लोकलच्या दाराआधी मुंबईचे दार बंद करण्याची गरज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 11:26 IST2025-06-11T11:24:12+5:302025-06-11T11:26:03+5:30
Mumbai: शहरे इतकी का सुजली आहेत?माणसे शहरांकडे का धावत आहेत? मुंबईच्या प्रश्नाचे खरे उत्तर दूर खेडेगावांत भकास होत चाललेल्या शेतीत आहे !

लोकलच्या दाराआधी मुंबईचे दार बंद करण्याची गरज!
- हेरंब कुलकर्णी
(शैक्षणिक कार्यकर्ते, अभ्यासक)
मी नोकरीला लागताना मुलाखत द्यायला मुंबईत गेलो होतो. त्या पहिल्या प्रवासात चप्पल लोकलखाली पडली आणि या शहरात आपले निभणार नाही, असे तेव्हाच जाणवले. पुढे मुंबईत कामानिमित्त जात राहिलो. लोकलने प्रवास करण्याची वेळ आली की मुंबईकरांविषयी काळजी वाटणे कधीही संपले नाही. एखादा दिवस या गर्दीत घुसणे इतके कठीण, इथली माणसे हे रोज कसे काय करत असतील, याचा अचंबा वाटत राहिला. अजूनही वाटतो.
मी ग्रामीण भागात नोकरी केली. दिवस संपला की १० मिनिटांत घरी पोहोचून चहा प्यायची सोय होती आणि मुंबईत मात्र काम संपल्यावर घरी जाताना पुन्हा दोन तास लोकलमध्ये उभे राहण्याची शिक्षा. महिलांची वेदना तर वेगळीच, गर्दीत धक्के खात प्रवास केल्यावर घरी जाऊन पुन्हा स्वयंपाक आणि कामे...!
दिवसा सोडा, अगदी रात्री अकरा वाजताही मुंबईच्या लोकलमध्ये भीषण चेंगराचेंगरी अनुभवली आहे. एका स्टेशनला उतरू दिले नाही म्हणून पुढच्या स्टेशनपर्यंत जाऊन मागे आलो आहे. विरार लोकल थांबल्यावर अंगावर येणारी गर्दी बघून घाबरून गेलो आहे. लोकलच्या गर्दीत माणसे अतिशय हिंसक होतात. चिडतात, संतापतात; पण मी त्यांचा राग समजून घेतो. त्यातील अगतिकता समजून येते. आमच्यासारखी कधीतरी जाणारी माणसे इतकी वैतागतात, तर रोज ही माणसे कशी जगतात...
अतिशय चिडलेली, त्रासलेली दिसतात माणसं गर्दीत. मात्र त्यांना तसा भयंकर प्रवास रोज करावा लागतो. रोज जीव काढून लोकल गाठावीच लागते. दुसरा पर्यायच नसतो प्रवासाचा. अक्षरश: एका पायावर उभ्याने प्रवास करणारे लोक दिसले, की मनात कालवाकालव होते.
परवाच्या भयानक अपघातानंतर रेल्वेच्या अमानुष व्यवस्थेवर अनेकजण तुटून पडत आहेत; पण ही गर्दी फक्त लक्षण आहे. दर सेकंदाला जरी लोकल सोडली तरीही ही गर्दी हटणार नाही.
कोणत्याही शहराची माणसे सामावून घेण्याची एक मर्यादा असते; ती किती ताणायची? त्यामुळे लोकलला दारे लावण्यापेक्षा मुंबईला दार लावण्याची गरज आहे. परप्रांतीयांना मुंबईत अटकाव करायचा, की महाराष्ट्रातून येणारे लोंढे थांबवायचे? यावर वाद घालण्यात अर्थ नाही. मुंबईत येणारी गर्दी थांबण्यासाठी काय भूमिका घेणार, हा खरा मुद्दा आहे.
खेडी उद्ध्वस्त होत आहेत. शेती भकास झाली आहे. त्यामुळे उत्तर भारत असो की महाराष्ट्र असो; सगळीकडील लोंढे जगायला मोठ्या शहरात शिरतात. केवळ मुंबईच नाही; सगळीच शहरे आज तशीच झाली आहेत. दिल्ली, बंगलोरसारखी शहरे असोत की पुणे असो; रस्त्यावरून चालणे मुश्कील झाले आहे. त्यावर उपाय म्हणून मेट्रो आणल्या जातात; रस्ते, उड्डाणपूल असे महागडे उपाय केले जातात...
पण हा खरेच मार्ग आहे का?
ही शहरे इतकी का सुजली आहेत? सातत्याने माणसे या शहरांकडे का धावत आहेत? महाराष्ट्राचे नागरीकरण आज ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. १९७१ साली जितकी महाराष्ट्राची लोकसंख्या होती, तितकी लोकसंख्या २०२५ साली महाराष्ट्रातील फक्त शहरांत राहते आहे.
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी म्हणायचे, शेतीचे प्रश्न सुटत नाहीत, म्हणून आज शहरांत लोंढे जात आहेत. त्यामुळे मुख्य मुद्दा मुंबईतील गर्दीचे व्यवस्थापन हा नाहीच, तर त्याचे उत्तर दूर खेड्यांत असलेल्या शेतीत आहे. उत्तर भारतात ग्रामीण रोजगार निर्मिती व औद्योगिकीकरणात आहे. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती हेच उत्तर आहे.
गर्दी आज सर्वच शहरांत दिसते. सगळीच जिल्ह्याची गावे त्याच रस्त्याने निघाली आहेत. तालुक्याच्या गावांना बायपास काढावे लागत आहेत. बड्या महानगरांच्या जबड्यांत पैसा ओतण्यापेक्षा (किंवा त्याबरोबर असे म्हणू) खेड्यातील विकासावर लक्ष केंद्रित केले तरच शहरातील गर्दी थांबू शकेल.
रेल्वे प्रशासनात सुधारणा ही तात्पुरती मलमपट्टी झाली. मुंबईत आज येणारी गर्दी कशी रोखायची, हा खरा मुद्दा आहे. शहरातील गर्दी कमी करण्यासाठी कठोर पावले उचलणे, हाच दीर्घकालीन मार्ग असू शकतो. लोकलचे दार बंद करायचे की नाही, यावर वाद घालण्यापेक्षा मुंबईचे दार कसे बंद करायचे, यावर चर्चा व्हायला हवी.
herambkulkarni1971@gmail.com