्चेसवर हल्ले झाले. याआधी एकट्या ओडिशामध्ये त्या धर्माची १२०० पूजास्थाने जाळून भस्मसात करण्याचा उद्योग झाला. हे डांग परिसरात झाले, कर्नाटकात झाले आणि गुजरातेत त्याचा कहर झाला. खेद याचा की या विषारी प्रचाराचा समाजातील समंजस म्हणविणाऱ्या अधिकारी व्यक्तींनीही कधी निषेध केला नाही. अशा बाबींकडे दुर्लक्षच अखेर सामाजिक एकोप्याला तडे
देते व त्यातूनच राष्ट्रीय एकात्मतेची भावना दुबळी होते हेही या ज्ञानी म्हणविणाऱ्यांना कधी वाटल्याचे दिसले नाही. दाभोलकरांची हत्त्या किंवा पानसऱ्यांचा खून या गोष्टी धर्मद्वेषाच्या याच रांगेत बसणाऱ्या असतात. त्यातल्या प्रत्येकीचीच दखल घेणे आवश्यक असते.
मग तसे करणारी वा बोलणारी व्यक्ती कितीही मोठी
का असेना.