मुंबईचा पहिला ‘बंद सम्राट’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 04:23 AM2019-01-30T04:23:39+5:302019-01-30T04:24:06+5:30

जॉर्ज फर्नांडिस यांनी आपल्या संघटनात्मक ताकदीच्या बळावर गोदी कामगार, रेल्वे कर्मचारी, महापालिका, बेस्ट व एसटी कर्मचारी यांच्याबरोबरच मुंबईतील फेरीवाले, रसवंतीगृहे, गुमास्ते, चित्रपटगृहे व हॉटेलांतील कामगार, टॅक्सीचालक अशा सर्व कष्टकऱ्यांचे नेतृत्व केले व त्यांना न्याय मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

Mumbai's first 'closed emperor' | मुंबईचा पहिला ‘बंद सम्राट’

मुंबईचा पहिला ‘बंद सम्राट’

Next

कर्नाटक राज्यातील मंगळुरूमध्ये ३ जून १९३० रोजी जन्म झालेल्या जॉर्ज फर्नांडिस यांनी आपल्या संघटनात्मक ताकदीच्या बळावर गोदी कामगार, रेल्वे कर्मचारी, महापालिका, बेस्ट व एसटी कर्मचारी यांच्याबरोबरच मुंबईतील फेरीवाले, रसवंतीगृहे, गुमास्ते, चित्रपटगृहे व हॉटेलांतील कामगार, टॅक्सीचालक अशा सर्व कष्टकऱ्यांचे नेतृत्व केले व त्यांना न्याय मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना धार्मिक शिक्षणासाठी पाठविले होते. मात्र त्यांचे मन तेथे रमले नाही व तिथून त्यांनी सन १९४९ मध्ये मुंबईचा रस्ता धरला. मुंबईत आल्यावर सुरुवातीला त्यांनी बोरीबंदरच्या पदपथावर संसार थाटला व कालांतराने त्यांनी हॉटेलमध्ये काम केले. तिथे काम करतानाच हॉटेल कर्मचाºयांच्या प्रश्नावर ते बोलू लागले.

कामगार चळवळीचे, गोदी कामगारांचे नेते पी ‘डि’मेलो यांच्याशी त्यांचा संबंध आला आणि त्यातून समाजवादी व कामगार चळवळीकडे त्यांची पावले वळली. ‘डि’ मेलो यांच्या निधनानंतर गोदी कामगारांचे नेतृत्व त्यांच्याकडे आले. त्यांनी गोदी कामगारांना न्याय मिळवून दिला. पुढे मुंबई महापालिकेतील कर्मचाºयांच्या प्रलंबित प्रश्नांवर संप व बंद करून त्यांनी प्रशासनाला कर्मचाºयांच्या समस्या सोडविण्यास भाग पाडले. त्यामुळे सर्व क्षेत्रांतील कामगार, कर्मचाºयांना त्यांच्यामध्ये आपले नेतृत्व मिळाले. या काळात महापालिका, बेस्ट, टॅक्सी, हॉटेल कर्मचारी सर्व कामगारांचे नेते म्हणून जॉर्ज उदयास आले.

जॉर्ज यांना कामगार आंदोलनात यश मिळू लागल्याने त्यांचा मुंबईभर दबदबा निर्माण झाला. रेल्वे कर्मचाºयांनी त्यांना संघटनेचे नेतृत्व करायला बोलावले. तेव्हा जॉर्ज यांचे गुरू पीटर अल्वारिस हेच नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे अध्यक्ष होते. जॉर्ज यांनी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवून संघटनेचे अध्यक्षपद मिळविले. त्यापूर्वी रेल्वे कर्मचाºयांचा संप सरकारने दोनदा मोडून काढला होता. पण जॉर्जनी २ मे १९७४ ला मुंबई बंद करून दाखविली.

जॉर्जनी ८ मे १९७४ रोजी सुरू केलेला रेल्वेचा संप २0 दिवस चालविला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संप फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र संप कायम ठेवण्यात जॉर्जना यश आले. सरकारने १३ लाख रेल्वे कर्मचाºयांना कामावरून काढले, तरीही संप सुरूच होता. अखेर जॉर्ज यांना सरकारने तुरुंगात डांबले. त्यानंतर २७ मे रोजी संप मागे घेण्यात आला होता. या संपाने जॉर्ज यांचे नेतृत्व देशपातळीवर चमकू लागले.

मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे अध्यक्ष स. का. पाटील यांच्याविरोधात जॉर्जनी १९६७ मध्ये दक्षिण मुंबईतून निवडणूक लढविली आणि ऐतिहासिक विजय मिळवत त्यांनी पाटील यांचे राजकारण संपुष्टात आणले. १९७५ मधील आणीबाणीला विरोध करण्यासाठी जॉर्जनी बडोदा डायनामाईट कट रचला. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून, त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. पण त्यामुळे न डगमगता १९७७ मध्ये त्यांनी तुरुंगातून बिहारमधील मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली व मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. त्यामुळे १९७७ मध्ये जनता पार्टीचे सरकार आल्यावर त्यांना उद्योगमंत्री करण्यात आले. पुढे १९८९ मध्ये व्ही. पी. सिंग यांच्या मंत्रिमंडळात ते रेल्वेमंत्री होते. त्या काळात काश्मीरची जबाबदारीही सोपविण्यात आली होती. याच जॉर्जनी पुढे काँग्रेसला विरोध म्हणून भाजपाशी दोस्ती केली आणि १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी संरक्षणमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. ते संरक्षणमंत्री असताना पाकिस्तानविरोधातील कारगील युद्धात देशाला विजय मिळाला. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर त्यांनी संरक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र पुढे आरोपांमधून त्यांची निर्दोष मुक्तता झाली.

पुढे ते आजारी पडत गेले आणि त्यांना अल्झायमर या आजाराने ग्रासले. त्यातून ते बाहेरच पडले नाहीत. या काळात ते अंथरुणाला खिळून होते. कोणाला ओळखत नव्हते, कोणाशी बोलूही शकत नव्हते. अत्यंत आक्रमक अशा जॉर्ज यांची आजारपणातील स्थिती अतिशय दयनीय होती.

Web Title: Mumbai's first 'closed emperor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.